वनसंपदेतून रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय; आलापल्लीत ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ कार्यान्वित

गडचिरोली : जिल्ह्याच्या वनसंपदेला रोजगार, कौशल्य विकास आणि स्थानिक उद्योगाची जोड देणाऱ्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण मंगळवारी (२५ ऑगस्ट) शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे उत्साहात करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या ‘नाविन्यपूर्ण योजना २०२४-२५’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक सौ. दिव्यभारती (भा.व.से.), विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, भामरगडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ आणि तहसीलदार बालाजी सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ५९ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेतून हे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिक प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच GeM पोर्टलच्या माध्यमातून अत्याधुनिक काष्ठ प्रक्रिया मशिनरी खरेदी करून ती केंद्रात बसविण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक काष्ठ प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, स्थानिक लाकडापासून दर्जेदार आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती शक्य होणार आहे.

आलापल्ली व परिसरातील स्थानिक तरुणांना अत्याधुनिक काष्ठ प्रक्रियेचे मोफत प्रात्यक्षिक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तसेच केंद्रात प्रत्यक्ष रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकडाचा वापर करून ‘कस्टमाइज्ड फर्निचर डिझाईन’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन मजबूत, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक फर्निचर तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होईल.
या केंद्राचा लाभ केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित राहणार नसून, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये आणि शाळांसाठी आवश्यक फर्निचर याच केंद्रातून तयार करून पुरविण्याची योजना आहे. त्यामुळे स्थानिक सुतार, कारागीर आणि लघुउद्योजकांना मोठ्या प्रमाणात काम मिळण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मौल्यवान सागवान लाकडाला स्थानिक पातळीवरच मूल्यवर्धन करून त्याचे अंतिम उत्पादन तयार करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही हे केंद्र महत्त्वाचे ठरत आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रात मोठ्या संख्येने महिलांना रोजगार मिळाला असून, सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते रोजगार मिळालेल्या महिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे काष्ठ प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य, रोजगार आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा मिळत आहे.

‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पनेला मिळणार बळ
गडचिरोलीतील लाकूड बाहेर पाठविण्याऐवजी त्यावर जिल्ह्यातच प्रक्रिया करून अंतिम वस्तू तयार करण्याची ‘मेक इन डिस्ट्रिक्ट’ संकल्पना या केंद्रामुळे प्रत्यक्षात येणार आहे. स्थानिक कच्च्या मालाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन झाल्याने जिल्ह्याचा पैसा जिल्ह्यातच राहून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. वनसंपदेचा स्थानिक विकासासाठी योग्य आणि नियोजनबद्ध वापर करताना रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. “जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्रशिक्षण केंद्र, काष्ठ प्रक्रिया केंद्र, कार्यालय आणि वाहनतळ उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील मौल्यवान सागवान लाकडापासून विविध वस्तू व फर्निचर तयार करून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा प्रयत्न आहे,” असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक, महिला आणि कामगारांनी स्वागत केले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

जांभिया आश्रमशाळेतील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; माहिती मागताच मुख्याध्यापकांचा पत्रकारांना नकार

भामरागड : आदिवासी प्रकल्प कार्यालय, भामरागड अंतर्गत येणाऱ्या जांभिया येथील शासकीय आश्रमशाळेतील कथित गैरसोयी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना मुख्याध्यापकांनी माहिती देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. “परवानगी घेऊन या, त्यानंतर माहिती देतो,” असे सांगत त्यांनी पत्रकारांशी अभद्र शब्दांत संवाद साधल्याचा आरोप आहे.

पत्रकारांनी शाळेतील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारे चित्र दिसून आल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव असणे तसेच काही विद्यार्थी आजारी असल्याचे निदर्शनास आल्याचे पत्रकारांनी नमूद केले.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, निवास आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना त्यासंदर्भात अधिकृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुख्याध्यापकांनी पत्रकारांना माहिती देण्यास नकार दिल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना प्रत्यक्षात त्या सुविधांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. संबंधित आदिवासी प्रकल्प कार्यालयाने जांभिया आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांच्या निवास, स्वच्छता व आरोग्य सुविधांची वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्याध्यापकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी परवानगीशिवाय माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणातील प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दुर्गम भागातील स्वप्नांना पोलिसांचे बळ; ३०० हून अधिक विद्यार्थी-युवकांना मदतीचा हात

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिकांच्या स्वावलंबनाला बळ देणारा उपक्रम राबविला. पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ९० शालेय विद्यार्थ्यांना सायकली, स्वयंरोजगार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना टू-व्हिलर रिपेअरिंग व फास्टफूड व्यवसायासाठी आवश्यक किट, तर तीन बचत गटांना वाद्य साहित्य संचाचे वितरण करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते ९० विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. यासोबतच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, कंपास आदी शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या वाटेवरील अडथळे कमी करून विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. गडचिरोली पोलीस दल आणि बँक ऑफ इंडिया आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० दिवसांचे टू-व्हिलर रिपेअरिंग तसेच १२ दिवसांचे फास्टफूड व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६० युवक-युवतींना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणाला आता प्रत्यक्ष व्यवसायाची जोड मिळून तरुणांना उत्पन्नाचे साधन उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

