शेतीपूर्वी पांडुम पूजेला प्राधान्य; वांगेपल्लीत आदिवासी परंपरेचे दर्शन

वांगेपल्ली : आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेली पांडुम पूजा यंदाही वांगेपल्ली गावात उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडली. दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामांना प्रारंभ करण्यापूर्वी गावातील सर्व शेतकरी आणि समाजबांधव एकत्र येऊन ही पूजा करतात.

गावातील वयोवृद्धांच्या मते, पांडुम पूजा केल्यानंतरच शेतीची कामे, जसे की बीज पेरणी, रोवणी आणि इतर कृषी कार्य सुरू करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या परंपरेमुळे शेतीत चांगले उत्पन्न मिळते आणि गावात सुख-समृद्धी नांदते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

यंदाही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पांडुम पूजा विधीपूर्वक पार पाडत आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले. या निमित्ताने गावातील ज्येष्ठांनी नव्या पिढीला आपल्या पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरा, संस्कृती आणि रूढी जपण्याचे आवाहन केले.

“आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा ही आपली ओळख आहे. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पांडुम पूजेच्या माध्यमातून वांगेपल्ली गावात सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक जतनाचा सुंदर संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

गडचिरोलीत केंद्रीय विद्यालयाला हिरवा कंदील; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मुख्यालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी ही माहिती देताना, येत्या ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेने २ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये देशभरातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी गडचिरोलीतील विद्यालय आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

सध्या विद्यालयाची सुरुवात शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येणार आहे. प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठी आवश्यक जागा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नावे हस्तांतरित केली असून, वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक इमारतही उपलब्ध करून दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त वर्गखोल्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

सुरुवातीला पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून, पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने उच्च वर्गांची भर घालण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी आणि इतर कायदेशीर औपचारिकता जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

दरम्यान, तात्पुरत्या इमारतीत शैक्षणिक कामकाज सुरू असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी भव्य इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

माओवादविरोधी लढ्यातील शौर्याचा सन्मान; गडचिरोलीच्या पाच अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती

गडचिरोली : माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देऊन राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.

मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात शुक्रवार (३ जुलै २०२६) रोजी आयोजित पिपिंग समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (Pips) लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनिल बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने बजावलेल्या सेवेमुळे त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.

समारंभात बोलताना पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी माओवादविरोधी अभियानातील विविध अनुभव, आव्हाने आणि दुर्गम भागातील पोलीस दलाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत असून कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलीस दलाची शौर्यगाथा उल्लेखनीय असून आजपर्यंत या दलाला ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १५१० पोलीस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळालेली आहे.

या समारंभाला अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, डॉ. निखिल गुप्ता, शिरीष जैन, यशस्वी यादव, डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) प्रशांत मोहिते तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली पोलीस दलासाठी ही पदोन्नती केवळ वैयक्तिक यश नसून, माओवादविरोधी लढ्यातील धैर्य, समर्पण आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली राज्यस्तरीय गौरवाची पावती मानली जात आहे.

पहिल्याच पावसात वाहून गेला मुक्तापूर नाल्याचा रपटा; दक्षिण गडचिरोलीचा संपर्क तुटला

अहेरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-क वरील सुभाषनगर–मुक्तापूर–बोरी मार्गावरील मुक्तापूर नाल्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील हलगर्जीपणा पहिल्याच मुसळधार पावसात उघड झाला आहे. वाहतुकीसाठी कंत्राटदाराने तयार केलेला तात्पुरता माती-खडीचा रपटा (डायव्हर्शन) काल रात्री झालेल्या जोरदार पावसात पूर्णपणे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, नवीन पुलाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असून अद्याप केवळ पायाभरणीचे कामच पूर्ण झाले आहे. पावसाळा तोंडावर असतानाही कामाला अपेक्षित वेग देण्यात आला नाही. त्यामुळे रहदारी सुरू ठेवण्यासाठी कंत्राटदाराने माती व खडीचा कच्चा रपटा तयार केला होता. मात्र, नाल्याला आलेल्या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे हा रपटा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला.

