उन्हाच्या तडाख्याने सिरोंचात ७०० वटवाघळांचा मृत्यू; पर्यावरणासमोर मोठे संकट

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे तब्बल ७०० वटवाघळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेमागील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने वटवाघळांचे वास्तव्य आहे. दिवसभर झाडांच्या फांद्यांवर उलटे लटकून विश्रांती घेणारी ही वटवाघळे रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. मात्र, गेल्या काही दिवसांतील तीव्र उकाडा आणि वाढते तापमान सहन न झाल्याने शेकडो वटवाघळे मृत अवस्थेत झाडाखाली आढळून आली. काही वटवाघळांचे मृतदेह अजूनही झाडांवर लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत वटवाघळांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून परिसरात मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेमुळे वटवाघळांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उष्माघात आणि निर्जलीकरणामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होऊन मृत्यू ओढवू शकतो. हजारोंच्या संख्येने एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या वटवाघळांवर उष्णतेच्या लाटेचा अधिक गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

वटवाघळे ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रजाती मानली जाते. फळे, मध, परागकण आणि किटकांवर उपजीविका करणारी वटवाघळे परागीभवन, बियांचा प्रसार आणि किटक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जंगल संवर्धन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान असते. जगभरात वटवाघळांच्या सुमारे १,४०० हून अधिक प्रजाती आढळतात. उष्णतेच्या वाढत्या संकटामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून वनविभागाने उर्वरित वटवाघळांसाठी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

४५ अंश तापमानात स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा; अहेरी आगारातील अव्यवस्थेवर संताप

अहेरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी शासनाने ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केल्याने अहेरी बस आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच विद्यार्थी व दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींसाठी आता स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

स्मार्ट कार्ड प्रक्रियेसाठी आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत असल्याने प्रत्येक प्रवाशामागे १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत आहे. अहेरी आगारात केवळ दोनच काउंटर सुरू असल्याने गर्दी वाढली असून कडक उन्हात तासन्‌तास उभे राहावे लागत आहे. सावली, पिण्याचे पाणी आणि बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांना चक्कर येणे व मळमळ होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी बांधवांना ऑनलाइन प्रक्रिया करणेही कठीण जात आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून अतिरिक्त काउंटर सुरू करणे, टोकन पद्धत लागू करणे तसेच गावपातळीवर विशेष शिबिरे घेण्याची मागणी प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आगारप्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केल्याचे सांगत लवकरच स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे.

एका मताची किंमत १० लाख? गडचिरोलीत ‘घोडेबाजार’ तेजीत

गडचिरोली / चंद्रपूर: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच तिन्ही जिल्ह्यांत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यंदाची निवडणूक नेहमीप्रमाणेच आर्थिक ताकद, गटबाजी आणि अंकीय गणितांमुळे कमालीची चर्चेत आली आहे. दक्षिण गडचिरोलीत झालेल्या एका गुप्त बैठकीत शेजारील जिल्ह्यातील एका बड्या कंत्राटदार आमदाराने पहिल्या टप्प्यात नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोकड देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणूक जाहीर होताच ‘घोडेबाजार’ आणि ‘पैशांच्या राजकारणा’ने विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत स्थानिक गटबाजी आणि आर्थिक समीकरणे कमालीची महत्त्वाची ठरत आहेत. या मतदारसंघात जवळपास ९७७ मतदार मतदान करणार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांपेक्षा वैयक्तिक संपर्क आणि आर्थिक लाभ देण्याच्या तयारीवर जोर दिला जात आहे. सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची विधान परिषद निवडणूक पैशांच्या प्रभावावरूनच निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील कंत्राटदार किंवा श्रीमंत चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील काँग्रेसचे सुमारे ६० ते ७० नगरसेवक अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेस नेत्यांची चिंता कमालीची वाढली आहे. या सर्व नगरसेवकांना ‘आगाऊ रक्कम’ (ॲडव्हान्स) देऊन अज्ञातस्थळी पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपचे स्थानिक नेते पूर्णपणे सक्रिय झाले असताना, काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचे वातावरण असून अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकूण ९७७ मतदारांपैकी सर्वाधिक ४४४ मतदार एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत, ज्यामुळे चंद्रपूर जिल्हा या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.

या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे २२१ तर भाजपचे १३६ नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसचा एवढा मोठा गट अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने पक्षात मोठी अस्वस्थता आणि पक्षांतराची भीती निर्माण झाली आहे. अज्ञातस्थळी गेलेल्या नगरसेवकांमध्ये चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली आणि इतर काही पालिकांमधील सदस्यांचा समावेश आहे. विरोधकांनी किंवा पक्षातीलच काही नाराज नेत्यांनी फूस लावून या नगरसेवकांना हलवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच आपल्या मतदारांची जुळवाजुळव करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र आणणे हे आता काँग्रेस नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

शंभर टक्के शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

गडचिरोली : प्रशासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २० ते ३० मे २०२६ या कालावधीत निवडक ग्रामपंचायतींमध्ये ‘विशेष सर्वेक्षण आणि सेवा संतृप्ती मोहीम’ राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा १०० टक्के लाभ पोहोचवणे, अपूर्ण नोंदी पूर्ण करणे आणि सेवा वितरण प्रक्रिया गतिमान करणे हा आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम संपूर्ण जिल्ह्यात युद्धपातळीवर राबवली जात आहे.

