मरपल्लीत दुहेरी संकट: आधीच वारंवार खंडित होणारी वीज, त्यात BSNL टॉवरही १० दिवसांपासून ठप्प!

अहेरी/मरपल्ली: राष्ट्रीय महामार्गावरील उमानूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मरपल्ली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या नागरिकांना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उमानूर आणि मरपल्ली परिसरात आधीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या कायम आहे. सततच्या भारनियमनामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त असतानाच, आता गेल्या दहा दिवसांपासून मरपल्ली येथील बीएसएनएल (BSNL) मोबाईल टॉवर पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे आधीच विजेअभावी त्रस्त असलेल्या या संपूर्ण परिसरातील संपर्क यंत्रणाही कोलमडून पडली असून परिसर पूर्णपणे संपर्कविहीन झाला आहे.

मरपल्ली येथे पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, विविध शासकीय-निमशासकीय विभागांचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण वास्तव्यास आहेत. मात्र, वीज नसणे आणि त्यातच बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे दैनंदिन संपर्क, ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे कोलमडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दुर्गम भागात वीज आणि नेटवर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. वीज पुरवठा खंडित असताना मोबाईलचे नेटवर्कही उपलब्ध नसल्यामुळे गावात एखादी वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, आरोग्य सेवा किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर समस्येमुळे मरपल्ली आणि उमानूर लगतच्या अनेक गावांतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित वीज वितरण कंपनी आणि बीएसएनएल विभागाने या दुहेरी समस्येची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा आणि बंद पडलेला टॉवर त्वरित सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

मोहरम उत्सवासाठी अहेरी पोलिसांची जय्यत तयारी; १०० हून अधिक पोलीस बळासह रूट मार्च

अहेरी : आगामी मोहरम उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अहेरी पोलिसांनी आज दिनांक २५ जून २०२६ रोजी शहरातून भव्य रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मोहरम उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारीचा भाग म्हणून सायंकाळी ४.३० ते ५.२० वाजेपर्यंत अहेरी पोलीस स्टेशन येथे दंगा काबू पथकाची (दंगा नियंत्रण पथक) तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रूट मार्च काढण्यात आला.

हा रूट मार्च अहेरी पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन मज्जित चौक, आझाद चौक, दानशूर चौक, राजवाडा रोड, गांधी चौक, गड अहेरी रोड या मार्गाने काढण्यात आला. शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करत हा मार्च पुन्हा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये ४ पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून (प्राणहिता) चे ३० अंमलदार तसेच ३० होमगार्ड सहभागी झाले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करून मोहरम उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.

शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला सलाम! भामरागडमध्ये राणी दुर्गावती बलिदान दिन मोठ्या उत्साहात

भामरागड : वीरांगना राणी दुर्गावती यांच्या बलिदान दिनानिमित्त दिनांक 24 जून 2026 रोजी राणी दुर्गावती चौक, पोलीस स्टेशन भामरागड येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

वीरांगना राणी दुर्गावती यांचे 24 जून 1564 रोजी मुघल सेनापती आसफ खान यांच्याशी लढताना वीरमरण झाले. त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस राणी दुर्गावती बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाची सुरुवात भामरागड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला भूमक दादाराव कुसराम, अनवरशहा मडावी, समाजसेवक सब्बरबेग मोगल, जगदीश पूंगाटी सर, जे. मडावी सर, दौलत आरकी, संतोष सिडाम, दशरथ मडावी, पत्रकार अविनाश नारनवरे, योगेंद्र सडमेक, सुधाकर पुंगाटी, विकास मडावी, महेंद्र कुसराम यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

महिला वर्गातून सुशीला मडावी, तारा मडावी, सुनंदा ताई मडावी, मंगला मडावी, गनश्री मॅडम, स्वाती मॅडम, लक्ष्मी मडावी, भारती ईष्टाम, लता मडावी, गंगू मडावी, यशोदा पूंगाटी, मीना तलांडे, पायल तलांडे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या शौर्याच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी दशरथ मडावी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पहिल्याच पावसात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