या घटनेमुळे दक्षिण गडचिरोलीचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांशी संपर्क तात्पुरता तुटला आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहतूक तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक प्रवासी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडले आहेत.

घटनेनंतर नागरिकांनी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पहिल्याच पावसात रपटा वाहून जात असेल, तर कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. पावसाळ्यापूर्वीच पूल पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती गती देणे गरजेचे होते,” अशी प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांनी दिली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून रस्ता पूर्ववत सुरू करावा, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

खळबळजनक! गडचिरोलीत वाघांची शिकार करून कातडी तस्करी; अहेरीतील दोघांना छत्तीसगडमध्ये अटक, एक पोलीस शिपाई निलंबित

अहेरी: : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वन्यजीव तस्करांविरुद्ध छत्तीसगड वन विभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वाघाच्या कातडीच्या आंतरराज्यीय तस्करीप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि राज्यस्तरीय विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत २९ जून रोजी रात्री पश्चिम पर्लकोट वनपरिक्षेत्रातील जनकपूर-पाखांजूर मार्गावर सापळा रचला होता. या नाकाबंदीदरम्यान दुचाकीवरून जात असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबूराव राजू मडावी (रा. गडअहेरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) आणि बिबेश्वर विष्णू गोडाम (रा. अहेरी, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान या आरोपींकडून दोन वाघांची कातडी, १३ वाघांच्या मिशा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, हे वाघ महाराष्ट्रातील इंद्रावती व्याघ्र अधिवास परिसरात मारून त्यांची कातडी छत्तीसगडमध्ये तस्करीसाठी नेली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी गडचिरोली पोलीस दलातील फक्त एकच पोलीस शिपाई असल्याची अधिकृत माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिली असून, संबंधित शिपायाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सध्या सुरू असून, दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

कोट्यवधींचे रुग्णालय, पण कर्मचारीच नाहीत; अहेरीत अमोल मुक्कावार उपोषणावर

अहेरी : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय व प्रशासकीय रिक्त पदे तातडीने भरावीत, या प्रमुख मागणीसाठी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर भरती होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन सुमारे वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले होते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तसेच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याची अपेक्षा होती.
मात्र उद्घाटनानंतर वर्ष उलटूनही रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची अनेक पदे अद्याप रिक्त असल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोट्यवधींची इमारत उभी असली तरी त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

विशेषतः अहेरी व परिसरातील दुर्गम आदिवासी भागातील गर्भवती महिला, नवजात बालके आणि बालरुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 80 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचणाऱ्या रुग्णांना पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ नसल्यामुळे आवश्यक उपचार वेळेत मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

या मागणीसाठी सोमवारी अमोल मुक्कावार यांनी महिला व बाल रुग्णालय परिसरात ‘ताळे ठोको’ आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून मुक्कावार यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने त्यांनी आता आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणस्थळी बोलताना अमोल मुक्कावार म्हणाले, “महिला व बाल रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. ही लढाई कोणत्याही व्यक्तीची नसून अहेरी परिसरातील माता, भगिनी आणि बालकांच्या आरोग्य हक्कासाठी आहे.”

या आंदोलनाची दखल आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात घेतली जात असून स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार आणि शासन-प्रशासन नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय कधी घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी जल्लोष! बैलबंडी मिरवणुकीतून विद्यार्थ्यांचे आगळे-वेगळे स्वागत

अहेरी : : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, पुसुकपल्ली येथे नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा दणदणाट, सजविलेली बैलबंडी, गावभर काढलेली मिरवणूक आणि विद्यार्थ्यांवर झालेली पुष्पवृष्टी यामुळे संपूर्ण गावात प्रवेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक मा. सौ. दिपाली आर. तलमले उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे टिळा लावून, पुष्पगुच्छ देऊन आणि शालेय साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आकर्षक सजविलेल्या बैलबंडीत बसवून ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचावा, या उद्देशाने शाळेने हा अभिनव प्रवेशोत्सव आयोजित केला होता. पहिल्याच दिवशी आनंदी आणि उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळाल्याने नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह झळकत होता. त्यामुळे शाळेची भीती दूर होऊन शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. रागीवार मॅडम, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण पुसुकपल्ली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हा प्रवेशोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

दुर्गम आदिवासी भागातून यशाची झेप; आचल मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापकपदी निवड

गडचिरोली : दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रमाची ताकद कमी नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अहेरी तालुक्यातील रामपूर (पोस्ट-बोरी) येथील कु. आचल सविता संजय मोहुर्ले यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव उंचावला आहे.

अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आचल यांनी कोणताही शॉर्टकट न स्वीकारता सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, बोरी येथे झाले. त्यानंतर राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दिशा एज्युकेशन, वरोरा येथून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स, छत्रपती संभाजीनगर येथून बी.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदवी प्राप्त केली. पुढे शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, संभाजीनगर येथून एम.एस्सी. फॉरेन्सिक सायन्स पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांनी संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभाग नोंदवत संशोधनातील आपली क्षमता सिद्ध केली. तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच UGC-NET परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा गाठला.

या सर्व यशाच्या जोरावर त्यांची शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी ठरत असून, मेहनत, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, हा संदेश त्यांनी आपल्या यशातून दिला आहे.

आचल मोहुळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अहेरी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

मरपल्लीत दुहेरी संकट: आधीच वारंवार खंडित होणारी वीज, त्यात BSNL टॉवरही १० दिवसांपासून ठप्प!

अहेरी/मरपल्ली: राष्ट्रीय महामार्गावरील उमानूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मरपल्ली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या नागरिकांना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. उमानूर आणि मरपल्ली परिसरात आधीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची मोठी समस्या कायम आहे. सततच्या भारनियमनामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त असतानाच, आता गेल्या दहा दिवसांपासून मरपल्ली येथील बीएसएनएल (BSNL) मोबाईल टॉवर पूर्णपणे बंद पडले आहे. यामुळे आधीच विजेअभावी त्रस्त असलेल्या या संपूर्ण परिसरातील संपर्क यंत्रणाही कोलमडून पडली असून परिसर पूर्णपणे संपर्कविहीन झाला आहे.

मरपल्ली येथे पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, विविध शासकीय-निमशासकीय विभागांचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण वास्तव्यास आहेत. मात्र, वीज नसणे आणि त्यातच बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे दैनंदिन संपर्क, ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा तसेच शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे कोलमडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दुर्गम भागात वीज आणि नेटवर्क असणे अत्यंत गरजेचे आहे. वीज पुरवठा खंडित असताना मोबाईलचे नेटवर्कही उपलब्ध नसल्यामुळे गावात एखादी वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, आरोग्य सेवा किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे ग्रामस्थांना अशक्य झाले आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर समस्येमुळे मरपल्ली आणि उमानूर लगतच्या अनेक गावांतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित वीज वितरण कंपनी आणि बीएसएनएल विभागाने या दुहेरी समस्येची तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करावा आणि बंद पडलेला टॉवर त्वरित सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

मोहरम उत्सवासाठी अहेरी पोलिसांची जय्यत तयारी; १०० हून अधिक पोलीस बळासह रूट मार्च

अहेरी : आगामी मोहरम उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अहेरी पोलिसांनी आज दिनांक २५ जून २०२६ रोजी शहरातून भव्य रूट मार्च काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मोहरम उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारीचा भाग म्हणून सायंकाळी ४.३० ते ५.२० वाजेपर्यंत अहेरी पोलीस स्टेशन येथे दंगा काबू पथकाची (दंगा नियंत्रण पथक) तालीम घेण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध रूट मार्च काढण्यात आला.

हा रूट मार्च अहेरी पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन मज्जित चौक, आझाद चौक, दानशूर चौक, राजवाडा रोड, गांधी चौक, गड अहेरी रोड या मार्गाने काढण्यात आला. शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करत हा मार्च पुन्हा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये ४ पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अंमलदार, आरसीपी प्लाटून (प्राणहिता) चे ३० अंमलदार तसेच ३० होमगार्ड सहभागी झाले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करून मोहरम उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.