गडचिरोली वनवृत्तात खळबळ; आसरअल्लीचे क्षेत्र सहाय्यक विनोद गोल्लेवार निलंबित

गडचिरोली : गडचिरोली वनवृत्तात खळबळ उडवून देणारी कारवाई समोर आली असून, सिरोंचा वनविभागांतर्गत आसरअल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्र सहाय्यक विनोद रामजी गोल्लेवार यांच्यावर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. थेट मुख्य वनसंरक्षक स्तरावरून झालेल्या या कारवाईमुळे वनविभागातील प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, आसरअल्ली येथील क्षेत्र सहाय्यक पद यापूर्वीही वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. याच पदावर कार्यरत असलेल्या तत्कालीन क्षेत्र सहाय्यक कादिर शेख यांच्यावर सागवान तस्करी प्रकरणात तत्कालीन उपवनसंरक्षक पूनम पाटील यांच्या कार्यकाळात निलंबनाची कारवाई झाली होती. आता पुन्हा याच पदावरील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील प्रशासकीय कारभाराबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

निलंबनाच्या कालावधीत गोल्लेवार यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग कार्यालय येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, भामरागडच्या उपवनसंरक्षकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गोल्लेवार यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून प्रारूप दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक, सिरोंचा यांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. निलंबनाच्या कारणाचा सखोल अभ्यास सुरू असून, याबाबत लवकरच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी थेट केलेल्या या कारवाईमागील नेमके प्रकरण काय आहे, याकडे आता वनविभागासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

चिंकारा शिकार प्रकरणाला अखेर पूर्णविराम; आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम निर्दोष मुक्त; नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

अहेरी : तब्बल १८ वर्षांपासून चर्चेत असलेल्या बहुचर्चित चिंकारा शिकार प्रकरणाला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. दोन चिंकारा हरणे व दोन सशांची शिकार केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आठ आरोपींची सासवड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या निर्णयामुळे २००८ पासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ न्यायालयीन प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

२००८ पासून सुरू होता न्यायालयीन प्रवास : पुणे जिल्ह्यातील चौधरवाडी परिसरात दोन चिंकारा आणि दोन सशांची शिकार केल्याचा आरोप तत्कालीन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर ठेवण्यात आला होता. वन विभागाच्या तक्रारीवरून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ तसेच भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आत्राम यांच्यासह मित्र, चालक आणि सुरक्षा रक्षक अशा एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले होते. तत्कालीन तपास यंत्रणेकडून कागदपत्रे व सरकारी साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती; मात्र विविध कायदेशीर व प्रक्रियात्मक कारणांमुळे खटला दीर्घकाळ प्रलंबित राहिला.

साक्षीदार हजर करण्यात अभियोजन पक्ष अपयशी : न्यायालयीन आदेशानुसार, अभियोजन पक्षाला अनेक वेळा संधी देऊनही साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करता आली नाही. १० एप्रिल २०२६ नंतर १४ मे, २४ जून, ७ जुलै आणि २१ जुलै रोजी सुनावणीच्या तारखा देण्यात आल्या; मात्र खटला पुढे नेण्यासाठी अपेक्षित प्रभावी कार्यवाही झाली नाही. केवळ भविष्यात अभियोजन पक्ष आवश्यक पावले उचलेल या अपेक्षेवर फौजदारी कार्यवाही अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २४७ अन्वये कार्यवाही समाप्त करण्यात आली.

१८ वर्षांच्या प्रकरणातून आत्राम यांना मोठा दिलासा : या प्रकरणामुळे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजकीय कारकिर्दीवर अनेक वर्षे परिणामकारक चर्चा झाली. आरोपानंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागल्याचा संदर्भही या प्रकरणाशी जोडला गेला. तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयीन कार्यवाही समाप्त झाल्याने आत्राम यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या समर्थकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेला अखेर पूर्णविराम मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागरिक-कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण : या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर अहेरी परिसरात नागरिक आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेल्या प्रकरणाचा न्यायालयीन शेवट झाल्याने आत्राम समर्थकांसह त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, न्यायालयाने हा निर्णय आरोपांचे पुरावे तपासून आरोपी दोषी नसल्याचे ठरवून दिलेला नसून, अभियोजन पक्षाकडून साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात आलेल्या अपयशामुळे कायद्यानुसार कार्यवाही समाप्त केली आहे. त्यामुळे २००८ पासून सुरू असलेल्या चिंकारा शिकार प्रकरणाच्या प्रदीर्घ न्यायालयीन प्रवासावर अखेर पडदा पडला आहे.

गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेची नवी कार्यकारिणी जाहीर; शरद कोलेटीवार अध्यक्षपदी

गडचिरोली : श्री माता वासवी कन्यका मंदिर, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेची जिल्हास्तरीय महासभेची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. श्री पद्मावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महासभेचे राज्य संघटक श्री. प्रदीप कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. राजूभाऊ मुक्कावार, श्री. दीपकभाऊ निलावार, श्री. गजानन कोटावार आणि श्री. धनंजय ताटल्लीवार यांच्या समन्वयातून निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी जिल्हा महासभेच्या अध्यक्षपदी श्री. शरद कोलेटीवार, सचिवपदी श्री. संतोष तंगडपल्लीवार तर कोषाध्यक्षपदी श्री. नंदकिशोर ओल्लालवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. प्रकाश गुडेलिवार, श्री. अनिल गोगुलवार, श्री. समीर कटकमवार, श्री. मधुकर पुल्लूरवार आणि श्री. जगदीश कोंकमुट्टीवार यांची निवड झाली. सहसचिवपदी श्री. प्रशांत रागीवार व श्री. नितीन बट्टूवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. संजय यमसलवार तर कार्याध्यक्षपदी श्री. प्रशांत तम्मेवार यांची निवड करण्यात आली.

तसेच सल्लागारपदी श्री. संजय नार्लवार आणि श्री. संतोष संगनवार यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजाची एकजूट मजबूत करणे, युवकांचे सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित समाजबांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक उपक्रमांना प्राधान्य देत जिल्ह्यात महासभेचे कार्य अधिक प्रभावी व व्यापक करण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. शरद कोलेटीवार यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्हा आर्य वैश्य महासभेला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.

वनसंपदेतून रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय; आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ कार्यान्वित

गडचिरोली : जिल्ह्याच्या वनसंपदेला रोजगार, कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगाची जोड देणाऱ्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण मंगळवारी (२५ ऑगस्ट) शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे उत्साहात करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक सौ. दिव्यभारती (भा.व.से.), विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, भामरगडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ५९ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेतून हे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिक प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच GeM पोर्टलच्या माध्यमातून अत्याधुनिक काष्ठ प्रक्रिया मशिनरी खरेदी करून ती केंद्रात बसविण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक काष्ठ प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, स्थानिक लाकडापासून दर्जेदार आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती शक्य होणार आहे.

आलापल्ली व परिसरातील स्थानिक तरुणांना अत्याधुनिक काष्ठ प्रक्रियेचे मोफत प्रात्यक्षिक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तसेच केंद्रात प्रत्यक्ष रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकडाचा वापर करून ‘कस्टमाइज्ड फर्निचर डिझाईन’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन मजबूत, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक फर्निचर तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होईल.
या केंद्राचा लाभ केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित राहणार नसून, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शाळांसाठी आवश्यक फर्निचर याच केंद्रातून तयार करून पुरविण्याची योजना आहे. त्यामुळे स्थानिक सुतार, कारागीर आणि लघुउद्योजकांना मोठ्या प्रमाणात काम मिळण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मौल्यवान सागवान लाकडाला स्थानिक पातळीवरच मूल्यवर्धन करून त्याचे अंतिम उत्पादन तयार करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वाचे ठरत आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रात मोठ्या संख्येने महिलांना रोजगार मिळाला असून, सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते रोजगार मिळालेल्या महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे काष्ठ प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य, रोजगार आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळत आहे.

‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पनेला मिळणार बळ
गडचिरोलीतील लाकूड बाहेर पाठविण्याऐवजी त्यावर जिल्ह्यातच प्रक्रिया करून अंतिम वस्तू तयार करण्याची ‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पना या केंद्रामुळे प्रत्यक्षात येणार आहे. स्थानिक कच्च्या मालाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन झाल्याने जिल्ह्याचा पैसा जिल्ह्यातच राहून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. वनसंपदेचा स्थानिक विकासासाठी योग्य आणि नियोजनबद्ध वापर करताना रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. “जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळ उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील मौल्यवान सागवान लाकडापासून विविध वस्तू व फर्निचर तयार करून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा प्रयत्न आहे,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक, महिला आणि कामगारांनी स्वागत केले आहे.

जांभिया आश्रमशाळेतील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; माहिती मागताच मुख्याध्यापकांचा पत्रकारांना नकार

भामरागड : आदिवासी प्रकल्प कार्यालय, भामरागड अंतर्गत येणाऱ्या जांभिया येथील शासकीय आश्रमशाळेतील कथित गैरसोयी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना मुख्याध्यापकांनी माहिती देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. “परवानगी घेऊन या, त्यानंतर माहिती देतो,” असे सांगत त्यांनी पत्रकारांशी अभद्र शब्दांत संवाद साधल्याचा आरोप आहे.

