नैसर्गिक शेतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम; भातशेती अधिक किफायतशीर करण्याचा प्रयत्न

गडचिरोली : पारंपरिक भातशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनवाढ आणि खर्चात बचत साध्य करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा तालुक्यातील तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT), पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR), माती परीक्षण आणि बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक शेती पद्धतींचे प्रात्यक्षिक पाहून अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी दर्शविली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती प्रीती हिरळकर यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, हिरवळीची खते, कंपोस्ट खते आणि पीक फेरपालट यांचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

मंडळ कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देताना शून्य मशागत पद्धतीमुळे वेळ, श्रम आणि खर्चात बचत होत असल्याचे सांगितले. आत्माचे बीटीएम व्ही. डी. रहांगडाले यांनी SRT पद्धतीमुळे नांगरणी, चिखलणी, रोवणी व इंधन खर्च कमी होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असल्याचे स्पष्ट केले.

सहायक कृषी अधिकारी अतुल देशमुख यांनी DSR पद्धतीची माहिती देताना चिखलणी व रोवणीचा खर्च कमी करून उत्पादनक्षमतेत वाढ करण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. तर कु. कल्पना ठाकरे यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करून संतुलित खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी SRT व DSR पद्धतीबाबत विशेष उत्सुकता व्यक्त केली. तसेच लागवडीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमाला देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी, संचालक मेघनाथ दुनेदार, तुळशीचे सरपंच नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्ही. डी. रहांगडाले यांनी केले, तर नितीन मुदामवार, अतुल देशमुख आणि सुरेश तोंडफोडे यांनी सहकार्य केले.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

“मतांसाठी लाडक्या, आता अपात्र? ‘लाडकी बहीण’ योजनेवर भाग्यश्रीताई आत्राम यांचा संतप्त सवाल”

गडचिरोली : राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “निवडणुकीपुरत्याच बहिणी लाडक्या होत्या का?” असा थेट सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया देताना आत्राम म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. महिलांच्या भावनांना हात घालत त्यांच्या मतांचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाला; मात्र निवडणूक संपताच लाखो महिलांना विविध निकषांच्या नावाखाली योजनेतून वगळण्यात आले. “हे महिलांशी केलेले आश्वासनभंग असून सरकारने त्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील वास्तव मांडताना त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे हजारो महिलांना ई-केवायसी (e-KYC) आणि बँक खात्यांशी आवश्यक माहिती जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.

“ज्या गावात नेटवर्कच उपलब्ध नाही, त्या ठिकाणच्या महिलांनी ई-केवायसी करायची कशी? तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांना लाभापासून वंचित ठेवणे हा सरळ अन्याय आहे,” असे त्या म्हणाल्या.

या पार्श्वभूमीवर भाग्यश्रीताई आत्राम यांनी सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नेटवर्कविहीन आणि दुर्गम भागात प्रशासनाने विशेष ऑफलाइन केवायसी शिबिरे आयोजित करून प्रक्रिया पूर्ण करावी तसेच महिलांना दिलासा मिळावा यासाठी केवायसीची मुदत वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.

यासोबतच त्यांनी इशारा दिला की, “महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र भगिनीला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. अन्यथा या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

महिलांच्या हक्काच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत भाग्यश्रीताई आत्राम यांनी सरकारला थेट जाब विचारल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेवरील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी हंगामातील धानाची कापणी होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, तरीही अद्याप शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान आदिवासी महामंडळ उन्हाळी धान खरेदी अंतर्गत खरेदी केले जाते. मात्र, यंदा कापणी होऊन महिना उलटला तरी केंद्र सुरू न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आपला धान साठा उघड्यावर आणून ठेवला आहे. त्यातच आता पावसाची चाहूल लागल्यामुळे हा साठा ओला होऊन धान खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाचा गैरफायदा खाजगी व्यापारी घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाचा अधिकृत हमीभाव प्रति क्विंटल २३६९ रुपये असताना, हतबल झालेल्या शेतकऱ्यांकडून खाजगी व्यापारी १५०० ते १६०० रुपये दराने धान खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० ते ८०० रुपयांचा फटका बसत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

