शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा अन् आल्लापल्लीत जल्लोष! स्थानिक विद्यार्थी व नागरिकांची मुख्य चौकात आतषबाजी.

आल्लापल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थानिक नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष साजरा केला. आल्लापल्ली येथील मुख्य चौकात नागरिकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या मते, गेल्या काही काळापासून राज्यातील व विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागांतील शैक्षणिक समस्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत होते. परीक्षांमधील गोंधळ, शिष्यवृत्तीतील विलंब आणि स्थानिक शैक्षणिक गरजांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आता आगामी काळात शिक्षण खात्याच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आल्लापल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी चौकात “शिक्षण व्यवस्था सुधारलीच पाहिजे” अशा घोषणाही देण्यात आल्या.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

खड्ड्यांचा महामार्ग की विकासाचा अडथळा? आलापल्ली–सिरोंचा NH पाहणीत अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब

आलापल्ली : जिल्ह्याच्या दळणवळणाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी दाखल झाले. मात्र तब्बल सहा वर्षांपासून सुरू असलेल्या दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि कथित अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी, “गेल्या सहा वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. केवळ पाहणी आणि आश्वासने नकोत, तर दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ काम पूर्ण करा,” अशी ठाम भूमिका मांडली.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी तेलंगणा राज्यातून पाहणीसाठी आल्याचे समोर आल्यानंतर संतोषभाऊ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “साहेब, तुम्ही तेलंगणातून वर्षातून एकदा पाहणीसाठी येता; पण आम्ही मात्र रोज जीव मुठीत धरून या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करतो,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नाही, अपघातांचा धोका कायम असतो, गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेणे जीवघेणे ठरत आहे, रुग्णवाहिका अडकतात, तर मालवाहतूक विस्कळीत झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली. “हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

पाहणीनंतर अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी कामाला गती देण्यासह दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र गेल्या सहा वर्षांच्या अनुभवामुळे नागरिकांचा आश्वासनांवरील विश्वास उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी दिला.

तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडणारा आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग हा परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र त्याची झालेली दुरवस्था विकासालाच खीळ घालत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आलापल्लीत चक्का जाम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आलापल्ली : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आलापल्ली मधील वीर बाबुराव शेडमाके चौक येथे गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेले चक्का जाम आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी झाले.

सकाळी नऊ वाजल्यापासून विविध सामाजिक संघटना, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. मात्र आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. आंदोलकांनी संविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवत केंद्र सरकारने विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने हे आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

गडचिरोलीत १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांच्या महिंद्रा एम. शॉपी स्पेअर पार्ट्स सेंटरचे दिमाखात उद्घाटन

गडचिरोली : : अवघ्या १९ व्या वर्षी उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकत तरुण उद्योजक शाहिद शेख यांनी गडचिरोली शहरात महिंद्रा कंपनीच्या अधिकृत ‘एम. शॉपी’ स्पेअर पार्ट्स सेंटरची सुरुवात केली आहे. या आधुनिक स्पेअर पार्ट्स सेंटरचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार दीपकदादा आत्राम, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, तसेच महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी मुकेश रॉय, रजत शर्मा आणि कपिल सुतारिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

अवघ्या १९ वर्षांच्या वयात व्यवसाय क्षेत्रात धाडसी पाऊल उचलत शाहिद शेख यांनी सुरू केलेला हा उपक्रम गडचिरोलीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण व आदिवासीबहुल भागात आधुनिक आणि अधिकृत वाहन सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाहिद शेख यांचे अभिनंदन करत, गडचिरोलीसारख्या वाढत्या जिल्ह्यात महिंद्राच्या अधिकृत स्पेअर पार्ट्स सेंटरची गरज अधोरेखित केली. या नव्या केंद्रामुळे वाहनधारकांना दर्जेदार, अस्सल आणि विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सेवाही अधिक सुलभ होणार आहेत.

महिंद्रा कंपनीच्या अधिकृत नेटवर्कमधील हे सेंटर असल्याने ग्राहकांना कंपनीमान्य दर्जाचे स्पेअर पार्ट्स, गुणवत्तेची हमी आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोली व परिसरातील महिंद्रा वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, वाहनधारक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी आणि तरुण उद्योजकतेचा गौरव करणाऱ्या वातावरणात पार पडला.