पत्रकारांनी शाळेतील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारे चित्र दिसून आल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव असणे तसेच काही विद्यार्थी आजारी असल्याचे निदर्शनास आल्याचे पत्रकारांनी नमूद केले.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, निवास आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना त्यासंदर्भात अधिकृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुख्याध्यापकांनी पत्रकारांना माहिती देण्यास नकार दिल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना प्रत्यक्षात त्या सुविधांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित आदिवासी प्रकल्प कार्यालयाने जांभिया आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांच्या निवास, स्वच्छता व आरोग्य सुविधांची वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्याध्यापकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी परवानगीशिवाय माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणातील प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दुर्गम भागातील स्वप्नांना पोलिसांचे बळ; ३०० हून अधिक विद्यार्थी-युवकांना मदतीचा हात

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांच्या स्वावलंबनाला बळ देणारा उपक्रम राबविला. पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ९० शालेय विद्यार्थ्यांना सायकली, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना टू-व्हिलर रिपेअरिंग व फास्टफूड व्यवसायासाठी आवश्यक किट, तर तीन बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते ९० विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. यासोबतच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या वाटेवरील अडथळे कमी करून विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. गडचिरोली पोलीस दल आणि बँक ऑफ इंडिया आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० दिवसांचे टू-व्हिलर रिपेअरिंग तसेच १२ दिवसांचे फास्टफूड व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाला आता प्रत्यक्ष व्यवसायाची जोड मिळून तरुणांना उत्पन्नाचे साधन उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

याशिवाय तीन बचत गटांना वाद्य साहित्य संच देण्यात आले. दुर्गम भागातील युवक-युवती आणि बचत गटांच्या कलागुणांना तसेच त्यांच्या उपजीविकेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचा यामागील उद्देश आहे. कार्यक्रमात बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी, तर प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींनी उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन केले. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पोलीस दादालोरा खिडकी’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’मधून आतापर्यंत १६ हजार ७०८ युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, १ हजार ५४२ नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५ सार्वजनिक वाचनालये आणि स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ४ हजार ७९६ विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत १४ लाख ९ हजार ५३२ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके यांच्यासह पोलीस अंमलदारांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षणाला साधनांची साथ, युवकांना रोजगाराचे बळ आणि बचत गटांना स्वावलंबनाची दिशा देण्याचा पोलिसांचा प्रयत्न अधोरेखित झाला.

खाटा नाहीत, सुरक्षेची हमीही नाही! गडचिरोलीतील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्ह्यात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, आणखी तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच अथवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींची निवासव्यवस्था, पुरेशा खाटांचा अभाव, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याने सर्पदंशाचा धोका वाढला का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आश्रमशाळेतही हळहळ व्यक्त होत आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेत कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये सर्पप्रतिबंधक उपाययोजना, पुरेशा खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून उमटली कलागुणांची रंगीत दुनिया; ताटीगुडम येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

अहेरी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालचित्रकला स्पर्धा–२०२६ चे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम, केंद्र राजाराम, पंचायत समिती अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या स्पर्धेत शाळेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजनावेळी मु.अ. कल्पना रागीवार, प्राथमिक शिक्षक श्री. पेंदाम सर, कटकरवार सर व दुर्गे सर उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील विविध पैलू समजून घेण्यास तसेच आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेतील वातावरण कलामय झाले होते. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांचा कट उधळला; शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा जप्त

गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही महत्त्वपूर्ण यशस्वी मोहीम ठरली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणहिता विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान शोधमोहिमेसाठी रवाना झाले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी कुमनार जंगल परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेली एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लाँचर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी आणि दोन बॅटऱ्या असा मोठा शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, नक्षलवादी संघटना कमकुवत झाल्यानंतरही जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे व स्फोटके शोधून काढण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी २३ मे, २७ मे, २७ जून आणि १ ऑगस्ट रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गुप्तवार्ता शाखा, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले.

भामरागडच्या पुरात अडकलेल्या रुग्णाला हेलिकॉप्टरने रुग्णालयात; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना गडचिरोली पोलिसांनी वेळेशी शर्यत करत लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. प्रशासन आणि पोलिसांच्या या धाडसी व तत्पर बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी (३५) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे अशक्य झाले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधत ‘पवन हंस’ हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.

हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या बचाव मोहिमेत भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.