आल्लापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात पहिल्याच पावसात अस्वच्छतेचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या या शाळेच्या मैदानात तसेच मुख्य रस्त्यालगत कचरा, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील नाल्या, गटारे आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता करणे अपेक्षित असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची कर्तव्ये समाविष्ट आहेत. मात्र, आल्लापल्ली येथील परिस्थिती पाहता या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी शाळा परिसरातील नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नसल्याने पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लहान विद्यार्थ्यांना याच अस्वच्छ वातावरणातून ये-जा करावी लागणार असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा परिसर हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. अशा ठिकाणी स्वच्छता राखणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आणि रोगराई टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी जवळच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वेळेत नाली सफाई आणि परिसर स्वच्छतेची कामे झाली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती. प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे नियोजन केले जाते का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शाळा परिसरातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. “मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता ग्रामपंचायत प्रशासन तातडीने नाली सफाई, कचरा व्यवस्थापन आणि शाळा परिसर स्वच्छतेसाठी कोणती पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अहेरीच्या आरोग्यसेवेचे स्वप्न अधांतरी; महिला-बाल रुग्णालय बंद पडण्याच्या उंबरठ्यावर

अहेरी : कुपोषण, बालमृत्यू आणि दुर्गम आरोग्यसेवेच्या समस्यांनी ग्रासलेल्या अहेरी उपविभागासाठी महिला व बाल रुग्णालय हा आशेचा किरण मानला जात होता. महाराष्ट्रातील केवळ गडचिरोली जिल्ह्यात दोन महिला-बाल रुग्णालयांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अहेरीतील रुग्णालयासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी इमारत व पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे उपविभागातील हजारो महिला व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अडथळ्यांचा सामना करावा लागला. रुग्णालयाची इमारत पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा, उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरतीही संथ गतीने सुरू राहिली. अखेर ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते रुग्णालयाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनानंतरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही.

दरम्यान, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आरोग्यसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत असतानाच आता रुग्णालय पुन्हा एका नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढता असंतोष असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, अपुऱ्या मनुष्यबळामुळे बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांची जबाबदारी मोजक्याच तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत आहे.

विशेषतः बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची मोठी कमतरता भासत असून, काही डॉक्टरांना सलग तीन ते चार दिवस अहोरात्र सेवा द्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या ताणतणावाच्या परिस्थितीतही वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी वाढत आहे. यामुळे एकामागून एक डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी डॉ. कन्ना मडावी यांच्या आगामी सेवानिवृत्तीमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर एवढ्या मोठ्या रुग्णालयाची जबाबदारी कोण सांभाळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाला जर आवश्यक डॉक्टर, मनुष्यबळ आणि सक्षम प्रशासन मिळाले नाही, तर अहेरीसह संपूर्ण उपविभागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता शासन आणि आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून या रुग्णालयाला सक्षम नेतृत्व व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनी १२०० हून अधिक पोलीस अधिकारी-जवानांचा सामूहिक योगाभ्यास

गडचिरोली, दि. २१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभर उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करून आरोग्य, शिस्त आणि मानसिक सुदृढतेचा संदेश दिला. पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.

‘एक निरोगी पोलीस दल, सुरक्षित समाजाची हमी’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक आणि राज्य राखीव पोलीस दलातील ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

त्याचप्रमाणे प्राणहिता पोलीस उप-मुख्यालयात विशेष अभियान पथक आणि सीआरपीएफच्या सुमारे ५०० अधिकारी व जवानांनी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

योग प्रशिक्षक श्री. मिलिंद उमरे आणि श्रीमती अंजली कुळमेथे यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक एकाग्रता वाढते आणि दैनंदिन कार्यक्षमतेत सकारात्मक बदल घडतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “व्यस्त जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज किमान २० मिनिटे योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा,” असे आवाहन केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. हर्षवर्धन बी. जे., सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक श्री. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल तसेच विविध शाखा, पोलीस पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आलापल्ली–सिरोंचा महामार्गात मोठा घोटाळा? निकृष्ट पुलबांधकामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

