चंद्रपुरात वाघिणीचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर झडप; 4 जणींचा जागीच मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघिणीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गटावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याची ही दुर्मिळ आणि गंभीर घटना मानली जात आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही गावातील ‘भट्टी मोहल्ला’ परिसरातील 13 महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. खैरीचक परिसरातील दाट जंगलात त्या काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका मादी वाघिणीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की महिलांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर महिलांनी प्रसंगावधान राखत जंगलातून जीव वाचवत पळ काढला. आपल्या सहकाऱ्यांना वाघिणीने ओढून नेत असल्याचे भयावह दृश्य पाहून उर्वरित महिला प्रचंड हादरल्या आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील असून परस्पर नातेवाईक असल्याने गुंजेवाही गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

कविता दादाजी मोहुर्ले (45)

अनिता दादाजी मोहुर्ले (46)

संगीता संतोष चौधरी (40)

सुनीता कौशिक मोहुर्ले (35)

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. तसेच या परिसरात वाढत्या वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या नरभक्षक वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

त्रिवेणी संगमावर भक्तीचा महासागर! कालेश्वर येथे सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला भव्य प्रारंभ

सिरोंचा : गोदावरी, प्राणहिता आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमावर वसलेल्या #कालेश्वर येथे आजपासून सरस्वती अंत्य पुष्कर सोहळ्याला अत्यंत भक्तिमय वातावरणात भव्य सुरुवात झाली. तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ राज्याचे मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू, देवादाय विभागाच्या मंत्री कोंडा सुरेखा तसेच कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पहाटे ५.४३ वाजता कांची पीठाधिपतींच्या हस्ते पवित्र पुष्कर स्नान करण्यात आले आणि वैदिक मंत्रोच्चारात सोहळ्याची विधिवत सुरुवात झाली.

#कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर परिसर पहाटेपासूनच “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू येथे दाखल झाले. पवित्र स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

यावेळी मंत्री दुद्धिल्ला श्रीधर बाबू यांनी सांगितले की, “सरस्वती अंत्य पुष्कर हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व असलेला सोहळा आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंत्री कोंडा सुरेखा यांच्या नेतृत्वात तेलंगणा सरकारने व्यापक नियोजन केले आहे. मागील वर्षी झालेल्या सरस्वती आदि पुष्कराच्या अनुभवाच्या आधारे यंदा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. हे १२ दिवस अत्यंत पुण्यदायी मानले जातात. या काळात त्रिवेणी संगमात स्नान करून #कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्य लाभते.”

२१ मे ते १ जूनदरम्यान होणाऱ्या या १२ दिवसीय सोहळ्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३०.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या काळात ३० ते ४० लाख भाविक #कालेश्वर येथे येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, त्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.

नागपुरात उष्णतेचा कहर! अवघ्या ८ दिवसांत ३६ जणांचा मृत्यू

नागपूर : शहरासह संपूर्ण विदर्भाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अवघ्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ३६ अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला असून, या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या सलग मृत्यूंकडे सुरुवातीला कुणाचंही गांभीर्याने लक्ष गेलं नव्हतं.

सध्या नागपूर शहर अक्षरशः उन्हाने भाजून निघत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी तीन जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये बहुतेक बेघर, रस्त्यावर राहणारे किंवा उन्हात काम करणारे लोक असल्याची माहिती समोर येत आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका याच घटकांना बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या सर्व मृत्यूंचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडून सर्व मृत्यूंचं ‘डेथ ऑडिट’ करण्यात येणार असून, अंतिम अहवालानंतरच अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक तपासात उष्माघाताची शक्यता अधिक असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार ठेवण्यात आले असून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बाहेर जाताना डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणे, भरपूर पाणी पिणे, ओआरएस आणि लिंबूपाणी घेणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्कर येणे, उलटी होणे किंवा शरीरातील पाण्याची कमतरता जाणवल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी दिनांक २१ मेपासून सुरू झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. कोणतीही अडचण टाळण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

भामरागडमध्ये शेततळे योजनांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची चौकशीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तहसीलमध्ये DBT व कृषी योजनांतर्गत सुरू असलेल्या शेततळे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. या प्रकरणात शासन निधीचा अपहार होत असून कास्तकारांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, कास्तकारांच्या खात्यात जमा झालेली पूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून काढून घेतली जात असून त्यापैकी केवळ सुमारे 60 हजार रुपये मशीन धारकाला देण्यात येत आहेत. उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवून कास्तकारांना “पूर्ण पैसे दिले” अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती टाकून अधिक काम झाल्याचे दाखवले जात असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्येक खात्यात जमा झालेली रक्कम, पैसे काढण्याची प्रक्रिया, मशीन धारकाला दिलेली रक्कम तसेच प्रत्यक्ष खोदकाम व मोजमाप पुस्तिकेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करून शासन निधीचा अपहार थांबवावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मुरखळा गावाजवळ भीषण अपघात! गडचिरोली-उमरखेड ST बस उलटली; 2 ठार, 30 प्रवासी जखमी

गडचिरोली: गडचिरोलीहून उमरखेडकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसला आज भीषण अपघात झाला. मुरखळा गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. अचानक बसचा वेग अनियंत्रित झाला आणि काही क्षणांतच बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसच्या काचा फुटल्या असून अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गडचिरोली-उमरखेड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेकडो कोटींचा महामार्ग की भ्रष्टाचाराचा मार्ग? गडचिरोली-धानोरा रस्त्यावर बांधकामाआधीच भेगा

गडचिरोली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari देशभरात दर्जेदार महामार्ग उभारल्याचे दावे करत असताना, गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेकडो कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे.

