गडचिरोलीत “ऑपरेशन अंतिम प्रहार”; 8 जहाल माओवादी जेरबंद, 51 शस्त्रांची जप्ती

गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस दल आणि सिआरपीएफने “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत तब्बल आठ जहाल माओवाद्यांना अटक केली आहे. फोदेवाडा चकमकीत सी-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या या माओवाद्यांमध्ये दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्यांचा समावेश आहे. तेलंगणातील विकाराबाद रेल्वे स्थानक, मौजा कुमनार आणि नैताळा परिसरात विशेष शोध मोहिमा राबवून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि रोख रक्कम जप्त केली असून त्यात 02 एलएमजी रायफल, 04 एके-47, 04 एसएलआर, 03 इंसास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्रांचा समावेश आहे. याशिवाय 65 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम, दारुगोळा, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्यही हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान माओवाद्यांनी जंगल परिसरात पोलिसांवर घातपात करण्यासाठी शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती उघड झाली होती. पोलिसांनी त्यानुसार शोध मोहीम राबवत फोदेवाडा, गुंडेनूर आणि नैताळा जंगल परिसरातून हा साठा जप्त केला.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील उर्वरित माओवाद्यांपैकी पाच जणांना अटक झाली असून एका महिला माओवादीने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यात अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील, डीआयजी योगेश कुमार, सिआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा यांच्यासह गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

गडचिरोलीत माओवादाला मोठा धक्का; 38 लाखांच्या पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानाला आणखी एक मोठे यश मिळाले असून, पाच वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 01 डिव्हीसीएम, 01 पीपीसीएम, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवादी तसेच दोन सदस्यांचा समावेश असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वर एकत्रित 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष म्हणजे सन 2025 पासून आतापर्यंत तब्बल 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव वेळदा, जिवन ऊर्फ जग्गु मडकाम, रजनी ऊर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे. अनेक वर्षे विविध दल आणि तांत्रिक पथकांमध्ये सक्रिय राहिलेल्या या माओवाद्यांनी हिंसक जीवनाचा त्याग करून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 15 ऑक्टोबर 2025 रोजी माओवादी प्रवक्ता भूपती ऊर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात 1063 माओवादी सदस्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्य आणि केंद्र शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे माओवाद्यांना नवजीवनाची संधी उपलब्ध होत असून, आत्मसमर्पण केलेल्या या पाचही सदस्यांना मिळून लाखो रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पती-पत्नी म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या मधु वेळदा आणि रजनी धुर्वा यांना अतिरिक्त मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सिआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष अभियान पथक आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोलीत शांतता आणि विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘जनतेच्या दारी महसूल प्रशासन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आलापल्लीत महसूल समाधान शिबिराचा यशस्वी समारोप

गडचिरोली : अहेरी तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत सहाव्या आणि अंतिम टप्प्याचे शिबिर शुक्रवारी (दि. १५ मे २०२६) मौजा आलापल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महसूलविषयक सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अंतिम शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहेरी शुभम पाटील होते. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अहेरी रणदिवे, तालुका कृषी अधिकारी निखिल गुरव, दुय्यम निबंधक आर. जी. चिलनकर तसेच पंचायत समिती अहेरीचे गटविकास अधिकारी गणेश चव्हाण उपस्थित होते.

या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या १५ हून अधिक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्ती, QR कोडयुक्त डिजिटल ७/१२ उतारे, उत्पन्न, जात, रहिवासी आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य मंजुरी आदेश, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणे यावर विशेष भर देण्यात आला.

तसेच Single Day Service Delivery, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान सेवा, शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांबाबत तक्रार निवारण, घरांसाठी पट्टेवाटप, डिजिटल राशन कार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती आणि एसटी स्मार्टकार्ड यांसारख्या सेवा नागरिकांना देण्यात आल्या.

भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेंतर्गत विविध गावांमध्ये सनद वाटप करण्यात आले. मौजा वेलगूर टोला येथे २ सनद वाटप करून ₹२,७२२, मौजा येलचिल येथे ३ सनद वाटपातून ₹७,८६८ आणि मौजा चौडमपल्ली येथे २३ सनद वाटपातून ₹३५,६०८ इतकी सनद फी वसूल करण्यात आली. यामधून एकूण ₹४६,१९८ महसूल शासनाकडे जमा झाला. याशिवाय मौजा आलापल्ली येथे ३ पट्टेवाटप करण्यात आले असून महसूल व वन विभागाच्या पोटहिस्सा मोजणीबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नागरिकांना मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कातील विविध सवलतींची माहिती देण्यात आली. महिलांनी घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत, तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफीची माहिती दुय्यम निबंधक आर. जी. चिलनकर यांनी दिली.