याशिवाय तीन बचत गटांना वाद्य साहित्य संच देण्यात आले. दुर्गम भागातील युवक-युवती आणि बचत गटांच्या कलागुणांना तसेच त्यांच्या उपजीविकेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचा यामागील उद्देश आहे. कार्यक्रमात बोलताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी, तर प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींनी उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभारावा, असे आवाहन केले. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पोलीस दादालोरा खिडकी’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’मधून आतापर्यंत १६ हजार ७०८ युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, १ हजार ५४२ नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ७५ सार्वजनिक वाचनालये आणि स्किलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ४ हजार ७९६ विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत १४ लाख ९ हजार ५३२ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके यांच्यासह पोलीस अंमलदारांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षणाला साधनांची साथ, युवकांना रोजगाराचे बळ आणि बचत गटांना स्वावलंबनाची दिशा देण्याचा पोलिसांचा प्रयत्न अधोरेखित झाला.

खाटा नाहीत, सुरक्षेची हमीही नाही! गडचिरोलीतील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्ह्यात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, आणखी तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच अथवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींची निवासव्यवस्था, पुरेशा खाटांचा अभाव, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याने सर्पदंशाचा धोका वाढला का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आश्रमशाळेतही हळहळ व्यक्त होत आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेत कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये सर्पप्रतिबंधक उपाययोजना, पुरेशा खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून उमटली कलागुणांची रंगीत दुनिया; ताटीगुडम येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

अहेरी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालचित्रकला स्पर्धा–२०२६ चे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम, केंद्र राजाराम, पंचायत समिती अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या स्पर्धेत शाळेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजनावेळी मु.अ. कल्पना रागीवार, प्राथमिक शिक्षक श्री. पेंदाम सर, कटकरवार सर व दुर्गे सर उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील विविध पैलू समजून घेण्यास तसेच आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेतील वातावरण कलामय झाले होते. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांचा कट उधळला; शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा जप्त

गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही महत्त्वपूर्ण यशस्वी मोहीम ठरली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणहिता विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान शोधमोहिमेसाठी रवाना झाले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी कुमनार जंगल परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेली एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लाँचर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी आणि दोन बॅटऱ्या असा मोठा शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, नक्षलवादी संघटना कमकुवत झाल्यानंतरही जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे व स्फोटके शोधून काढण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी २३ मे, २७ मे, २७ जून आणि १ ऑगस्ट रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गुप्तवार्ता शाखा, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले.

भामरागडच्या पुरात अडकलेल्या रुग्णाला हेलिकॉप्टरने रुग्णालयात; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना गडचिरोली पोलिसांनी वेळेशी शर्यत करत लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. प्रशासन आणि पोलिसांच्या या धाडसी व तत्पर बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी (३५) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे अशक्य झाले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधत ‘पवन हंस’ हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.

हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या बचाव मोहिमेत भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.

आर्य वैश्य महासभेच्या वतीने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

अल्लापल्ली/नागेपल्ली : महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अल्लापल्ली तथा आर्य वैश्य कोमटी समाज अल्लापल्ली/नागेपल्ली यांच्या वतीने माजी वनमंत्री व आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला.

डॉ. चिमरालवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत रागीवार, विशेष भटपल्लीवार तसेच अल्लापल्ली-नागेपल्ली येथील पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

आर्य वैश्य समाजासाठी आदरणीय असलेले माजी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनमंत्रीपदाच्या काळात वृक्षारोपण, हवामान बदल व जमिनीची होणारी हानी रोखण्याबाबत केलेल्या कार्याची पावती म्हणून दरवर्षी त्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला जातो. “झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा” या संदेशासह हा उपक्रम राबविण्यात आला.

महासभेच्या गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, अहेरी, आल्लापल्ली व एटापल्ली येथील समाजबंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे वाढदिवस साजरा केला.

रेड अलर्टचा इशारा! चंद्रपूर-गडचिरोलीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

गडचिरोली : विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून २९ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय तसेच व्यावसायिक प्रशिक्षण संस्था बंद राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही रेड अलर्टमुळे शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा अन् आल्लापल्लीत जल्लोष! स्थानिक विद्यार्थी व नागरिकांची मुख्य चौकात आतषबाजी.

आल्लापल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थानिक नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष साजरा केला. आल्लापल्ली येथील मुख्य चौकात नागरिकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या मते, गेल्या काही काळापासून राज्यातील व विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागांतील शैक्षणिक समस्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत होते. परीक्षांमधील गोंधळ, शिष्यवृत्तीतील विलंब आणि स्थानिक शैक्षणिक गरजांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आता आगामी काळात शिक्षण खात्याच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आल्लापल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी चौकात “शिक्षण व्यवस्था सुधारलीच पाहिजे” अशा घोषणाही देण्यात आल्या.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.