डासांच्या उत्पत्तीमुळे साथीच्या रोगांचे संकट उदभवू नये यादृष्टीने त्वरीत उपाययोजना कराव्या – आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना
चंद्रपूर:- जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना पावसाळयामुळे जिल्हयातील नागरी तसेच ग्रामीण भागात डासांची सुध्दा मोठया प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. यामुळे मलेरीया, डेंग्यु अशा साथीच्या रोगांची लागण जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच नागरिक कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना साथीच्या रोगांचे नवे संकट उदभवल्यास नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता जिल्हयातील नगर परिषदा व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका, नगर पालिका प्रशासन व पदाधिका-यांना दिल्या आहेत.
जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात पावसाळयामुळे डासांची उत्पत्ती होवू नये, डबके साचुन राहू नये यादृष्टीने स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली आहे. यासंदर्भात जनजागरणाच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी फलक लावणे, फवारणी करणे व तत्सम उपाययोजना सुध्दा तातडीने हाती घेण्याच्या सूचना सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला दिल्या आहेत. ही स्वच्छता मोहीम राबविताना नगरसेवक व संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना सुध्दा त्यांनी दिल्या आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुध्दा त्यांनी पत्र पाठविले आहे.