याशिवाय सलोखा योजना अंतर्गत शेतजमिनीच्या अदलाबदलीसाठी केवळ ₹१००० मुद्रांक शुल्क व ₹१००० नोंदणी फी, कौटुंबिक बक्षीसपत्रासाठी ₹२०० मुद्रांक शुल्क, तसेच शैक्षणिक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफी यांसारख्या योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

शिबिरात महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागासह विविध शासकीय विभागांनी स्टॉल उभारले होते. आधार केंद्र, सेतू सुविधा केंद्र, आरटीओ, बँका आणि इतर विभागांच्या सहभागामुळे नागरिकांना अनेक सेवा व दाखले तत्काळ उपलब्ध झाले.

“पारदर्शक, लोकाभिमुख आणि शंभर टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढणारे महसूल प्रशासन उभारणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची धडक कारवाई; पुण्यातून मुख्य आरोपी अटकेत

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक केली आहे. लातूरचा रहिवासी असलेला कुलकर्णी हा नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित रसायनशास्त्र विषयाचा व्याख्याता म्हणून कार्यरत होता. तपासात त्याच्याकडे नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण गैरप्रकाराचा तपास सध्या वेगाने सुरू असून, आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, एप्रिल २०२६ च्या अखेरीस कुलकर्णीने महिला आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने पुण्यातील आपल्या घरात निवडक विद्यार्थ्यांसाठी गुप्त मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न, त्यांची उत्तरे आणि पर्याय लिहून दिले जात होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी वहीत नोंदवून घेतलेले प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट परीक्षेतील रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या अवैध सत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर १२ मे २०२६ रोजी सीबीआयने अधिकृत गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष तपास पथके तयार करून देशभरात छापेमारी मोहीम राबवण्यात आली. गेल्या २४ तासांत विविध शहरांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, डिजिटल पुरावे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून सात आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी पाच जणांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रश्नपत्रिका फुटीमागील मूळ साखळी, आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांना या रॅकेटमध्ये ओढणाऱ्या मध्यस्थांचा शोध सीबीआय घेत आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे अधिक खोलवर असल्याने पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिरोंचाच्या विकासाला नवे इंधन : आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण

सिरोंचा (गडचिरोली) : सिरोंचा शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जाणाऱ्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा अंतर्गत भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटनावेळी घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे परिसर दुमदुमून गेला होता. विधिवत पूजा-अर्चना करून फित कापत या आधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण करण्यात आले.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला हा पेट्रोल पंप वाहनधारकांसाठी मोठी सोय ठरणार असून इंधनासाठी दूरवर जावे लागण्याची नागरिकांची अडचण आता दूर होणार आहे. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होण्यास मदत होणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्रामीण व दुर्गम भागात आधुनिक सुविधा पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नसून नागरिकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनानंतर आ. आत्राम यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवी वासेकर, नगराध्यक्ष पद्मा भोगे, तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, बाजार समिती सभापती सतीश गंजीवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पेट्रोल पंपामुळे सिरोंचा शहराच्या विकासाला गती मिळणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

जिद्दीचा खाकी विजय! शेतकऱ्याच्या मुलाने गडचिरोलीत फौजदार पद मिळवले

जिमलगट्टा (जि. गडचिरोली) : साध्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने अथक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) पद मिळवून विदर्भात अभिमान आणि प्रेरणेची लहर निर्माण केली आहे. समय्या मोगलीवर यांच्या या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बालपणी जिल्हा परिषद शाळेत शिकत असतानापासून खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या समय्या यांना आर्थिक अडचणी आणि ग्रामीण पार्श्वभूमीमुळे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. २०१९ च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी हार न मानता त्यांनी मेहनत चालू ठेवली. अखेर २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत त्यांची निवड झाली.

