लोढा डाऊनटाऊनमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड; २१ नायजेरियन नागरिक ताब्यात

ठाणे : ठाण्याच्या डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक प्रकरण समोर आले आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे गुप्त कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यातील दोन आरोपी हे विविध राज्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेले सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील अत्यंत आलिशान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘लोढा डाऊनटाऊन’ या सोसायटीत हे सर्व आरोपी बनावट नावांनी राहत होते. पोलिसांच्या तपासात अनेकजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अनेक राज्यांतील पोलीस या टोळीच्या शोधात होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवत हे आरोपी ठाणे जिल्ह्यात लपून राहत असल्याचे समोर आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी शनिवारी पहाटे संयुक्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. संपूर्ण लोढा डाऊनटाऊन परिसराला पोलिसांनी वेढा घालत संशयित फ्लॅट्सवर एकाचवेळी छापे टाकले. पहाटेच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्या २१ जणांपैकी दोन आरोपी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप आहेत. उर्वरित काही आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठ्यामागे याच टोळीचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या टोळीचे मुंबई आणि डोंबिवली परिसरातील नेटवर्क किती मोठे आहे, त्यांनी कोणाला ड्रग्ज पुरवठा केला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे ठाणे आणि मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

अहेरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह बोलेरो जप्त, १४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली : जिल्हा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी मद्यसाठ्यासह बोलेरो कॅम्पर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन अहेरीच्या संयुक्त पथकाने २१ मे २०२६ रोजी सापळा रचून ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे मौजा आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर (क्र. एमएच १२ एस एक्स ६९८१) उभी असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनातून अवैध देशी व विदेशी दारू विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. सदर प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे व अहेरीचे प्रभारी अधिकारी पो.नि. हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

गडचिरोली ते मुंबई विकासाची नवी कनेक्टिव्हिटी; एक्सप्रेसवे, स्टील प्रकल्प आणि लाखो रोजगारांची घोषणा

मुंबई : ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, वेगवान दळणवळण, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

The Hindu Conclave मध्ये ‘मुंबई ते सुरजागड – समृद्धीचा महामार्ग’ या विषयावर बोलताना त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, परिवहन, पर्यावरण आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांतील विकासाचा विस्तृत आढावा मांडला. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असून गडचिरोलीसारखे भाग नैसर्गिक आणि औद्योगिक संपत्तीने समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी विकास केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांपर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, स्टील प्रकल्प आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. “कोस्ट टू फॉरेस्ट” असा विकासाचा प्रवास राज्याने गेल्या काही वर्षांत घडवून आणला असल्याचेही त्यांनी नमूद केले. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम करताना नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिक, आदिवासी समाज आणि पोलिसांशी संवाद साधत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन आणि दिवाळीसारखे सणही जवानांसोबत गडचिरोलीत साजरे केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

गडचिरोलीत रस्ते, पूल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट आणि प्रशासनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या असून केवळ सुविधा नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणे ही सरकारची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Tata Technologies च्या सहकार्याने १७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करण्यात आलेले ‘टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र’ दरवर्षी सुमारे ४,८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजक निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या नेतृत्वामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचे सांगत त्यांनी गडचिरोलीत उद्योग, इंटरनेट सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे नमूद केले. कोनसरी येथे Lloyds Metals and Energy Limited सोबत २० हजार कोटी रुपयांच्या ‘इंटिग्रेटेड स्टील प्लांट’साठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच सुरजागड इस्पात प्रकल्पातून आणखी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ८ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी ८५ किलोमीटरच्या ग्रीनफिल्ड रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते गडचिरोली प्रवास ९ ते १० तासांत पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्यासही मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ‘डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट-२०२५’मध्ये १२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यामधून १७,४३१ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १.४४ लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात सध्या जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याचे सांगत त्यांनी अटल सेतू, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, मेट्रो विस्तार आणि वाढवण बंदर यांसारखे प्रकल्प राज्याच्या भविष्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले. “मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ६० मिनिटांत पोहोचता आले पाहिजे,” हे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गृहनिर्माण क्षेत्रातही मोठे बदल करण्यात येत असून ‘माय होम – माय राईट’ संकल्पनेतून २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एआय आधारित केंद्रीकृत डिजिटल हाऊसिंग पोर्टल, क्लस्टर रीडेव्हलपमेंट आणि पुनर्विकास प्रकल्पांना प्राधान्य देत प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. धारावी पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठ्या आधुनिक पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनावर भर देताना समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि ठाणे-बोरीवली टनेल यांसारख्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी रेसकोर्स येथे २९५ एकरांचे सेंट्रल पार्क, ठाण्यात ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ तसेच राज्यभरात ३९४ ‘नमो गार्डन्स’ उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर नियंत्रणासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पंपिंग स्टेशन, आयफ्लोज प्रणाली आणि मिठी नदी सुधारणा प्रकल्पही राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन मांडताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसारख्या आर्थिक केंद्रासोबतच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांनाही उद्योग, रोजगार, शिक्षण, रस्ते आणि आधुनिक सुविधांशी जोडण्याचे काम सरकार करत असल्याचे सांगितले. विकासाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करणारे राज्य बनवण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपुरात वाघिणीचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर झडप; 4 जणींचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघिणीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही दुर्मिळ आणि गंभीर घटना मानली जात आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील ‘भट्टी मोहल्ला’ परिसरातील 13 महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. खैरीचक परिसरातील दाट जंगलात त्या काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका मादी वाघिणीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिलांनी प्रसंगावधान राखत जंगलातून जीव वाचवत पळ काढला. आपल्या सहकाऱ्यांना वाघिणीने ओढून नेत असल्याचे भयावह दृश्य पाहून उर्वरित महिला प्रचंड हादरल्या आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील असून परस्पर नातेवाईक असल्याने गुंजेवाही गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