वर्षभर अतोनात मेहनत करून पिकवलेल्या धानाला योग्य भाव मिळत नसल्याने, “मिया मुर्गी अंडा काया फकीर” अशी अत्यंत दयनीय आणि गरिबीची परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान आणि संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी आर्त विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवरील प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट; लग्नाला नकार दिल्याने मित्राची हत्या

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सोशल मीडियावरून सुरू झालेल्या मैत्रीचा अत्यंत दुर्दैवी आणि रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोन युवकांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र लग्नाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादातून एका युवकाने दुसऱ्या युवकाची चाकूने वार करून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव सतीशकुमार निसाद असून तो नागेपल्ली येथील रहिवासी व गॅरेज व्यवसायिक होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. कालांतराने ही ओळख अधिक घट्ट होत प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचली. दरम्यान, सतीशकुमार विवाहित असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी सूरज हलदार हा सतीशकुमारला भेटण्यासाठी नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटे सतीशकुमार त्याला ओडिशात सोडण्यासाठी चारचाकी वाहनाने निघाला असताना देवदा गावाजवळ दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादातून संतापलेल्या सूरजने चाकूने वार करत सतीशकुमारचा गळा चिरून खून केला. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा पुढील तपास हालेवारा पोलीस करीत आहेत.

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघासाठी काँग्रेसचा चेहरा ठरला; शैलेश अग्रवाल यांना उमेदवारीची संधी

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर उमेदवार निश्चित केला असून वर्धा येथील उद्योगपती शैलेश अग्रवाल यांच्या नावावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे. महापौर निवडणुकीनंतर एकमेकांपासून काहीसे दूर राहिलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूरमधील एका हॉटेलमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी मंत्री रणजित कांबळे यांची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारीसह निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यापूर्वी विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र विविध राजकीय घडामोडी आणि काही तांत्रिक कारणांमुळे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, काँग्रेसच्या काही नगरसेवकांना भाजपने आपल्या बाजूने वळविल्याच्या चर्चांमुळे पक्षाच्या संख्याबळावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे उमेदवारी स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्येही संभ्रम होता. नागपूरचे किशोर कान्हेरे यांचे नावही चर्चेत आले; मात्र त्यांनीही उमेदवारीपासून दूर राहणे पसंत केल्याचे सांगितले जाते. अखेर शैलेश अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाली. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर आणि सुभाष धोटे यांच्यातील कथित मतभेद बाजूला ठेवून सर्व नेते एकत्र आल्याचे या बैठकीत दिसून आले. दुसरीकडे भाजपकडून अरुण लाखानी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून या निवडणुकीत रंगतदार सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्षलग्रस्ततेकडून औद्योगिक क्रांतीकडे! गडचिरोलीत जेएसडब्ल्यूचा भव्य स्टील प्लांट

  1. गडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक इतिहासात नवे पर्व सुरू करणारी महत्त्वपूर्ण घोषणा जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २५ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा एकात्मिक पोलाद कारखाना उभारण्याची भव्य योजना कंपनीने आखली असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याला देशाच्या औद्योगिक नकाशावर नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना जिंदल यांनी सांगितले की, गडचिरोलीतील मुबलक लोहखनिज साठे, खाणींची जवळीक आणि गेल्या काही वर्षांत सुधारलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे हा भाग स्टील उद्योगासाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. एकेकाळी नक्षलवादी चळवळीच्या प्रभावामुळे विकासापासून दूर राहिलेला हा प्रदेश आता देशातील प्रमुख स्टील उत्पादन केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