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे रविवारी (२४ मे) आपला ताफा घेऊन रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दुर्गम ‘ताटीगुडम’ पाड्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे, या दौऱ्यात थेट मुख्य सचिव कार्यालयातील चमूचे प्रतीक बावी आणि ऋषिकेश शिर्के हे देखील उपस्थित होते. पहिल्यांदाच मुख्य सचिव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू थेट खेड्यापाड्यांत आणि दुर्गम पाड्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या विशेष मोहिमेत अहेरी विधानसभेतील मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली व तोडसा, अहेरी तालुक्यातील ताटीगुडम, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर आणि भामरागड तालुक्यातील टेकला या विशिष्ट गावांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव कार्यालयातील चमूने शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत या विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी थेट लाभार्थ्यांच्या दारात जाऊन माहिती संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि १०० टक्के तपासणी करत आहेत.

प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, “या मोहिमेत निवडक गावातील प्रत्येक कुटुंबाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या शासकीय योजनांशी जोडले जाणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून आपली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा.” या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गो-तस्करीच्या जाळ्यावर पोलिसांचा शिकंजा ; २९३ तस्कर पोलिसांच्या रडारवर

चंद्रपूर : जिल्ह्यात वाढत्या अवैध गो-तस्करी, बेकायदेशीर कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेच्या घटनांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे जिल्हाभरातील तब्बल २९३ सराईत गो-तस्करांना विशेष प्रतिबंधक कारवाई कॅम्पसाठी हजर करण्यात आले. भविष्यात अशा गुन्ह्यांत पुन्हा सहभागी आढळल्यास थेट मकोकासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅम्पमध्ये अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदे पाटील, परिविक्षाधीन उपअधीक्षक सदानंद खत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक सराईत गुन्हेगाराची सविस्तर माहिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे, हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या नोंदीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर उपविभागातील गो-तस्कर पोलिसांच्या रडारवर असून, संघटित स्वरूपात गो-तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच या अवैध व्यवसायातून उभारलेली मालमत्ता शोधून ती जप्त करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गो-तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर सरकारजमा करण्यात येणार आहेत. या गुन्हेगारी साखळीला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील संघटित गो-तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात आहे.

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना आणि विविध साहित्य गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, घटनास्थळी सापडलेले सर्व साहित्य जवानांच्या मदतीने जागीच नष्ट करण्यात आले.

माओवादी संघटना सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी जंगल परिसरात शस्त्रे, स्फोटके आणि अन्य साहित्य गुप्तपणे जमिनीत पुरून ठेवत असत. निवडणुका, नक्षल सप्ताह किंवा इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर घातपातासाठी केला जात होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, पोलिस दल सातत्याने अशा लपवून ठेवलेल्या साठ्यांचा शोध घेत आहे.

१६ मे २०२६ रोजी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार २१ मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली.

२२ मे रोजी पोमकें-बिनागुंडा जंगल परिसरात कसून तपासणीदरम्यान पोलिसांना एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि फुटबॉल पाईपसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. या धाडसी मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.

लोढा डाऊनटाऊनमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड; २१ नायजेरियन नागरिक ताब्यात

ठाणे : ठाण्याच्या डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक प्रकरण समोर आले आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे गुप्त कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यातील दोन आरोपी हे विविध राज्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेले सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील अत्यंत आलिशान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘लोढा डाऊनटाऊन’ या सोसायटीत हे सर्व आरोपी बनावट नावांनी राहत होते. पोलिसांच्या तपासात अनेकजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अनेक राज्यांतील पोलीस या टोळीच्या शोधात होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवत हे आरोपी ठाणे जिल्ह्यात लपून राहत असल्याचे समोर आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी शनिवारी पहाटे संयुक्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. संपूर्ण लोढा डाऊनटाऊन परिसराला पोलिसांनी वेढा घालत संशयित फ्लॅट्सवर एकाचवेळी छापे टाकले. पहाटेच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्या २१ जणांपैकी दोन आरोपी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप आहेत. उर्वरित काही आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठ्यामागे याच टोळीचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या टोळीचे मुंबई आणि डोंबिवली परिसरातील नेटवर्क किती मोठे आहे, त्यांनी कोणाला ड्रग्ज पुरवठा केला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे ठाणे आणि मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अहेरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह बोलेरो जप्त, १४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली : जिल्हा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी मद्यसाठ्यासह बोलेरो कॅम्पर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन अहेरीच्या संयुक्त पथकाने २१ मे २०२६ रोजी सापळा रचून ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे मौजा आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर (क्र. एमएच १२ एस एक्स ६९८१) उभी असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनातून अवैध देशी व विदेशी दारू विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. सदर प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे व अहेरीचे प्रभारी अधिकारी पो.नि. हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