कविता दादाजी मोहुर्ले (45)

अनिता दादाजी मोहुर्ले (46)

संगीता संतोष चौधरी (40)

सुनीता कौशिक मोहुर्ले (35)

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. तसेच या परिसरात वाढत्या वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

त्रिवेणी संगमावर भक्तीचा महासागर! कालेश्वर येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला भव्य प्रारंभ

सिरोंचा : गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या #कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्य सुरुवात झाली. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे ५.४३ वाजता कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले आणि वैदिक मंत्रोच्चारात सोहळ्याची विधिवत सुरुवात झाली.

#कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसर पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू येथे दाखल झाले. पवित्र स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

यावेळी मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी सांगितले की, “सरस्वती अंत्य पुष्कर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला सोहळा आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री कोंडा सुरेखा यांच्या नेतृत्वात तेलंगणा सरकारने व्यापक नियोजन केले आहे. मागील वर्षी झालेल्या सरस्वती आदि पुष्कराच्या अनुभवाच्या आधारे यंदा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हे १२ दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते.”

२१ मे ते १ जूनदरम्यान होणाऱ्या या १२ दिवसीय सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३०.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या काळात ३० ते ४० लाख भाविक #कालेश्वर येथे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, त्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.

नागपुरात उष्णतेचा कहर! अवघ्या ८ दिवसांत ३६ जणांचा मृत्यू

नागपूर : शहरासह संपूर्ण विदर्भाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अवघ्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ३६ अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला असून, या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या सलग मृत्यूंकडे सुरुवातीला कुणाचंही गांभीर्याने लक्ष गेलं नव्हतं.

सध्या नागपूर शहर अक्षरशः उन्हाने भाजून निघत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी तीन जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये बहुतेक बेघर, रस्त्यावर राहणारे किंवा उन्हात काम करणारे लोक असल्याची माहिती समोर येत आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका याच घटकांना बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सर्व मृत्यूंचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून सर्व मृत्यूंचं ‘डेथ ऑडिट’ करण्यात येणार असून, अंतिम अहवालानंतरच अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक तपासात उष्माघाताची शक्यता अधिक असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार ठेवण्यात आले असून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बाहेर जाताना डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणे, भरपूर पाणी पिणे, ओआरएस आणि लिंबूपाणी घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्कर येणे, उलटी होणे किंवा शरीरातील पाण्याची कमतरता जाणवल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी दिनांक २१ मेपासून सुरू झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. कोणतीही अडचण टाळण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

भामरागडमध्ये शेततळे योजनांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची चौकशीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तहसीलमध्ये DBT व कृषी योजनांतर्गत सुरू असलेल्या शेततळे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. या प्रकरणात शासन निधीचा अपहार होत असून कास्तकारांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, कास्तकारांच्या खात्यात जमा झालेली पूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून काढून घेतली जात असून त्यापैकी केवळ सुमारे 60 हजार रुपये मशीन धारकाला देण्यात येत आहेत. उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवून कास्तकारांना “पूर्ण पैसे दिले” अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती टाकून अधिक काम झाल्याचे दाखवले जात असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्येक खात्यात जमा झालेली रक्कम, पैसे काढण्याची प्रक्रिया, मशीन धारकाला दिलेली रक्कम तसेच प्रत्यक्ष खोदकाम व मोजमाप पुस्तिकेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करून शासन निधीचा अपहार थांबवावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मुरखळा गावाजवळ भीषण अपघात! गडचिरोली-उमरखेड ST बस उलटली; 2 ठार, 30 प्रवासी जखमी

गडचिरोली: गडचिरोलीहून उमरखेडकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसला आज भीषण अपघात झाला. मुरखळा गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. अचानक बसचा वेग अनियंत्रित झाला आणि काही क्षणांतच बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसच्या काचा फुटल्या असून अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गडचिरोली-उमरखेड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेकडो कोटींचा महामार्ग की भ्रष्टाचाराचा मार्ग? गडचिरोली-धानोरा रस्त्यावर बांधकामाआधीच भेगा

गडचिरोली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari देशभरात दर्जेदार महामार्ग उभारल्याचे दावे करत असताना, गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेकडो कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे.

महामार्गाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी काही महिन्यांतच अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा, खड्डे आणि उखडलेले थर दिसू लागले आहेत. दुसऱ्या बाजूचे बांधकाम अद्याप सुरू असताना पहिल्याच टप्प्यात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “काम पूर्ण होण्याआधीच रस्ता खचत असेल, तर पुढील काही वर्षांत परिस्थिती किती गंभीर होईल?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही पुलांना उद्घाटनापूर्वीच भेगा पडल्याचे प्रकार घडले होते, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोप झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करत कामांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही.

नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्गांना ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी मजबूत रस्ते अत्यावश्यक असताना प्रत्यक्षात सुरू असलेली भोंगळ कामे नागरिकांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.