“लोहखनिजाच्या खाणी जवळ असल्यामुळे गडचिरोली हा स्टील उत्पादनासाठी अत्यंत धोरणात्मक जिल्हा आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या भागात आता शांतता प्रस्थापित झाली असून खाणकामालाही गती मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्टील उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व नैसर्गिक क्षमता येथे उपलब्ध आहे,” असे जिंदल यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “जेएसडब्ल्यू समूहाने गडचिरोलीत २५ दशलक्ष टन क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारण्याचे वचन दिले आहे. आवश्यक खाणी आणि कच्च्या मालाची सुरक्षित उपलब्धता सुनिश्चित होताच प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली जाईल. त्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल.” या प्रकल्पामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी जिंदल यांनी जेएसडब्ल्यू समूहाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील योजनांचीही माहिती दिली. नागपूर येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बॅटरी सेल्स निर्मितीचा प्रकल्प वेगाने उभारला जात असून, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासोबतच तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील उत्पादनवाढ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी देशांतर्गत उत्पादनामुळे परकीय चलनाची मोठी बचत होत असल्याचे नमूद केले. तसेच मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्योग क्षेत्रावर काहीसा परिणाम झाला असला तरी तो तात्पुरता असल्याचा विश्वास व्यक्त करत, भारतीय उद्योगांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने आगामी काळात भांडवली गुंतवणूक आणि औद्योगिक वाढ अधिक वेगाने होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीत प्रस्तावित हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला अभूतपूर्व चालना मिळण्याबरोबरच विदर्भाला देशातील नव्या औद्योगिक शक्तीकेंद्राचा दर्जा मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घातपात की अपघात? देवदा येथील संशयास्पद मृत्यूमागील गूढ वाढले

एटापल्ली : तालुक्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील हालेवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच 34 बीएफ 2560 क्रमांकाची ब्रेझा (Brezza) कार घेऊन आलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख सतीश निसाद अशी झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

घटनास्थळी आढळलेल्या परिस्थितीमुळे हा प्रकार अपघाताचा आहे की घातपाताचा, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हालेवरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दाबेराव यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती देता येईल.” सध्या पोलीस घटनास्थळावरील पुरावे संकलित करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देवदा येथील या रहस्यमय मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण परिसराचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे.

गडचिरोलीत प्रथमच ‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचे यश; 27 मातांना दिलासा

गडचिरोली : आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आधुनिक आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालयात ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन’ या अत्याधुनिक पद्धतीद्वारे एका दिवसात तब्बल 27 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांची ही पहिली मोठी मोहीम ठरली असून आरोग्य क्षेत्रासाठी ती मैलाचा दगड मानली जात आहे.

या शस्त्रक्रिया मोहिमेचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वतः सर्व 27 शस्त्रक्रिया कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ. स्मिता साळवे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान महत्त्वपूर्ण सहकार्य केले, तर भूलतज्ज्ञ डॉ. समीर बनसोडे यांनी आवश्यक भूलसेवा उपलब्ध करून दिली.

या उपक्रमाच्या यशामागे सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही मोठे योगदान राहिले. त्यांनी पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे समुपदेशन केले आणि कुटुंब नियोजनाबाबत जागृती निर्माण केली. तसेच मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही आधुनिक, सुरक्षित आणि कमी त्रासदायक पद्धत मानली जाते. या प्रक्रियेत पोटावर केवळ एक छोटासा छेद देऊन दूरबीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रक्तस्त्राव कमी होतो, टाके पडत नाहीत, वेदना कमी जाणवतात आणि रुग्ण लवकर बरे होऊन दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकतात. महिलांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशा शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

जेएसडब्ल्यू प्रकल्पाभोवती वादाचे वादळ; माओवादी इशाऱ्यांमुळे प्रशासन सतर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील वटेली परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रकल्पाविरोधातील नाराजी दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच माओवाद्यांच्या नावाने धमकीची पत्रके आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनीच्या कामाला विरोध दर्शवत काही अधिकाऱ्यांना इशारे देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वटेली परिसरात गेल्या काही दिवसांपासून जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामांविरोधात स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. प्रकल्पासाठी सुरू असलेल्या रस्ते बांधकाम आणि ड्रिलिंगमुळे गावातील शांतता व पर्यावरण धोक्यात येत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, स्थानिक युवकांना डावलून बाहेरील कामगारांना रोजगार दिला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. या मुद्द्यांवरून विविध गावांमध्ये बैठका आणि आंदोलनाची चर्चा रंगू लागली होती.