विशेष म्हणजे, समय्या यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षाही उत्तीर्ण केली होती, परंतु त्यांचे एकच ध्येय होते – खाकी वर्दी. त्यामुळे त्यांनी फौजदार पद स्वीकारले. त्यांच्या यशामागे आई-वडिल, कुटुंबीय आणि गावातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे. जिमलगट्टा गावातील लोक या यशाचे कौतुक करत आहेत. एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलाने एवढे मोठे यश मिळवल्याने हा यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी शिंदेंनी विकास निधीतील पैसे वाटले-अंबादास दानवे

 

वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा म्युझियमचे लोकार्पण झाले. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली विकास निधीचा पैसा मिंध्यांच्या कार्यक्रमाला वाटणाऱ्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले आहे. ५ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी मिंधे सरकारने प्रचंड पैसा उघळला होता. वाशीमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे असलेला २ कोटी ७९ लाख रुपयांचा विकास निधी विकास

अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र

कामांवर खर्च न करता त्यातील ८५ लाख ६० हजार रुपये इतका निधी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली अन्य जिल्ह्यातील विविध ३३ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पोहरादेवीतील मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या दिला, असे दानवे यांनी या पत्रात नमूद केले आहे. ही बाब गंभीर असून शासनाच्या विकास निधीचा अपव्यय करून जिल्हाधिकारी यांनी कार्यकक्षा ओलांडत पालकमंत्र्यांना गर्दी जमविण्यासाठी मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी या कार्यक्रमासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील एसटीच्या व्यवस्थापकांकडे १८५० गाड्यांची मागणी केली होती. इतक्या गाड्या एकाच दिवशी एकाच कार्यक्रमासाठी लावल्या गेल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला, असेही दानवे यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

एकनाथराव जाधव यांचा ठाम निर्णय -विधानसभा लढविणारच !

राज्यात १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता बिगुल वाजला आणि सर्वांच लक्ष वेधल गेल ते म्हणजे वैजापूर च्या राजकीय वलयात चर्चेत असलेल्या चेहऱ्यांकडे महायुती कडून आपणच उमेदवार राहू असेही एकनाथ राव जाधव
यांनी आपल्या दौऱ्यावेळी सांगितले. कि, काहीही झाल तरी आपण विधानसभा लढविणारच… असा प्रण केला आहे.


२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना पक्षाची महायुती होती, यावेळी वैजापूर-गंगापूर विधानसभेत स्व.लोकनेते आर.एम.वाणी साहेबांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.रमेश बोरनारे यांना
उमेदवारी दिली होती .

त्यावेळी शिवसेना आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ताकद लावत बोरनारे यांना लाख मतानी आमदार केले.मात्र आपल्या संवाद यात्रेदरम्यान भाजप कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव
यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारात न घेतले गेल्याने आम्ही हि निवडणूक लढविणारच असा प्रण केला आहे.यामुळे तिकीट मिळाले तर पक्षाकडून नाही मिळाले तर अपक्ष अशी भूमिका एकनाथ जाधव यांनी घेतली आहे.

आगामी काळात उमेदवारी अर्ज भरतानाच हे स्पष्ट होईल कि,कि कोण उमेदवार कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार?
मात्र सध्या दिसत असलेले चित्र ,पाहता, डॉ. दिनेश परदेशी हे महाविकास आघाडीकडून लढू शकतात. तर विद्यमान आमदार हे महायुतीच्या तिकिटावर लढू शकतात.याशिवाय जाधव हे अपक्ष असतील का यावर लवकरच शिक्कामोर्तब
होणार आहे. याशिवाय माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मावळत्या मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करण्याचा प्रयत्न

 मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजा हा कसा सुखी होईल, त्याची चिंता कशी मिटेल, याचा सांगोपांग विचार करून ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितपणे काय फायदे देता येतील, याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

सिंचनासाठी शेतकऱ्यांना नेहमीच विजेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल 2024 पासून 7.5 HP म्हणजेच 7.5 अश्‍वशक्तीपर्यंतच्या क्षमतेच्या कृषी पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 44 लाख शेतकऱ्यांना मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही योजना जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील, याचा विचार केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनासाठी मोफत वीज प्रदान केली जाईल. मोफत विजेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल, जे त्यांच्या शेतात 7.5 HP कृषी पंपाचा वापर करतात. मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे, आणि हा लाभ राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा, हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नेहमीच धोरण आहे आणि त्यामुळे पीक सिंचन संबंधातील सर्व समस्या कमी होणार आहेत

अधिक पेरणी आणि सिंचनासाठी शेतकऱ्याना प्रोत्साहित करणे, यासाठी राज्य सरकार नेहमीच सतर्क आणि सज्ज असते, हे राज्यातील प्रत्येक शेतकरी जाणतो, त्यामुळेच या योजनेला मोठे यश मिळाले आहे.