EVM वर मतदान, विद्यार्थ्यांनी निवडला ‘बाल मुख्यमंत्री’; शिवणीपाठ शाळेचा लोकशाहीचा अनोखा उपक्रम

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात पंचायत समिती अहेरी अंतर्गत केंद्र बोरी येथील शिवणीपाठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि. २१ जुलै) ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) द्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा लोकशाही अनुभव घेण्याची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबविला. ईव्हीएमच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने मतदान घेण्यात आले आणि त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.

निवडणुकीत अथर्व संतोष तलांडे यांची शालेय मुख्यमंत्री, तर नव्या नाशिक मोहुर्ले यांची शालेय उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळ
मुख्यमंत्री – अथर्व संतोष तलांडे
उपमुख्यमंत्री – नव्या नाशिक मोहुर्ले
शिक्षणमंत्री – रिधान्थ हरिचंद निकेसर
क्रीडामंत्री – आरव बलवंत वेलादी
जल व स्वच्छतामंत्री – रुहानी मधुकर वेलादी
आरोग्यमंत्री – ओम अरुण ठाकरे
पोषण आहारमंत्री – समीर राजेश वेलादी
विद्युतमंत्री – श्रेयश श्रीकांत वाढई

शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित बाल मंत्रिमंडळाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मीनाताई वेलादी, उपसरपंच सविता कोकीरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनमंतू कुळमेथे, अंगणवाडी सेविका ज्योतीताई कुळमेथे यांच्यासह समिती सदस्य हरिचंद्र निकेसर, सुरेखा ठाकरे, शारदा तलांडे, सुवर्णा मोहुर्ले, रसिका वेलादी तसेच ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा अभिनव शैक्षणिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रविंद्र रत्नाकर यमसलवार आणि सहशिक्षिका सुरेखा नागो मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. ईव्हीएमच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या अनोख्या निवडणूक उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि उपस्थित नागरिकांनी कौतुक करत शाळेच्या या लोकशाहीवादी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

शासन तुमच्या दारी! अहेरीत २२ जुलैला विविध विभागांचे संयुक्त समाधान शिबिर

अहेरी : नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत २२ जुलै रोजी अहेरी येथील वासवी सभागृहात भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २२, २५ आणि २६ जुलै या तीन दिवसांपैकी एका दिवशी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी २२ जुलैचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

या शिबिरात अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या पाचही तालुक्यांतील महसूल, पंचायत राज, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, बँका तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक विभागाचा स्वतंत्र स्टॉल उभारून विविध योजनांची माहिती, अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विशेष प्रदर्शनीही भरविण्यात येणार असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांचे हेलपाटे न मारता अनेक सेवा आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांची नोंदणी, अर्ज, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि योजनांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जनजागृती वाढविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन नागरिकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी २२ जुलै रोजी वासवी सभागृहात आयोजित या भव्य महसूल समाधान शिबिरात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

जिमलगट्टा पोलिसांचा मोठा दणका; प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूसह 10.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात जिमलगट्टा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल एम. मडावी यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार एमएच-24 एएफ-1901 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनातून जिमलगट्टा ते देवलभेडा (देचलीपेठा परिसर) मार्गावर प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

माहितीची शहानिशा करताच राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश पायगन, पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरे तसेच पोलीस कर्मचारी मोरेश्वर करमे, राकेश पालकूर्तीवार, रविकुमार सुन्करी, रामकिशन बडदे आणि बिप्लव किरटोनिया यांनी दोन पंचांसमक्ष जिमलगट्टा येथे सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनातून ‘मजा 108 हुक्का शिशा तंबाखू’चे 160 डबे (किंमत 1.92 लाख रुपये) आणि ‘होला हुक्का शिशा तंबाखू’ची 40 पॅकेट्स (किंमत 80 हजार रुपये) असा एकूण 2.72 लाख रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 8 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 10 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणात प्रशांत अंजय्या याडावर (वय 45), रा. वॉर्ड क्र. 12, गडचिरोली याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात तो प्रतिबंधित हुक्का शिशा तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत असून, या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेते आणि तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जिमलगट्टा पोलीस करीत आहेत.