महामार्गाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी काही महिन्यांतच अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा, खड्डे आणि उखडलेले थर दिसू लागले आहेत. दुसऱ्या बाजूचे बांधकाम अद्याप सुरू असताना पहिल्याच टप्प्यात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “काम पूर्ण होण्याआधीच रस्ता खचत असेल, तर पुढील काही वर्षांत परिस्थिती किती गंभीर होईल?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही पुलांना उद्घाटनापूर्वीच भेगा पडल्याचे प्रकार घडले होते, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोप झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करत कामांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही.

नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्गांना ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी मजबूत रस्ते अत्यावश्यक असताना प्रत्यक्षात सुरू असलेली भोंगळ कामे नागरिकांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेततळे योजनेत भ्रष्टाचार! फक्त ६० हजार देऊन उर्वरित रक्कम अधिकाऱ्यांनी खिशात घातल्याचे आरोप

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या एका गंभीर तक्रारीनुसार, भामरागड तालुक्यातील विविध गावांमध्ये DBT व कृषी विभागाच्या शेततळे योजनांत मोठ्या प्रमाणात अनियमितता व शासन निधीचा अपहार होत असल्याचे समोर आले आहे.

तक्रारीनुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली संपूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकारी काढून घेत असून, त्यातील केवळ सुमारे ६० हजार रुपये मशीन धारकाला देत आणि उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचे आरोप आहेत. शेतकऱ्यांना “मशीनधारकास पूर्ण पैसे दिले” असे खोटे सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याचीही माहिती आहे.

याशिवाय, प्रत्यक्षात कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती चढवून जास्त काम दाखवण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शासन निधीचा मोठा अपहार होत असल्याचे दिसून येते.

तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी विनंती केली आहे की, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम, त्या रकमेचे काढणे, मशीनधारकाला दिलेली प्रत्यक्ष रक्कम, मोजमाप पुस्तिका (MB) यांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

जिद्द, कष्ट आणि सातत्याचा विजय! गडचिरोलीचा अमोल देशमुख यांची बोस्टन विद्यापीठात दुहेरी पदवी

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश येथील अमोल प्रदीप देशमुख यांनी संपादन केले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून त्यांनी एकाचवेळी एमबीए आणि मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या दोन पदव्युत्तर पदव्या यशस्वीरीत्या प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.

गडचिरोलीतील रहिवासी असलेल्या अमोल देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण कार्मेल हायस्कूलमध्ये झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथील गुरु गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमधील एका बँकेत नोकरी सुरू केली.

मात्र, उच्च शिक्षण घेण्याची तीव्र जिद्द आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी कायम जपले. नोकरी सांभाळत त्यांनी एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी केली आणि उत्कृष्ट यश मिळवत अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी त्याचवेळी मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेत दोन्ही पदव्या एकत्र पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

कष्ट, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर अमोल देशमुख यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच गडचिरोलीतील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अमोल यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याचा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.

चक्क अस्वलाने वाघाला पिटाळलं; ताडोबातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीवांच्या संघर्षाचा एक अत्यंत थरारक आणि दुर्मिळ प्रसंग समोर आला आहे. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या वाघालाही एका आक्रमक अस्वलासमोर माघार घ्यावी लागल्याचे या घटनेत पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वन्यजीव प्रेमींसह नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताडोबाच्या घनदाट जंगलातील एका पानवठ्याजवळ ही घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात विविध वन्यप्राणी या भागात येत असतात. अशाच वेळी वाघ आणि अस्वल आमनेसामने आले आणि काही क्षणांतच वातावरण तणावपूर्ण बनले. सुरुवातीला वाघाने आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट प्रतिहल्ला चढवला.

Tiger Attack

सामान्यतः इतर प्राणी वाघाच्या वाटेला जाणे टाळतात, पण या घटनेत अस्वलाने अजिबात भीती न दाखवता सतत हल्लेखोर भूमिका कायम ठेवली. अस्वलाच्या अचानक आणि तीव्र आक्रमणामुळे वाघाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. काही वेळ चाललेल्या या संघर्षात अस्वलाचा आक्रमकपणा इतका वाढला की वाघाला अखेर मागे हटण्याचा निर्णय घ्यावा लागला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघ सावधपणे मागे सरकत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे अस्वल त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत आहे. वन्यजीवांच्या जगात प्रत्येक क्षणी अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असतो, याचीच ही घटना जिवंत उदाहरण ठरत आहे. ताडोबातील हा रोमांचक प्रसंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, जंगलातील नैसर्गिक शक्ती-संतुलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.