गडचिरोलीत १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांच्या महिंद्रा एम. शॉपी स्पेअर पार्ट्स सेंटरचे दिमाखात उद्घाटन

गडचिरोली : : अवघ्या १९ व्या वर्षी उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकत तरुण उद्योजक शाहिद शेख यांनी गडचिरोली शहरात महिंद्रा कंपनीच्या अधिकृत ‘एम. शॉपी’ स्पेअर पार्ट्स सेंटरची सुरुवात केली आहे. या आधुनिक स्पेअर पार्ट्स सेंटरचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार दीपकदादा आत्राम, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, तसेच महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी मुकेश रॉय, रजत शर्मा आणि कपिल सुतारिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

अवघ्या १९ वर्षांच्या वयात व्यवसाय क्षेत्रात धाडसी पाऊल उचलत शाहिद शेख यांनी सुरू केलेला हा उपक्रम गडचिरोलीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण व आदिवासीबहुल भागात आधुनिक आणि अधिकृत वाहन सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाहिद शेख यांचे अभिनंदन करत, गडचिरोलीसारख्या वाढत्या जिल्ह्यात महिंद्राच्या अधिकृत स्पेअर पार्ट्स सेंटरची गरज अधोरेखित केली. या नव्या केंद्रामुळे वाहनधारकांना दर्जेदार, अस्सल आणि विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सेवाही अधिक सुलभ होणार आहेत.

महिंद्रा कंपनीच्या अधिकृत नेटवर्कमधील हे सेंटर असल्याने ग्राहकांना कंपनीमान्य दर्जाचे स्पेअर पार्ट्स, गुणवत्तेची हमी आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोली व परिसरातील महिंद्रा वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, वाहनधारक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी आणि तरुण उद्योजकतेचा गौरव करणाऱ्या वातावरणात पार पडला.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

EVM वर मतदान, विद्यार्थ्यांनी निवडला ‘बाल मुख्यमंत्री’; शिवणीपाठ शाळेचा लोकशाहीचा अनोखा उपक्रम

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात पंचायत समिती अहेरी अंतर्गत केंद्र बोरी येथील शिवणीपाठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि. २१ जुलै) ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा लोकशाही अनुभव घेण्याची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबविला. ईव्हीएमच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने मतदान घेण्यात आले आणि त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.

निवडणुकीत अथर्व संतोष तलांडे यांची शालेय मुख्यमंत्री, तर नव्या नाशिक मोहुर्ले यांची शालेय उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री – अथर्व संतोष तलांडे
उपमुख्यमंत्री – नव्या नाशिक मोहुर्ले
शिक्षणमंत्री – रिधान्थ हरिचंद निकेसर
क्रीडामंत्री – आरव बलवंत वेलादी
जल व स्वच्छतामंत्री – रुहानी मधुकर वेलादी
आरोग्यमंत्री – ओम अरुण ठाकरे
पोषण आहारमंत्री – समीर राजेश वेलादी
विद्युतमंत्री – श्रेयश श्रीकांत वाढई

शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मीनाताई वेलादी, उपसरपंच सविता कोकीरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंतू कुळमेथे, अंगणवाडी सेविका ज्योतीताई कुळमेथे यांच्यासह समिती सदस्य हरिचंद्र निकेसर, सुरेखा ठाकरे, शारदा तलांडे, सुवर्णा मोहुर्ले, रसिका वेलादी तसेच ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा अभिनव शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार आणि सहशिक्षिका सुरेखा नागो मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. ईव्हीएमच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या अनोख्या निवडणूक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि उपस्थित नागरिकांनी कौतुक करत शाळेच्या या लोकशाहीवादी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

शासन तुमच्या दारी! अहेरीत २२ जुलैला विविध विभागांचे संयुक्त समाधान शिबिर

अहेरी : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत २२ जुलै रोजी अहेरी येथील वासवी सभागृहात भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २२, २५ आणि २६ जुलै या तीन दिवसांपैकी एका दिवशी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी २२ जुलैचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

या शिबिरात अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, बँका तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागाचा स्वतंत्र स्टॉल उभारून विविध योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विशेष प्रदर्शनीही भरविण्यात येणार असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांचे हेलपाटे न मारता अनेक सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांची नोंदणी, अर्ज, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जनजागृती वाढविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन नागरिकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी २२ जुलै रोजी वासवी सभागृहात आयोजित या भव्य महसूल समाधान शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

