खाटा नाहीत, सुरक्षेची हमीही नाही! गडचिरोलीतील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह जिल्ह्यात सुरू असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, आणखी तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनींमध्ये सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) यांचा समावेश आहे. तर सर्पदंश झालेल्या दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच काही विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच अथवा उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसतिगृहातील विद्यार्थिनींची निवासव्यवस्था, पुरेशा खाटांचा अभाव, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची यंत्रणा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याने सर्पदंशाचा धोका वाढला का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

दरम्यान, घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षिका उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आश्रमशाळेतही हळहळ व्यक्त होत आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेत कोणाचा निष्काळजीपणा झाला आहे का, याचा तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये सर्पप्रतिबंधक उपाययोजना, पुरेशा खाटा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही जोर धरत आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून उमटली कलागुणांची रंगीत दुनिया; ताटीगुडम येथे बालचित्रकला स्पर्धा उत्साहात

अहेरी : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालचित्रकला स्पर्धा–२०२६ चे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, ताटीगुडम, केंद्र राजाराम, पंचायत समिती अहेरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या स्पर्धेत शाळेतील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची जोड देत विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. आपल्या कलागुणांचे सुंदर प्रदर्शन करत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजनावेळी मु.अ. कल्पना रागीवार, प्राथमिक शिक्षक श्री. पेंदाम सर, कटकरवार सर व दुर्गे सर उपस्थित होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेतील विविध पैलू समजून घेण्यास तसेच आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेतील वातावरण कलामय झाले होते. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून झाले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले.

सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांचा कट उधळला; शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा जप्त

गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही महत्त्वपूर्ण यशस्वी मोहीम ठरली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ३१ जुलै रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणहिता विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान शोधमोहिमेसाठी रवाना झाले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी कुमनार जंगल परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात आली.

या कारवाईदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेली एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लाँचर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी आणि दोन बॅटऱ्या असा मोठा शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, नक्षलवादी संघटना कमकुवत झाल्यानंतरही जंगलात लपवून ठेवलेली शस्त्रे व स्फोटके शोधून काढण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी २३ मे, २७ मे, २७ जून आणि १ ऑगस्ट रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गुप्तवार्ता शाखा, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले.

भामरागडच्या पुरात अडकलेल्या रुग्णाला हेलिकॉप्टरने रुग्णालयात; पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला असताना गडचिरोली पोलिसांनी वेळेशी शर्यत करत लाहेरी येथील गंभीर आजारी नागरिकाला हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. प्रशासन आणि पोलिसांच्या या धाडसी व तत्पर बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लाहेरी येथील रहिवासी श्यामसुंदर नरोटी (३५) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. सततच्या अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवणे अशक्य झाले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीने समन्वय साधत ‘पवन हंस’ हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले.

हेलिकॉप्टरद्वारे श्यामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या बचाव मोहिमेत भामरागड येथील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच पवन हंस हेलिकॉप्टरचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.

आर्य वैश्य महासभेच्या वतीने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

अल्लापल्ली/नागेपल्ली : महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अल्लापल्ली तथा आर्य वैश्य कोमटी समाज अल्लापल्ली/नागेपल्ली यांच्या वतीने माजी वनमंत्री व आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा साजरा करण्यात आला.

डॉ. चिमरालवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रशांत रागीवार, विशेष भटपल्लीवार तसेच अल्लापल्ली-नागेपल्ली येथील पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

आर्य वैश्य समाजासाठी आदरणीय असलेले माजी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वनमंत्रीपदाच्या काळात वृक्षारोपण, हवामान बदल व जमिनीची होणारी हानी रोखण्याबाबत केलेल्या कार्याची पावती म्हणून दरवर्षी त्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला जातो. “झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा” या संदेशासह हा उपक्रम राबविण्यात आला.

महासभेच्या गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, अहेरी, आल्लापल्ली व एटापल्ली येथील समाजबंधू-भगिनींनी उत्स्फूर्तपणे वाढदिवस साजरा केला.

