गडचिरोली : माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देऊन राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.
मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात शुक्रवार (३ जुलै २०२६) रोजी आयोजित पिपिंग समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (Pips) लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनिल बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त भागात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने बजावलेल्या सेवेमुळे त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.
समारंभात बोलताना पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांनी माओवादविरोधी अभियानातील विविध अनुभव, आव्हाने आणि दुर्गम भागातील पोलीस दलाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळत असून कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली पोलीस दलाची शौर्यगाथा उल्लेखनीय असून आजपर्यंत या दलाला ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १५१० पोलीस महासंचालक पदके तसेच ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळालेली आहे.
या समारंभाला अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, डॉ. निखिल गुप्ता, शिरीष जैन, यशस्वी यादव, डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) प्रशांत मोहिते तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलासाठी ही पदोन्नती केवळ वैयक्तिक यश नसून, माओवादविरोधी लढ्यातील धैर्य, समर्पण आणि उत्कृष्ट सेवेला मिळालेली राज्यस्तरीय गौरवाची पावती मानली जात आहे.
















