20 मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; नागरिकांनी आजच औषधांचा साठा करून ठेवावा – संतोष ताटीकोंडावार यांचे आवाहन

अहेरी : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहनानुसार 20 मे 2026 रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागरिकांना 19 मेपूर्वी आवश्यक औषधे खरेदी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाईन औषध विक्री व बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बंददरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन औषध सेवा सुरू राहणार असली तरी नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाचा ‘एकस्तर वेतनश्रेणीचा आदेश

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि इतर दुर्गम भागात कार्यरत आणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांना “एकस्तर वेतनश्रेणी” चा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.या निर्णयामुळे सुमारे 2,308 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

राज्य शासनाने 06 ऑगस्ट 2002 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनश्रेणी लागु करण्यात आली होती. मात्र काही कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठवण्यात आले होते. या विरोधात जिल्हा परिषद शिक्षक संघ आणि इतर कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजुने निर्णय दिला.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षक, आरोग्यसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रोस्ताहनपर लाभ नाकारणे योग्य ठरणार नाही. या भागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत सेवा दिल्याने त्यांना शासनाच्या निर्णयानूसार लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. या निर्णयानंतर संबंधीत जिल्हा परिषद प्रशासनाला चार आठवड्यांच्या आत पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसह वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पॉलिटेक्निक पदविका प्रवेश प्रक्रियेस 20 मे पासून सुरुवात

मुंबई : दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2026 पासून सुरु होत आहे.

प्रवेश प्रक्रिया वेळेत व नियोजनबद्ध पध्दतीने राबविण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तरी प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व कागदपत्रांसह तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांना थेट व्यासपीठ; 21 मे रोजी जिल्हास्तरीय सभा

गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि अनियमिततेसंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात थेट आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, शासनाच्या विविध विभागांमध्ये कामकाजादरम्यान लाचखोरी, गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता झाल्याची तक्रार असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व ठोस पुराव्यांसह सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सभेमध्ये प्राप्त तक्रारींची समितीमार्फत सुनावणी करून संबंधित प्रकरणांवर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.

20 मे रोजी औषध दुकाने बंद? प्रशासन अलर्ट मोडवर; रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू

All India Organisation of Chemists and Druggists यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेनंतर गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांशी थेट संपर्क साधत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाने विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. औषध निरीक्षक श्रीमती नालंदा उरकुडे (9096414104) तसेच सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे (7276544972) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

तालुकानिहाय संपर्क क्रमांक :

सिरोंचा – 9421729671

भामरागड – 9404438383

एटापल्ली – 9421856516

आलापल्ली – 9421729384

अहेरी – 9767820220

मुलचेरा – 9421854819

आष्टी – 9422151299

चामोर्शी – 9588678242

गडचिरोली – 9421735620 / 9423422130

आरमोरी – 9403820216 / 9420973680

वडसा – 9422150640 / 8999362844

कुरखेडा – 9404831332

कोर्ची – 9422154766 / 7757005944

धानोरा – 7588772743

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे यांनी सांगितले आहे.

आलापल्लीच्या कन्येची राष्ट्रीय भरारी; अनन्या सामलवारची ‘एअर पिस्तोल शूटिंग’ स्पर्धेसाठी निवड

आलापल्ली : येथील कु. अनन्या अविनाश सामलवार हिने राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तिने ‘१० मीटर एअर पिस्तोल’ प्रकारात ४०० पैकी ३४२ गुण मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर आगामी जून महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय एअर पिस्तोल शूटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता दडलेली असते, हे अनन्याने आपल्या यशातून पुन्हा अधोरेखित केले आहे.

