कोट्यवधींचे रुग्णालय, पण कर्मचारीच नाहीत; अहेरीत अमोल मुक्कावार उपोषणावर

अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय व प्रशासकीय रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागणीसाठी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर भरती होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन सुमारे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले होते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तसेच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याची अपेक्षा होती.
मात्र उद्घाटनानंतर वर्ष उलटूनही रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोट्यवधींची इमारत उभी असली तरी त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

विशेषतः अहेरी व परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील गर्भवती महिला, नवजात बालके आणि बालरुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 80 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचणाऱ्या रुग्णांना पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नसल्यामुळे आवश्यक उपचार वेळेत मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

या मागणीसाठी सोमवारी अमोल मुक्कावार यांनी महिला व बाल रुग्णालय परिसरात ‘ताळे ठोको’ आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मुक्कावार यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणस्थळी बोलताना अमोल मुक्कावार म्हणाले, “महिला व बाल रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. ही लढाई कोणत्याही व्यक्तीची नसून अहेरी परिसरातील माता, भगिनी आणि बालकांच्या आरोग्य हक्कासाठी आहे.”

या आंदोलनाची दखल आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात घेतली जात असून स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार आणि शासन-प्रशासन नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय कधी घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

शाळेच्या पहिल्याच दिवशी जल्लोष! बैलबंडी मिरवणुकीतून विद्यार्थ्यांचे आगळे-वेगळे स्वागत

अहेरी : : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, पुसुकपल्ली येथे नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा दणदणाट, सजविलेली बैलबंडी, गावभर काढलेली मिरवणूक आणि विद्यार्थ्यांवर झालेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण गावात प्रवेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक मा. सौ. दिपाली आर. तलमले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे टिळा लावून, पुष्पगुच्छ देऊन आणि शालेय साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आकर्षक सजविलेल्या बैलबंडीत बसवून ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचावा, या उद्देशाने शाळेने हा अभिनव प्रवेशोत्सव आयोजित केला होता. पहिल्याच दिवशी आनंदी आणि उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह झळकत होता. त्यामुळे शाळेची भीती दूर होऊन शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. रागीवार मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण पुसुकपल्ली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हा प्रवेशोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

दुर्गम आदिवासी भागातून यशाची झेप; आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

गडचिरोली : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रमाची ताकद कमी नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अहेरी तालुक्यातील रामपूर (पोस्ट-बोरी) येथील कु. आचल सविता संजय मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव उंचावला आहे.

अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आचल यांनी कोणताही शॉर्टकट न स्वीकारता सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, बोरी येथे झाले. त्यानंतर राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दिशा एज्युकेशन, वरोरा येथून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स, छत्रपती संभाजीनगर येथून बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदवी प्राप्त केली. पुढे शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथून एम.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभाग नोंदवत संशोधनातील आपली क्षमता सिद्ध केली. तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच UGC-NET परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा गाठला.

या सर्व यशाच्या जोरावर त्यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

आचल मोहुळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहेरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

मरपल्लीत दुहेरी संकट: आधीच वारंवार खंडित होणारी वीज, त्यात BSNL टॉवरही १० दिवसांपासून ठप्प!

अहेरी/मरपल्ली: राष्ट्रीय महामार्गावरील उमानूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मरपल्ली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या नागरिकांना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उमानूर आणि मरपल्ली परिसरात आधीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या कायम आहे. सततच्या भारनियमनामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त असतानाच, आता गेल्या दहा दिवसांपासून मरपल्ली येथील बीएसएनएल (BSNL) मोबाईल टॉवर पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे आधीच विजेअभावी त्रस्त असलेल्या या संपूर्ण परिसरातील संपर्क यंत्रणाही कोलमडून पडली असून परिसर पूर्णपणे संपर्कविहीन झाला आहे.