या योजनेचा लाभ पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत दिला जाणार आहे. या बदल्यात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारकडून महावितरण कंपनीला 14 हजार 760 कोटी रुपये देण्यात येतील, असा निर्णय देखील शिंदे सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सहा हजार 985 कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वीज दरांमध्ये सवलत देण्यासाठी अतिरिक्त 7 हजार 775 कोटी रुपये दिले गेले आहेत.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेले हे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत

वैजापूर विधानसभेत निवडून गेलेले आजपर्यंतचे आमदार ! भावी कोण ?

आरोप प्रत्यारोपात वैजापूरच राजकारण घिरट्या घालतंय
पण तुम्हाला माहितेय का या वैजापूर विधानसभेच्या वलयात आत्तापर्यंतचे निवडून गेलेले आमदार

वैजापूर मध्ये आर एम वाणी हे शिवसेनेत गेले आणि कैलास आबांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. यांवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते विभागली गेली.कैलास आबाचा पराभव करत आर एम वाणी यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला. यांमुळे शिवसेनेचा बालेकील्ला अशी वैजापूरची नवी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शिवसेनेन पंचायत समिती, जिल्हा परीषदही काबीज केली. असे सांगितले परंतु स्वबळावर पक्ष निवडणूका लढविण्याचा विचारामुळे पुन्हा आर एम वाणींना ही निवडणूक लढवावीच लागली.
चिकटगांवकरांना राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली. बक्कळ मतदार वर्ग,भाऊ कैलास आबांची मिळालेली साथ आणि शेवटी नशिबाने साथ दिल्याने भाऊसाहेब तात्या निवडून आले आमदार झाले.


तरीही ठाकरे वाणींकडेच आग्रही होते. परंतु आर एम वाणी यांचा शब्द शास्वत सत्य होता.आपल्या उमेदवारीवर पाणी सोडत त्यांनी बोरनारे यांनाच विधानसभा उमेदवार घोषीत करण्यास ठाकरेंना भाग पाडलं. यातच भाऊसाहेब तात्या आणि अभय पाटील या काका पुतण्यांत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. राजकीय वादंग नको म्हणत तात्यांनी माघार घेतली आणि अभय पाटील विरूद्ध रमेश बोरनारे यांच्यात ही फाईट झाली. भाजप ने दिलेली मजबूत साथ आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा तगडा हाथ यांमुळे बोरनारे 98183 मते घेऊन आमदार झाले. अभय पाटलांना 40 हजाराच्या आसपास मते मिळाली.

माञ आता राज्यात शिवसेना दोन झाल्या.एक ठाकरेंची दुसरी शिंदेंची दोन वर्षांपुर्वी बोरनारे यांनी शिंदेंची साथ देत.ठाकरेंना सोडलं. यांवेळी ही शिंदेसेना आणि भाजप एकञित लढण्याची चिन्हे दिसत असताना महायुतीचा उमेदवार बोरनारेच असतील यात शंका नाही पण यांवेळी भाजपकडून बोरनारेंना तालुक्यात फारशी मदत होणार नाही असा सल्ला जाणकारांकडून व्यक्त होत असतानाच भाजपचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य एकनाथ जाधव यांनी साखरेत मिठाचा खडा टाकत तिकीट भाजपाला मिळणार असल्यांचे संकेत देत बोरनारेंवर भाजप नाराज असल्याच स्पष्ट केल.

दुसरीकडे भाजपचा तालुक्यातील सर्वात शक्तिशाली आणि सर्व जाती धर्माच्या जनतेला कायम न्याय देत असलेला नेता ठाकरेंच्या गळाला लागणार या बातमीने राजकीय वलयात खळबळ माजवलीय. दररोज काहीतरी नविन ट्विस्ट येत असल्याने या निवडणूकीत बोरनारे यांना चितपत करण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराच्या शोधात असलेले ठाकरे यांवेळी शिवसेनेकडून डॉ दिनेश परदेशिंना मैदानात उतरविन्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास टफ फाईट पहायला मिळेल.

एकूनच मतदारसंघात यावेळी काय घडत यांकड लक्ष लागलेल असताना भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर आणि एकनाथ जाधव यांच्या लढतीवरही काही गणित बदलू शकतात ..
शिंदेच्या साथीला जात बोरनारेंनी दगा केल्याचा राग उद्धव ठाकरेंना असल्याने ठाकरे मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवण्याकरीता नेमके आणखी कुठले गेम प्लान करतात आणि आपला साथीदार पराभूत होऊ नये याकरीता शिंदे काय योजना आखतात हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकंदरीत सर,भाऊ तात्या,अन साहेबांशिवाय आणखी कोण रिंगणात उतरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.