चक्क अस्वलाने वाघाला पिटाळलं; ताडोबातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीवांच्या संघर्षाचा एक अत्यंत थरारक आणि दुर्मिळ प्रसंग समोर आला आहे. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या वाघालाही एका आक्रमक अस्वलासमोर माघार घ्यावी लागल्याचे या घटनेत पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वन्यजीव प्रेमींसह नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताडोबाच्या घनदाट जंगलातील एका पानवठ्याजवळ ही घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात विविध वन्यप्राणी या भागात येत असतात. अशाच वेळी वाघ आणि अस्वल आमनेसामने आले आणि काही क्षणांतच वातावरण तणावपूर्ण बनले. सुरुवातीला वाघाने आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट प्रतिहल्ला चढवला.

Tiger Attack

सामान्यतः इतर प्राणी वाघाच्या वाटेला जाणे टाळतात, पण या घटनेत अस्वलाने अजिबात भीती न दाखवता सतत हल्लेखोर भूमिका कायम ठेवली. अस्वलाच्या अचानक आणि तीव्र आक्रमणामुळे वाघाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. काही वेळ चाललेल्या या संघर्षात अस्वलाचा आक्रमकपणा इतका वाढला की वाघाला अखेर मागे हटण्याचा निर्णय घ्यावा लागला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघ सावधपणे मागे सरकत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे अस्वल त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत आहे. वन्यजीवांच्या जगात प्रत्येक क्षणी अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असतो, याचीच ही घटना जिवंत उदाहरण ठरत आहे. ताडोबातील हा रोमांचक प्रसंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, जंगलातील नैसर्गिक शक्ती-संतुलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

एकेकाळी बंदूक, आता हातात पेन; देवजीची नवी जीवनयात्रा चर्चेत

तेलंगणा : एकेकाळी हातात एके-४७ घेऊन जंगलात माओवादी चळवळीचे नेतृत्व करणारा देवजी उर्फ तिप्पिरी तिरुपती आज पुन्हा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण वेगळे आहे. केंद्रीय समितीचा सदस्य आणि माओवादी मिलिटरी कमांडचा प्रमुख राहिलेला हा माजी नेता आता परीक्षा हॉलमध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा देताना दिसला. समोर उत्तरपत्रिका, हातात पेन आणि नव्या आयुष्याची उमेद घेऊन बसलेला देवजी अनेकांसाठी आश्चर्य आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

माओवादी संघटनेत ‘रमेश अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा देवजी २००० पर्यंत गडचिरोली भागात अत्यंत सक्रिय होता. संघटनेत त्याची ओळख प्रभावशाली रणनीतीकार म्हणून होती. शेकडो माओवादी कॅडर तयार करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. अहेरीचे तत्कालीन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अपहरण प्रकरणातही त्याच्या सहभागाचा आरोप झाला होता. चार दशकं जंगलातील संघर्ष, चकमकी आणि भूमिगत जीवन जगल्यानंतर त्याने आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले.

देवजीने १९८४-८५ मध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा दिली होती; मात्र तेलगू विषयात अपयश आल्याने त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. त्याच काळात तो क्रांतिकारी विचारसरणीकडे वळला आणि पुढे ‘रॅडिकल स्टुडंट युनियन’मधून सक्रिय होत जंगलाची वाट धरली. पुस्तकाऐवजी हातात बंदूक आणि शिक्षणाऐवजी संघर्षाचे आयुष्य आले. मात्र आता आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेत इंटर बोर्डाच्या परवानगीने अॅडव्हान्स सप्लिमेंटरी परीक्षा दिली.

विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन गरीब आणि वंचितांसाठी काम करण्याची इच्छा देवजीने व्यक्त केली आहे. “बंदुकीच्या मार्गाने नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून समाजासाठी लढायचं,” अशी त्याची भूमिका असल्याचे सांगितले जाते. जंगलातील संघर्षातून परीक्षा हॉलपर्यंत पोहोचलेला देवजीचा हा प्रवास केवळ एका माजी माओवादी नेत्याची कहाणी नसून बदलत्या विचारांची, नव्या आशेची आणि शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.

वैद्यकीय- अभियांत्रिकी स्वप्नांना बळ; भामरागडच्या विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण

गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमाला यश मिळाले आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तब्बल २६ विद्यार्थ्यांची NEET आणि JEE च्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये NEET प्रशिक्षणासाठी ११ मुलगे आणि १४ मुलींचा समावेश असून JEE साठी एका विद्यार्थिनीची निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती आणि नागपूर विभागातून निवड झालेल्या एकूण १०० विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी हे केवळ भामरागड प्रकल्पातील आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार, नियमित आणि स्पर्धात्मक वातावरणात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील शासकीय आश्रमशाळेत, तर मुलींसाठी वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील शासकीय आश्रमशाळेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग आणि Physics Wallah यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या यशासाठी भामरागडचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त Ayushi Singh यांनी अभिनंदन केले आहे.