गडचिरोली ते मुंबई विकासाची नवी कनेक्टिव्हिटी; एक्सप्रेसवे, स्टील प्रकल्प आणि लाखो रोजगारांची घोषणा

मुंबई : ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने महाराष्ट्र वेगाने वाटचाल करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, वेगवान दळणवळण, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

The Hindu Conclave मध्ये ‘मुंबई ते सुरजागड – समृद्धीचा महामार्ग’ या विषयावर बोलताना त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, परिवहन, पर्यावरण आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांतील विकासाचा विस्तृत आढावा मांडला. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असून गडचिरोलीसारखे भाग नैसर्गिक आणि औद्योगिक संपत्तीने समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी विकास केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागांपर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग, मेट्रो जाळे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, स्टील प्रकल्प आणि कौशल्य विकास केंद्रांमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. “कोस्ट टू फॉरेस्ट” असा विकासाचा प्रवास राज्याने गेल्या काही वर्षांत घडवून आणला असल्याचेही त्यांनी नमूद केले. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून काम करताना नक्षलग्रस्त भागांमध्ये जाऊन स्थानिक नागरिक, आदिवासी समाज आणि पोलिसांशी संवाद साधत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रक्षाबंधन आणि दिवाळीसारखे सणही जवानांसोबत गडचिरोलीत साजरे केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

गडचिरोलीत रस्ते, पूल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट आणि प्रशासनासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या असून केवळ सुविधा नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणे ही सरकारची प्रमुख भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Tata Technologies च्या सहकार्याने १७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करण्यात आलेले ‘टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र’ दरवर्षी सुमारे ४,८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजक निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान Narendra Modi आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या नेतृत्वामुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचे सांगत त्यांनी गडचिरोलीत उद्योग, इंटरनेट सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे नमूद केले. कोनसरी येथे Lloyds Metals and Energy Limited सोबत २० हजार कोटी रुपयांच्या ‘इंटिग्रेटेड स्टील प्लांट’साठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच सुरजागड इस्पात प्रकल्पातून आणखी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ८ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी ८५ किलोमीटरच्या ग्रीनफिल्ड रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते गडचिरोली प्रवास ९ ते १० तासांत पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्यासही मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ‘डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट-२०२५’मध्ये १२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यामधून १७,४३१ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे १.४४ लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात सध्या जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याचे सांगत त्यांनी अटल सेतू, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, मेट्रो विस्तार आणि वाढवण बंदर यांसारखे प्रकल्प राज्याच्या भविष्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले. “मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ६० मिनिटांत पोहोचता आले पाहिजे,” हे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गृहनिर्माण क्षेत्रातही मोठे बदल करण्यात येत असून ‘माय होम – माय राईट’ संकल्पनेतून २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एआय आधारित केंद्रीकृत डिजिटल हाऊसिंग पोर्टल, क्लस्टर रीडेव्हलपमेंट आणि पुनर्विकास प्रकल्पांना प्राधान्य देत प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. धारावी पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठ्या आधुनिक पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनावर भर देताना समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि ठाणे-बोरीवली टनेल यांसारख्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी रेसकोर्स येथे २९५ एकरांचे सेंट्रल पार्क, ठाण्यात ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ तसेच राज्यभरात ३९४ ‘नमो गार्डन्स’ उभारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर नियंत्रणासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पंपिंग स्टेशन, आयफ्लोज प्रणाली आणि मिठी नदी सुधारणा प्रकल्पही राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन मांडताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसारख्या आर्थिक केंद्रासोबतच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांनाही उद्योग, रोजगार, शिक्षण, रस्ते आणि आधुनिक सुविधांशी जोडण्याचे काम सरकार करत असल्याचे सांगितले. विकासाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचे नेतृत्व करणारे राज्य बनवण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपुरात वाघिणीचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर झडप; 4 जणींचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघिणीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही दुर्मिळ आणि गंभीर घटना मानली जात आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील ‘भट्टी मोहल्ला’ परिसरातील 13 महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. खैरीचक परिसरातील दाट जंगलात त्या काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका मादी वाघिणीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिलांनी प्रसंगावधान राखत जंगलातून जीव वाचवत पळ काढला. आपल्या सहकाऱ्यांना वाघिणीने ओढून नेत असल्याचे भयावह दृश्य पाहून उर्वरित महिला प्रचंड हादरल्या आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील असून परस्पर नातेवाईक असल्याने गुंजेवाही गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

कविता दादाजी मोहुर्ले (45)

अनिता दादाजी मोहुर्ले (46)

संगीता संतोष चौधरी (40)

सुनीता कौशिक मोहुर्ले (35)

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. तसेच या परिसरात वाढत्या वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.