अनन्या ही त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून तिच्या यशामागे कठोर मेहनत आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सुमीती गाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल, सहसचिव श्रुती आमले पाटील, प्राचार्य अरविंद देशमुख आणि क्रीडा शिक्षक छबुराव काळे यांनी वेळोवेळी प्रोत्साहन देत तिच्याकडून सातत्यपूर्ण सराव करून घेतला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अनन्याने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अनन्याच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण आलापल्ली परिसरासह गडचिरोली जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. तिच्या राष्ट्रीय निवडीची बातमी समजताच नागरिक, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही अनन्या चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सरकारी पगारात एवढी संपत्ती? छाप्यात उघड झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार

बिहार : जमुई जिल्ह्यात उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणाने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. ग्रामीण कार्य विभागाचे कार्यकारी अभियंता गोपाल कुमार यांच्या ठिकठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यांमध्ये इतकी अफाट संपत्ती सापडली की, तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. एका सरकारी अधिकाऱ्याकडे इतका पैसा, सोनं आणि मालमत्ता कशी काय जमा झाली, याचीच आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ऑक्टोबर 2008 मध्ये बिहार सरकारच्या सेवेत दाखल झालेले गोपाल कुमार यांना 2022 मध्ये कार्यकारी अभियंता पदावर बढती मिळाली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांनी आपल्या अधिकृत उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा तब्बल 80 टक्क्यांहून अधिक संपत्ती बेकायदेशीर मार्गाने उभी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर ज्ञात उत्पन्नापेक्षा दोन कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या चार वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 3 कोटी 99 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. इतकेच नव्हे, तर सुमारे 47 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदी पावत्या, 60 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने आणि जवळपास एक किलो चांदीचे दागिनेही अधिकाऱ्यांच्या हाती लागले.

या अभियंत्याची मालमत्ता पाहून अधिकारीही चक्रावले. सगुणा मोरे परिसरातील एका व्यापारी संकुलात त्यांची सुमारे 70 लाख रुपये किमतीची दोन दुकाने असल्याचे समोर आले आहे. दानापूर बाजार समितीजवळ निवासी भूखंडावर चार मजली आलिशान इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचेही तपासात उघड झाले. एवढेच नाही, तर दानापूरमधील एका फ्लॅटसाठी त्यांनी तब्बल 80 लाख रुपये रोख दिल्याचे पुरावे आणि कागदपत्रेही अधिकाऱ्यांना मिळाली आहेत.

जमुई येथील त्यांच्या भाड्याच्या घरातून आठ लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली. दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर खरेदी केलेली महागडी चारचाकी गाडी आणि इतर वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यांच्या तीन बँक खात्यांमध्ये सुमारे दहा लाख रुपयांची रक्कम असल्याचे आढळले आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या घरातून ग्रामीण विकास विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि नस्त्या बेकायदेशीरपणे ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या आहेत. याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात येणार असून, या भ्रष्टाचाराच्या जाळ्याची मुळे नेमकी किती खोलवर रुजली आहेत, याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. बिहारमधील या कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे.

गडचिरोलीत “ऑपरेशन अंतिम प्रहार”; 8 जहाल माओवादी जेरबंद, 51 शस्त्रांची जप्ती

गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी कारवाईत मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस दल आणि सिआरपीएफने “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत तब्बल आठ जहाल माओवाद्यांना अटक केली आहे. फोदेवाडा चकमकीत सी-60 जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या या माओवाद्यांमध्ये दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम आणि चार सदस्यांचा समावेश आहे. तेलंगणातील विकाराबाद रेल्वे स्थानक, मौजा कुमनार आणि नैताळा परिसरात विशेष शोध मोहिमा राबवून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण 64 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा आणि रोख रक्कम जप्त केली असून त्यात 02 एलएमजी रायफल, 04 एके-47, 04 एसएलआर, 03 इंसास रायफलसह एकूण 51 अग्निशस्त्रांचा समावेश आहे. याशिवाय 65 लाख 34 हजार रुपयांची रोख रक्कम, दारुगोळा, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्यही हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान माओवाद्यांनी जंगल परिसरात पोलिसांवर घातपात करण्यासाठी शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती उघड झाली होती. पोलिसांनी त्यानुसार शोध मोहीम राबवत फोदेवाडा, गुंडेनूर आणि नैताळा जंगल परिसरातून हा साठा जप्त केला.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील उर्वरित माओवाद्यांपैकी पाच जणांना अटक झाली असून एका महिला माओवादीने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यात अभिलेखावरील एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील, डीआयजी योगेश कुमार, सिआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा यांच्यासह गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.