जिद्दीसमोर संकटांनी टाकली हार! रशियातून एमबीबीएस पूर्ण करत डॉ. साक्षी मद्देर्लावार यांनी साकारले डॉक्टर होण्याचे स्वप्न

गडचिरोली : स्वप्न मोठे असेल तर संकटेही मोठी असतात. मात्र, त्या संकटांवर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करता येते, हे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. साक्षी किशोर मद्देर्लावार यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. रशियातील Privolzhsky Research Medical University, Nizhny Novgorod येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतातील एफएमजीई (Foreign Medical Graduate Examination) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत डॉक्टर होण्याचे आपले बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.

लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात काम करून समाजसेवा करण्याचे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले होते. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्यांच्यावर विश्वास ठेवत रशियात शिक्षणासाठी पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंबाच्या विश्वासानेच त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली.

परदेशात गेल्यानंतर भाषा, संस्कृती, हवामान आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान होते. विशेषतः रशियन भाषा शिकणे सुरुवातीला कठीण वाटले. मात्र, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीमुळे त्यांनी रशियन भाषेवर प्रभुत्व मिळवत वैद्यकीय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

सहा वर्षांच्या शिक्षणादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या धक्क्याने त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. तरीही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सावरले आणि अधिक जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. हा संघर्ष त्यांच्या यशाला अधिक प्रेरणादायी बनवणारा ठरला.

रशियातील शिक्षणाने त्यांना वैद्यकीय ज्ञानाबरोबरच शिस्त, संयम, कठोर परिश्रम आणि जागतिक दृष्टिकोन दिला. पदवीदानाचा क्षण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्या इंटर्नशिप, वैद्यकीय परवाना प्रक्रिया आणि पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी तयारी करत आहेत.

डॉ. साक्षी यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचे उदाहरण आशेचा किरण ठरत आहे.

‘स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्याकडे चालत येईल’ — डॉ. साक्षी मद्देर्लावार

“डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला. परदेशात राहून शिक्षण घेणे, कुटुंबापासून दूर राहणे आणि वडिलांच्या निधनाचा आघात सहन करणे सोपे नव्हते. पण मी कधीही हार मानली नाही. माझी आई, दिवंगत वडील आणि भाऊ यांनी दिलेला विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छिते की, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य आणि शिस्त कायम ठेवा. इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आजचा संघर्षच उद्याच्या यशाचा पाया असतो.”

शेतीपूर्वी पांडुम पूजेला प्राधान्य; वांगेपल्लीत आदिवासी परंपरेचे दर्शन

वांगेपल्ली : आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेली पांडुम पूजा यंदाही वांगेपल्ली गावात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामांना प्रारंभ करण्यापूर्वी गावातील सर्व शेतकरी आणि समाजबांधव एकत्र येऊन ही पूजा करतात.

गावातील वयोवृद्धांच्या मते, पांडुम पूजा केल्यानंतरच शेतीची कामे, जसे की बीज पेरणी, रोवणी आणि इतर कृषी कार्य सुरू करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या परंपरेमुळे शेतीत चांगले उत्पन्न मिळते आणि गावात सुख-समृद्धी नांदते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

यंदाही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पांडुम पूजा विधीपूर्वक पार पाडत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांनी नव्या पिढीला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा, संस्कृती आणि रूढी जपण्याचे आवाहन केले.

“आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा ही आपली ओळख आहे. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पांडुम पूजेच्या माध्यमातून वांगेपल्ली गावात सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालयाला हिरवा कंदील; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुख्यालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी ही माहिती देताना, येत्या ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेने २ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये देशभरातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी गडचिरोलीतील विद्यालय आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

सध्या विद्यालयाची सुरुवात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठी आवश्यक जागा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नावे हस्तांतरित केली असून, वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक इमारतही उपलब्ध करून दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वर्गखोल्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने उच्च वर्गांची भर घालण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी आणि इतर कायदेशीर औपचारिकता जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

दरम्यान, तात्पुरत्या इमारतीत शैक्षणिक कामकाज सुरू असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी भव्य इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.