मरपल्ली येथे पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, विविध शासकीय-निमशासकीय विभागांचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण वास्तव्यास आहेत. मात्र, वीज नसणे आणि त्यातच बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे दैनंदिन संपर्क, ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे कोलमडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दुर्गम भागात वीज आणि नेटवर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. वीज पुरवठा खंडित असताना मोबाईलचे नेटवर्कही उपलब्ध नसल्यामुळे गावात एखादी वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, आरोग्य सेवा किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर समस्येमुळे मरपल्ली आणि उमानूर लगतच्या अनेक गावांतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित वीज वितरण कंपनी आणि बीएसएनएल विभागाने या दुहेरी समस्येची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा आणि बंद पडलेला टॉवर त्वरित सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

मोहरम उत्सवासाठी अहेरी पोलिसांची जय्यत तयारी; १०० हून अधिक पोलीस बळासह रूट मार्च

अहेरी : आगामी मोहरम उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अहेरी पोलिसांनी आज दिनांक २५ जून २०२६ रोजी शहरातून भव्य रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मोहरम उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारीचा भाग म्हणून सायंकाळी ४.३० ते ५.२० वाजेपर्यंत अहेरी पोलीस स्टेशन येथे दंगा काबू पथकाची (दंगा नियंत्रण पथक) तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रूट मार्च काढण्यात आला.

हा रूट मार्च अहेरी पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन मज्जित चौक, आझाद चौक, दानशूर चौक, राजवाडा रोड, गांधी चौक, गड अहेरी रोड या मार्गाने काढण्यात आला. शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करत हा मार्च पुन्हा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये ४ पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून (प्राणहिता) चे ३० अंमलदार तसेच ३० होमगार्ड सहभागी झाले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करून मोहरम उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.

शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला सलाम! भामरागडमध्ये राणी दुर्गावती बलिदान दिन मोठ्या उत्साहात

भामरागड : वीरांगना राणी दुर्गावती यांच्या बलिदान दिनानिमित्त दिनांक 24 जून 2026 रोजी राणी दुर्गावती चौक, पोलीस स्टेशन भामरागड येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

वीरांगना राणी दुर्गावती यांचे 24 जून 1564 रोजी मुघल सेनापती आसफ खान यांच्याशी लढताना वीरमरण झाले. त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस राणी दुर्गावती बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाची सुरुवात भामरागड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला भूमक दादाराव कुसराम, अनवरशहा मडावी, समाजसेवक सब्बरबेग मोगल, जगदीश पूंगाटी सर, जे. मडावी सर, दौलत आरकी, संतोष सिडाम, दशरथ मडावी, पत्रकार अविनाश नारनवरे, योगेंद्र सडमेक, सुधाकर पुंगाटी, विकास मडावी, महेंद्र कुसराम यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

महिला वर्गातून सुशीला मडावी, तारा मडावी, सुनंदा ताई मडावी, मंगला मडावी, गनश्री मॅडम, स्वाती मॅडम, लक्ष्मी मडावी, भारती ईष्टाम, लता मडावी, गंगू मडावी, यशोदा पूंगाटी, मीना तलांडे, पायल तलांडे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच त्यांच्या शौर्याच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी दशरथ मडावी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पहिल्याच पावसात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

आल्लापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात पहिल्याच पावसात अस्वच्छतेचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या या शाळेच्या मैदानात तसेच मुख्य रस्त्यालगत कचरा, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावातील नाल्या, गटारे आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता करणे अपेक्षित असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्था आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची कर्तव्ये समाविष्ट आहेत. मात्र, आल्लापल्ली येथील परिस्थिती पाहता या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी शाळा परिसरातील नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नसल्याने पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर लहान विद्यार्थ्यांना याच अस्वच्छ वातावरणातून ये-जा करावी लागणार असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा परिसर हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. अशा ठिकाणी स्वच्छता राखणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आणि रोगराई टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी जवळच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वेळेत नाली सफाई आणि परिसर स्वच्छतेची कामे झाली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती. प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे नियोजन केले जाते का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शाळा परिसरातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. “मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आता ग्रामपंचायत प्रशासन तातडीने नाली सफाई, कचरा व्यवस्थापन आणि शाळा परिसर स्वच्छतेसाठी कोणती पावले उचलते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अहेरीच्या आरोग्यसेवेचे स्वप्न अधांतरी; महिला-बाल रुग्णालय बंद पडण्याच्या उंबरठ्यावर

