सिरोंचा : गेल्या तब्बल सहा वर्षांपासून रखडलेल्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-C मुळे दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांचे हाल अद्याप कायम आहेत. जुलै महिन्यात राष्ट्रीय महामार्ग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरा करून रस्त्याची पाहणी केली होती. मात्र पाहणीनंतरही कामात अपेक्षित गती किंवा ठोस सुधारणा दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, उपविभागीय अभियंता बोबडे तसेच संबंधित कनिष्ठ अभियंत्यांनी मार्गाची पाहणी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी रस्त्याची दयनीय अवस्था, अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जाबाबतच्या तक्रारी, धुळीचा त्रास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडला होता.
जुलैच्या पाहणीला बराच कालावधी उलटूनही रस्त्याच्या कामात ठोस बदल न झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतेच मर्यादित राहतात काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. गरोदर माता, रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना खड्डे, धूळ, खराब रस्ता आणि अपूर्ण कामाचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही या मार्गावरून प्रवास करताना अडचणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सहा वर्षे उलटूनही महामार्गाचे काम पूर्ण होत नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ का दिली जाते, कामाच्या गुणवत्तेची तपासणी कोण करीत आहे आणि विलंबासाठी दंडात्मक कारवाई का होत नाही, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी केवळ खड्डे बुजविणे, मुरूम किंवा GSB टाकणे आणि तात्पुरती मलमपट्टी करणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम नियमानुसार, दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करणे ही संबंधित विभाग व कंत्राटदाराची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. महामार्गाच्या विलंबाबाबत तसेच कथित निकृष्ट कामाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आता केवळ आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे,” अशी भूमिका घेत ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. सहा वर्षांपासून दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, कामाची निश्चित मुदत जाहीर करून महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे; अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न हा केवळ रस्त्यापुरता मर्यादित नसून दक्षिण गडचिरोलीतील आरोग्य, शिक्षण, शेती, व्यापार, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.
– संतोष ताटीकोंडावार
जिल्हाध्यक्ष, जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती, गडचिरोली