जिमलगट्टा पोलिसांचा मोठा दणका; प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूसह 10.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात जिमलगट्टा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल एम. मडावी यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार एमएच-24 एएफ-1901 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून जिमलगट्टा ते देवलभेडा (देचलीपेठा परिसर) मार्गावर प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

माहितीची शहानिशा करताच राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश पायगन, पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरे तसेच पोलीस कर्मचारी मोरेश्वर करमे, राकेश पालकूर्तीवार, रविकुमार सुन्करी, रामकिशन बडदे आणि बिप्लव किरटोनिया यांनी दोन पंचांसमक्ष जिमलगट्टा येथे सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनातून ‘मजा 108 हुक्का शिशा तंबाखू’चे 160 डबे (किंमत 1.92 लाख रुपये) आणि ‘होला हुक्का शिशा तंबाखू’ची 40 पॅकेट्स (किंमत 80 हजार रुपये) असा एकूण 2.72 लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 8 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणात प्रशांत अंजय्या याडावर (वय 45), रा. वॉर्ड क्र. 12, गडचिरोली याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात तो प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत असून, या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेते आणि तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करीत आहेत.

जिद्दीसमोर संकटांनी टाकली हार! रशियातून एमबीबीएस पूर्ण करत डॉ. साक्षी मद्देर्लावार यांनी साकारले डॉक्टर होण्याचे स्वप्न

गडचिरोली : स्वप्न मोठे असेल तर संकटेही मोठी असतात. मात्र, त्या संकटांवर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करता येते, हे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. साक्षी किशोर मद्देर्लावार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. रशियातील Privolzhsky Research Medical University, Nizhny Novgorod येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतातील एफएमजीई (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत डॉक्टर होण्याचे आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करून समाजसेवा करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले होते. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्यांच्यावर विश्वास ठेवत रशियात शिक्षणासाठी पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबाच्या विश्वासानेच त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली.

परदेशात गेल्यानंतर भाषा, संस्कृती, हवामान आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान होते. विशेषतः रशियन भाषा शिकणे सुरुवातीला कठीण वाटले. मात्र, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीमुळे त्यांनी रशियन भाषेवर प्रभुत्व मिळवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

सहा वर्षांच्या शिक्षणादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. तरीही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरले आणि अधिक जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. हा संघर्ष त्यांच्या यशाला अधिक प्रेरणादायी बनवणारा ठरला.

रशियातील शिक्षणाने त्यांना वैद्यकीय ज्ञानाबरोबरच शिस्त, संयम, कठोर परिश्रम आणि जागतिक दृष्टिकोन दिला. पदवीदानाचा क्षण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्या इंटर्नशिप, वैद्यकीय परवाना प्रक्रिया आणि पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी तयारी करत आहेत.

डॉ. साक्षी यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचे उदाहरण आशेचा किरण ठरत आहे.

‘स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्याकडे चालत येईल’ — डॉ. साक्षी मद्देर्लावार

“डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला. परदेशात राहून शिक्षण घेणे, कुटुंबापासून दूर राहणे आणि वडिलांच्या निधनाचा आघात सहन करणे सोपे नव्हते. पण मी कधीही हार मानली नाही. माझी आई, दिवंगत वडील आणि भाऊ यांनी दिलेला विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छिते की, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य आणि शिस्त कायम ठेवा. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया असतो.”

शेतीपूर्वी पांडुम पूजेला प्राधान्य; वांगेपल्लीत आदिवासी परंपरेचे दर्शन

वांगेपल्ली : आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेली पांडुम पूजा यंदाही वांगेपल्ली गावात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामांना प्रारंभ करण्यापूर्वी गावातील सर्व शेतकरी आणि समाजबांधव एकत्र येऊन ही पूजा करतात.

गावातील वयोवृद्धांच्या मते, पांडुम पूजा केल्यानंतरच शेतीची कामे, जसे की बीज पेरणी, रोवणी आणि इतर कृषी कार्य सुरू करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या परंपरेमुळे शेतीत चांगले उत्पन्न मिळते आणि गावात सुख-समृद्धी नांदते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

यंदाही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पांडुम पूजा विधीपूर्वक पार पाडत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांनी नव्या पिढीला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा, संस्कृती आणि रूढी जपण्याचे आवाहन केले.

“आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा ही आपली ओळख आहे. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पांडुम पूजेच्या माध्यमातून वांगेपल्ली गावात सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालयाला हिरवा कंदील; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुख्यालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी ही माहिती देताना, येत्या ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेने २ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये देशभरातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी गडचिरोलीतील विद्यालय आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

सध्या विद्यालयाची सुरुवात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठी आवश्यक जागा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नावे हस्तांतरित केली असून, वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक इमारतही उपलब्ध करून दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वर्गखोल्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने उच्च वर्गांची भर घालण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी आणि इतर कायदेशीर औपचारिकता जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

दरम्यान, तात्पुरत्या इमारतीत शैक्षणिक कामकाज सुरू असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी भव्य इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

माओवादविरोधी लढ्यातील शौर्याचा सन्मान; गडचिरोलीच्या पाच अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती

गडचिरोली : माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देऊन राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.

मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात शुक्रवार (३ जुलै २०२६) रोजी आयोजित पिपिंग समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (Pips) लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनिल बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने बजावलेल्या सेवेमुळे त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.

समारंभात बोलताना पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी माओवादविरोधी अभियानातील विविध अनुभव, आव्हाने आणि दुर्गम भागातील पोलीस दलाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत असून कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलीस दलाची शौर्यगाथा उल्लेखनीय असून आजपर्यंत या दलाला ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १५१० पोलीस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळालेली आहे.

या समारंभाला अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, डॉ. निखिल गुप्ता, शिरीष जैन, यशस्वी यादव, डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) प्रशांत मोहिते तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली पोलीस दलासाठी ही पदोन्नती केवळ वैयक्तिक यश नसून, माओवादविरोधी लढ्यातील धैर्य, समर्पण आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली राज्यस्तरीय गौरवाची पावती मानली जात आहे.

पहिल्याच पावसात वाहून गेला मुक्तापूर नाल्याचा रपटा; दक्षिण गडचिरोलीचा संपर्क तुटला

अहेरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-क वरील सुभाषनगर–मुक्तापूर–बोरी मार्गावरील मुक्तापूर नाल्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील हलगर्जीपणा पहिल्याच मुसळधार पावसात उघड झाला आहे. वाहतुकीसाठी कंत्राटदाराने तयार केलेला तात्पुरता माती-खडीचा रपटा (डायव्हर्शन) काल रात्री झालेल्या जोरदार पावसात पूर्णपणे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, नवीन पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असून अद्याप केवळ पायाभरणीचे कामच पूर्ण झाले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही कामाला अपेक्षित वेग देण्यात आला नाही. त्यामुळे रहदारी सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदाराने माती व खडीचा कच्चा रपटा तयार केला होता. मात्र, नाल्याला आलेल्या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे हा रपटा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला.

या घटनेमुळे दक्षिण गडचिरोलीचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांशी संपर्क तात्पुरता तुटला आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहतूक तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक प्रवासी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत.

घटनेनंतर नागरिकांनी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पहिल्याच पावसात रपटा वाहून जात असेल, तर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. पावसाळ्यापूर्वीच पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती गती देणे गरजेचे होते,” अशी प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांनी दिली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून रस्ता पूर्ववत सुरू करावा, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

खळबळजनक! गडचिरोलीत वाघांची शिकार करून कातडी तस्करी; अहेरीतील दोघांना छत्तीसगडमध्ये अटक, एक पोलीस शिपाई निलंबित

अहेरी: : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वन्यजीव तस्करांविरुद्ध छत्तीसगड वन विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वाघाच्या कातडीच्या आंतरराज्यीय तस्करीप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि राज्यस्तरीय विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत २९ जून रोजी रात्री पश्चिम पर्लकोट वनपरिक्षेत्रातील जनकपूर-पाखांजूर मार्गावर सापळा रचला होता. या नाकाबंदीदरम्यान दुचाकीवरून जात असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबूराव राजू मडावी (रा. गडअहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) आणि बिबेश्वर विष्णू गोडाम (रा. अहेरी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान या आरोपींकडून दोन वाघांची कातडी, १३ वाघांच्या मिशा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, हे वाघ महाराष्ट्रातील इंद्रावती व्याघ्र अधिवास परिसरात मारून त्यांची कातडी छत्तीसगडमध्ये तस्करीसाठी नेली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी गडचिरोली पोलीस दलातील फक्त एकच पोलीस शिपाई असल्याची अधिकृत माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली असून, संबंधित शिपायाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सध्या सुरू असून, दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.