आलापल्ली / सिरोंचा : आलापल्ली–सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाभोवती पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलांच्या बांधकामात तांत्रिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला असून, कंत्राटदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महामार्गावरील काही पुलांच्या बांधकामात पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला ‘राफ्ट’ एका ठिकाणी टाकण्यात आला असून, त्यावरील मुख्य भिंत (वॉल) दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, अशा प्रकारच्या कामाला मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये दर्जेदार काम सुनिश्चित करण्यासाठी कन्सल्टन्सी संस्था आणि सरकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, ३५३-सी महामार्गाच्या कामात मानांकन आणि डिझाइनकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पहिल्याच मुसळधार पावसात या मार्गावरील काही तात्पुरते रस्ते आणि पूल वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता मुख्य पुलांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात जड वाहनांचा ताण हे पूल सहन करू शकतील का, याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

या आरोपांमुळे ३५३-सी राष्ट्रीय महामार्गावरील कामकाजाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहेरीत ३० हेक्टर राखीव वनभूमी अतिक्रमणमुक्त; वनविभागाची धडक कारवाई

अहेरी : वनपरिक्षेत्रांतर्गत राखीव वनक्षेत्रावर करण्यात आलेले तब्बल ३० हेक्टर अतिक्रमण वनविभागाने धडक कारवाई करत हटविले. वन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने अनेक जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली. या कारवाईमुळे अतिक्रमणकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भविष्यात वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे.

अहेरी वनपरिक्षेत्रातील खमनचेरू उपक्षेत्रांतर्गत नियतक्षेत्र तानबोडी येथील राखीव वन कक्ष क्रमांक १२ मध्ये काही नागरिकांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वनजमिनीवर अतिक्रमण करून ती शेतीसाठी वापरात आणली होती. याची दखल घेत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जी. पी. नरवणे, उपवनसंरक्षक दीपाली तलमले आणि उपविभागीय वनाधिकारी एस. जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.

अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे, आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. जी. गणवीर, पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. टी. चौके, नायब तहसीलदार प्रतिक आढाव तसेच अहेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षल एकरे यांच्या उपस्थितीत वन व पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. या मोहिमेत वनरक्षक, वनपाल आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित क्षेत्र मोकळे करण्यात आले असून वनजमिनीचे मूळ स्वरूप पुन्हा बहाल करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे वनजमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण आढळल्यास संबंधितांविरुद्ध याच पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी एन. डी. इंगळे यांनी दिला आहे.

लाचखोरीचा वनविभागात स्फोट; वनअधिकारी, वनरक्षकांच्या भूमिकेवर संशय

गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात उघडकीस आलेल्या कथित लाचप्रकरणामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. एका फर्निचर व्यावसायिकाकडून कारवाईची भीती दाखवून तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचत धडक कारवाई केली. यामध्ये पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहात पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी इसम प्रदीप मंडल यांनी संबंधित व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागणीची बाब स्पष्ट झाल्याने एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.

त्यानुसार ठरलेल्या व्यवहारात पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, ही रक्कम स्वीकारताना प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वनविभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांच्या भूमिकेचीही कसून चौकशी सुरू असून संपूर्ण व्यवहारामागील सूत्रधार कोण, याचा तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. पुढील तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीआरपीएफ कमांडंटांचे रक्तदानातून नेतृत्व; 40 हून अधिक जवानांचा उत्स्फूर्त सहभाग

अहेरी : जागतिक रक्तदान दिनानिमित्त अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये बटालियन क्रमांक 37 व 9 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला जवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे दोन्ही बटालियनच्या कमांडंटांनी स्वतः रक्तदान करून जवानांना प्रेरणा दिली.

शिबिराचे उद्घाटन 9 बटालियनचे कमांडंट शंभू कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी 37 बटालियनचे कमांडंट दव इंजीरकन किंडो यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिराची सुरुवात कमांडंट शंभू कुमार आणि कमांडंट किंडो यांनी स्वतः रक्तदान करून केली. त्यांच्या या कृतीमुळे जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर 40 हून अधिक सीआरपीएफ जवानांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन, आरोग्य तपासणी आणि सुरक्षितता नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

रक्तदानामुळे स्थानिक रुग्णालयांतील रक्तसाठा वाढण्यास मदत होते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना याचा मोठा लाभ होतो. त्यामुळे नागरिकांनीही नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी केले.

या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जागतिक रक्तदान दिनाचा मुख्य उद्देश असलेला ‘जीवनदानाचा संदेश’ प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही साध्य झाले.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.