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू; नागभीड तालुक्यात खळबळ

चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाची आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

वनिता शंकर उईके (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवार (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास किटाळी मेंढा येथील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वनिता उईके या इतर चार-पाच महिलांसह वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ६९ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. रोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या या महिला नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक वनिता उईके या इतर महिलांच्या नजरेआड झाल्या.

काही वेळ उलटल्यानंतरही त्या दिसून न आल्याने सोबतच्या महिलांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्या कुठेच आढळून न आल्याने त्यांनी गावात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले असता, एका पट्टेदार वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर वाघ मृतदेहाजवळ बसून त्यावर भक्ष्य करत असल्याचे भयावह दृश्य प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस विभाग तसेच वन विकास महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे, वन विकास महामंडळाचे एस. टी. वाढीवा आणि वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दरवर्षी हजारो मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात असतात. मात्र जंगल परिसरात वाढलेल्या वाघांच्या हालचाली आणि वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनिता उईके यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जंगलाशी संघर्ष करत उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या असुरक्षित वास्तवाची ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक : 977 स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य बजावणार मतदानाचा हक्क

Chandrapur : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठीची विधान परिषद निवडणूक येत्या 18 जून 2026 रोजी पार पडणार असून, तीनही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

मतदारसंख्येच्या दृष्टीने Chandrapur जिल्हा आघाडीवर असून येथे 469 सदस्य मतदार आहेत. तर Wardha जिल्ह्यात 264 आणि Gadchiroli जिल्ह्यात 244 स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेसह 10 नगर परिषद व 7 नगर पंचायतींतील सदस्यांचा यात समावेश आहे. गडचिरोलीतील 3 नगर परिषद आणि 9 नगर पंचायती, तसेच वर्ध्यातील 10 नगर परिषदांतील सदस्यही मतदान करणार आहेत.

दरम्यान, 18 मेपासून तीनही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी तीनही जिल्ह्यांतील उपविभाग मुख्यालयांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया चंद्रपूर जिल्हास्तरावर पार पडणार असून निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

20 मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; नागरिकांनी आजच औषधांचा साठा करून ठेवावा – संतोष ताटीकोंडावार यांचे आवाहन

अहेरी : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहनानुसार 20 मे 2026 रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नागरिकांना 19 मेपूर्वी आवश्यक औषधे खरेदी करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाईन औषध विक्री व बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बंददरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन औषध सेवा सुरू राहणार असली तरी नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.

नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाचा ‘एकस्तर वेतनश्रेणीचा आदेश

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि इतर दुर्गम भागात कार्यरत आणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांना “एकस्तर वेतनश्रेणी” चा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.या निर्णयामुळे सुमारे 2,308 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

राज्य शासनाने 06 ऑगस्ट 2002 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनश्रेणी लागु करण्यात आली होती. मात्र काही कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठवण्यात आले होते. या विरोधात जिल्हा परिषद शिक्षक संघ आणि इतर कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणात अखेर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजुने निर्णय दिला.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षक, आरोग्यसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रोस्ताहनपर लाभ नाकारणे योग्य ठरणार नाही. या भागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत सेवा दिल्याने त्यांना शासनाच्या निर्णयानूसार लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. या निर्णयानंतर संबंधीत जिल्हा परिषद प्रशासनाला चार आठवड्यांच्या आत पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसह वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पॉलिटेक्निक पदविका प्रवेश प्रक्रियेस 20 मे पासून सुरुवात

मुंबई : दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2026 पासून सुरु होत आहे.

प्रवेश प्रक्रिया वेळेत व नियोजनबद्ध पध्दतीने राबविण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तरी प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सर्व कागदपत्रांसह तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांना थेट व्यासपीठ; 21 मे रोजी जिल्हास्तरीय सभा

गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, गैरप्रकार आणि अनियमिततेसंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची महत्त्वपूर्ण सभा गुरुवार, दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात थेट आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, शासनाच्या विविध विभागांमध्ये कामकाजादरम्यान लाचखोरी, गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता झाल्याची तक्रार असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व ठोस पुराव्यांसह सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सभेमध्ये प्राप्त तक्रारींची समितीमार्फत सुनावणी करून संबंधित प्रकरणांवर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.

20 मे रोजी औषध दुकाने बंद? प्रशासन अलर्ट मोडवर; रुग्णांसाठी हेल्पलाईन सुरू

All India Organisation of Chemists and Druggists यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेनंतर गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांशी थेट संपर्क साधत बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासनाने विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. औषध निरीक्षक श्रीमती नालंदा उरकुडे (9096414104) तसेच सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे (7276544972) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

तालुकानिहाय संपर्क क्रमांक :

सिरोंचा – 9421729671

भामरागड – 9404438383

एटापल्ली – 9421856516

आलापल्ली – 9421729384

अहेरी – 9767820220

मुलचेरा – 9421854819

आष्टी – 9422151299

चामोर्शी – 9588678242

गडचिरोली – 9421735620 / 9423422130

आरमोरी – 9403820216 / 9420973680

वडसा – 9422150640 / 8999362844

कुरखेडा – 9404831332

कोर्ची – 9422154766 / 7757005944

धानोरा – 7588772743

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे यांनी सांगितले आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.