गडचिरोलीत माओवादाला मोठा धक्का; 38 लाखांच्या पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानाला आणखी एक मोठे यश मिळाले असून, पाच वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 01 डिव्हीसीएम, 01 पीपीसीएम, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवादी तसेच दोन सदस्यांचा समावेश असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वर एकत्रित 38 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. विशेष म्हणजे सन 2025 पासून आतापर्यंत तब्बल 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव वेळदा, जिवन ऊर्फ जग्गु मडकाम, रजनी ऊर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे. अनेक वर्षे विविध दल आणि तांत्रिक पथकांमध्ये सक्रिय राहिलेल्या या माओवाद्यांनी हिंसक जीवनाचा त्याग करून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 15 ऑक्टोबर 2025 रोजी माओवादी प्रवक्ता भूपती ऊर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात 1063 माओवादी सदस्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्य आणि केंद्र शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे माओवाद्यांना नवजीवनाची संधी उपलब्ध होत असून, आत्मसमर्पण केलेल्या या पाचही सदस्यांना मिळून लाखो रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पती-पत्नी म्हणून आत्मसमर्पण करणाऱ्या मधु वेळदा आणि रजनी धुर्वा यांना अतिरिक्त मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सिआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष अभियान पथक आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोलीत शांतता आणि विकासाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘जनतेच्या दारी महसूल प्रशासन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आलापल्लीत महसूल समाधान शिबिराचा यशस्वी समारोप

गडचिरोली : अहेरी तहसील कार्यालयाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत सहाव्या आणि अंतिम टप्प्याचे शिबिर शुक्रवारी (दि. १५ मे २०२६) मौजा आलापल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महसूलविषयक सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अंतिम शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अहेरी शुभम पाटील होते. यावेळी तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार नरेंद्र दाते, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अहेरी रणदिवे, तालुका कृषी अधिकारी निखिल गुरव, दुय्यम निबंधक आर. जी. चिलनकर तसेच पंचायत समिती अहेरीचे गटविकास अधिकारी गणेश चव्हाण उपस्थित होते.

या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या १५ हून अधिक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ व ८-अ उताऱ्यांतील दुरुस्ती, QR कोडयुक्त डिजिटल ७/१२ उतारे, उत्पन्न, जात, रहिवासी आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, सामाजिक अर्थसहाय्य मंजुरी आदेश, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत प्रकरणे यावर विशेष भर देण्यात आला.

तसेच Single Day Service Delivery, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान सेवा, शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्त्यांबाबत तक्रार निवारण, घरांसाठी पट्टेवाटप, डिजिटल राशन कार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती आणि एसटी स्मार्टकार्ड यांसारख्या सेवा नागरिकांना देण्यात आल्या.

भूमी अभिलेख विभागामार्फत स्वामित्व योजनेंतर्गत विविध गावांमध्ये सनद वाटप करण्यात आले. मौजा वेलगूर टोला येथे २ सनद वाटप करून ₹२,७२२, मौजा येलचिल येथे ३ सनद वाटपातून ₹७,८६८ आणि मौजा चौडमपल्ली येथे २३ सनद वाटपातून ₹३५,६०८ इतकी सनद फी वसूल करण्यात आली. यामधून एकूण ₹४६,१९८ महसूल शासनाकडे जमा झाला. याशिवाय मौजा आलापल्ली येथे ३ पट्टेवाटप करण्यात आले असून महसूल व वन विभागाच्या पोटहिस्सा मोजणीबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नागरिकांना मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कातील विविध सवलतींची माहिती देण्यात आली. महिलांनी घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत, तसेच दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफीची माहिती दुय्यम निबंधक आर. जी. चिलनकर यांनी दिली.

याशिवाय सलोखा योजना अंतर्गत शेतजमिनीच्या अदलाबदलीसाठी केवळ ₹१००० मुद्रांक शुल्क व ₹१००० नोंदणी फी, कौटुंबिक बक्षीसपत्रासाठी ₹२०० मुद्रांक शुल्क, तसेच शैक्षणिक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफी यांसारख्या योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

शिबिरात महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागासह विविध शासकीय विभागांनी स्टॉल उभारले होते. आधार केंद्र, सेतू सुविधा केंद्र, आरटीओ, बँका आणि इतर विभागांच्या सहभागामुळे नागरिकांना अनेक सेवा व दाखले तत्काळ उपलब्ध झाले.

“पारदर्शक, लोकाभिमुख आणि शंभर टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढणारे महसूल प्रशासन उभारणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.