अशातच जंगल परिसरात लाल शाईने लिहिलेली काही धमकीपत्रके आढळून आली. या पत्रकांमध्ये कंपनीच्या कामाला विरोध नोंदवत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पत्रकांच्या मजकुरामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून, परिसरात पुन्हा माओवादी हालचाली वाढल्या आहेत का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पत्रके कोणी लावली, त्यामागे नेमका उद्देश काय आहे, तसेच स्थानिक असंतोषाचा या प्रकाराशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून गावागावात नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ग्रामस्थांनी या प्रकारामागे बाहेरील व्यक्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे वटेली आणि परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सामाजिक संघटनांनी विकासकामे करताना ग्रामसभेची संमती, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य आणि पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे. कंपनीविरोधातील वाढता रोष आणि धमकीपत्रांच्या घटनेमुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचे नवे आव्हान उभे ठाकले असून, सध्या संपूर्ण परिसरावर पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

कलिंगडाएवढा आंबा पाहून नागरिक थक्क; गडचिरोलीच्या ‘कलेक्टर’ आंब्याची राज्यात चर्चा

गडचिरोली : जंगल, तेंदूपत्ता आणि नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला आता कृषी क्षेत्रातून नवी आणि गोड ओळख मिळू लागली आहे. सिरोंचा तालुक्यात उत्पादित होणारा प्रसिद्ध ‘कलेक्टर’ आंबा आपल्या प्रचंड आकार, वजन आणि रसाळ गोडव्यामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सवात या आंब्याने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

आर्मोरी येथील शेतकरी प्रमोद कांबळे यांनी महोत्सवात तब्बल १ किलो ४०० ग्रॅम आणि १ किलो ३०० ग्रॅम वजनाचे ‘कलेक्टर’ जातीचे आंबे प्रदर्शित केले. आकाराने जवळपास छोट्या कलिंगडाइतके दिसणारे हे आंबे पाहण्यासाठी नागरिक, कृषी अभ्यासक आणि शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करत होते. या महाकाय आंब्यांनी महोत्सवात वेगळेच आकर्षण निर्माण केले असून सोशल मीडियावरही त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘कलेक्टर’ आंब्याचा इतिहासही तितकाच रंजक मानला जातो. ब्रिटिशकालीन पश्चिम गोदावरी भागातील तत्कालीन कलेक्टर ग्लासफोर्ड यांनी बाहेरून आणलेल्या कलमांची सिरोंचा परिसरात लागवड केल्याची माहिती स्थानिक पातळीवर सांगितली जाते. त्यांच्याच नावावरून या आंब्याला ‘कलेक्टर’ हे नाव मिळाल्याचे म्हटले जाते. गेल्या अनेक दशकांपासून या आंब्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली असून नागपूर, पुणे, हैदराबाद तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही या आंब्याला मोठी मागणी आहे.

विशेष म्हणजे, हा आंबा केवळ आकारानेच नव्हे तर गोडवा, गर आणि रसाळपणासाठीही प्रसिद्ध आहे. काही आंब्यांचे वजन दीड ते दोन किलोपर्यंत पोहोचत असल्याने तो सर्वसामान्य आंब्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो. बाजारात चांगला दर मिळत असल्याने सिरोंचा पट्ट्यातील अनेक शेतकरी आता पारंपरिक शेतीसोबत ‘कलेक्टर’ आंब्याच्या लागवडीकडे वळत आहेत. गडचिरोलीला कृषी क्षेत्रातून नवी ओळख मिळवून देण्यात हा आंबा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.