अहेरी : कुपोषण, बालमृत्यू आणि दुर्गम आरोग्यसेवेच्या समस्यांनी ग्रासलेल्या अहेरी उपविभागासाठी महिला व बाल रुग्णालय हा आशेचा किरण मानला जात होता. महाराष्ट्रातील केवळ गडचिरोली जिल्ह्यात दोन महिला-बाल रुग्णालयांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अहेरीतील रुग्णालयासाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी इमारत व पायाभूत सुविधांसाठी मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे उपविभागातील हजारो महिला व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अडथळ्यांचा सामना करावा लागला. रुग्णालयाची इमारत पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा, उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरतीही संथ गतीने सुरू राहिली. अखेर ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते रुग्णालयाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्घाटनानंतरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकली नाही.

दरम्यान, काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आरोग्यसेवा सुरळीत होण्याची चिन्हे दिसत असतानाच आता रुग्णालय पुन्हा एका नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढता असंतोष असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, अपुऱ्या मनुष्यबळामुळे बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांची जबाबदारी मोजक्याच तज्ज्ञ डॉक्टरांवर पडत आहे.

विशेषतः बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची मोठी कमतरता भासत असून, काही डॉक्टरांना सलग तीन ते चार दिवस अहोरात्र सेवा द्यावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या ताणतणावाच्या परिस्थितीतही वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने डॉक्टरांमध्ये नाराजी वाढत आहे. यामुळे एकामागून एक डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी डॉ. कन्ना मडावी यांच्या आगामी सेवानिवृत्तीमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर एवढ्या मोठ्या रुग्णालयाची जबाबदारी कोण सांभाळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाला जर आवश्यक डॉक्टर, मनुष्यबळ आणि सक्षम प्रशासन मिळाले नाही, तर अहेरीसह संपूर्ण उपविभागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता शासन आणि आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून या रुग्णालयाला सक्षम नेतृत्व व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनी १२०० हून अधिक पोलीस अधिकारी-जवानांचा सामूहिक योगाभ्यास

गडचिरोली, दि. २१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभर उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करून आरोग्य, शिस्त आणि मानसिक सुदृढतेचा संदेश दिला. पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.

‘एक निरोगी पोलीस दल, सुरक्षित समाजाची हमी’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक आणि राज्य राखीव पोलीस दलातील ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.

त्याचप्रमाणे प्राणहिता पोलीस उप-मुख्यालयात विशेष अभियान पथक आणि सीआरपीएफच्या सुमारे ५०० अधिकारी व जवानांनी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

योग प्रशिक्षक श्री. मिलिंद उमरे आणि श्रीमती अंजली कुळमेथे यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक एकाग्रता वाढते आणि दैनंदिन कार्यक्षमतेत सकारात्मक बदल घडतो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “व्यस्त जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज किमान २० मिनिटे योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा,” असे आवाहन केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. हर्षवर्धन बी. जे., सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक श्री. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. नरेंद्र पिवाल तसेच विविध शाखा, पोलीस पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आलापल्ली–सिरोंचा महामार्गात मोठा घोटाळा? निकृष्ट पुलबांधकामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

आलापल्ली / सिरोंचा : आलापल्ली–सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाभोवती पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलांच्या बांधकामात तांत्रिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला असून, कंत्राटदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते यांच्या संगनमतातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महामार्गावरील काही पुलांच्या बांधकामात पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेला ‘राफ्ट’ एका ठिकाणी टाकण्यात आला असून, त्यावरील मुख्य भिंत (वॉल) दुसऱ्याच ठिकाणी उभारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, अशा प्रकारच्या कामाला मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये दर्जेदार काम सुनिश्चित करण्यासाठी कन्सल्टन्सी संस्था आणि सरकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, ३५३-सी महामार्गाच्या कामात मानांकन आणि डिझाइनकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने जनतेच्या पैशांची उघड लूट सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पहिल्याच मुसळधार पावसात या मार्गावरील काही तात्पुरते रस्ते आणि पूल वाहून गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता मुख्य पुलांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात जड वाहनांचा ताण हे पूल सहन करू शकतील का, याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

या आरोपांमुळे ३५३-सी राष्ट्रीय महामार्गावरील कामकाजाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.