रेड अलर्टचा इशारा! चंद्रपूर-गडचिरोलीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

गडचिरोली : विदर्भात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून २९ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा, आयटीआय तसेच व्यावसायिक प्रशिक्षण संस्था बंद राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही रेड अलर्टमुळे शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा अन् आल्लापल्लीत जल्लोष! स्थानिक विद्यार्थी व नागरिकांची मुख्य चौकात आतषबाजी.

आल्लापल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली येथे स्थानिक नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष साजरा केला. आल्लापल्ली येथील मुख्य चौकात नागरिकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या मते, गेल्या काही काळापासून राज्यातील व विशेषतः ग्रामीण-आदिवासी भागांतील शैक्षणिक समस्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत होते. परीक्षांमधील गोंधळ, शिष्यवृत्तीतील विलंब आणि स्थानिक शैक्षणिक गरजांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आता आगामी काळात शिक्षण खात्याच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आल्लापल्लीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी चौकात “शिक्षण व्यवस्था सुधारलीच पाहिजे” अशा घोषणाही देण्यात आल्या.

खड्ड्यांचा महामार्ग की विकासाचा अडथळा? आलापल्ली–सिरोंचा NH पाहणीत अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब

आलापल्ली : जिल्ह्याच्या दळणवळणाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी दाखल झाले. मात्र तब्बल सहा वर्षांपासून सुरू असलेल्या दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि कथित अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी, “गेल्या सहा वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. केवळ पाहणी आणि आश्वासने नकोत, तर दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ काम पूर्ण करा,” अशी ठाम भूमिका मांडली.

पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी तेलंगणा राज्यातून पाहणीसाठी आल्याचे समोर आल्यानंतर संतोषभाऊ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “साहेब, तुम्ही तेलंगणातून वर्षातून एकदा पाहणीसाठी येता; पण आम्ही मात्र रोज जीव मुठीत धरून या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करतो,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नाही, अपघातांचा धोका कायम असतो, गर्भवती महिला व गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेणे जीवघेणे ठरत आहे, रुग्णवाहिका अडकतात, तर मालवाहतूक विस्कळीत झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली. “हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

पाहणीनंतर अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी कामाला गती देण्यासह दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र गेल्या सहा वर्षांच्या अनुभवामुळे नागरिकांचा आश्वासनांवरील विश्वास उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी दिला.

तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडणारा आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग हा परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र त्याची झालेली दुरवस्था विकासालाच खीळ घालत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आलापल्लीत चक्का जाम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आलापल्ली : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आलापल्ली मधील वीर बाबुराव शेडमाके चौक येथे गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेले चक्का जाम आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी झाले.

सकाळी नऊ वाजल्यापासून विविध सामाजिक संघटना, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. मात्र आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. आंदोलकांनी संविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवत केंद्र सरकारने विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावल्याने हे आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

गडचिरोलीत १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांच्या महिंद्रा एम. शॉपी स्पेअर पार्ट्स सेंटरचे दिमाखात उद्घाटन

गडचिरोली : : अवघ्या १९ व्या वर्षी उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकत तरुण उद्योजक शाहिद शेख यांनी गडचिरोली शहरात महिंद्रा कंपनीच्या अधिकृत ‘एम. शॉपी’ स्पेअर पार्ट्स सेंटरची सुरुवात केली आहे. या आधुनिक स्पेअर पार्ट्स सेंटरचे उद्घाटन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार दीपकदादा आत्राम, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, तसेच महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी मुकेश रॉय, रजत शर्मा आणि कपिल सुतारिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

अवघ्या १९ वर्षांच्या वयात व्यवसाय क्षेत्रात धाडसी पाऊल उचलत शाहिद शेख यांनी सुरू केलेला हा उपक्रम गडचिरोलीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण व आदिवासीबहुल भागात आधुनिक आणि अधिकृत वाहन सेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाहिद शेख यांचे अभिनंदन करत, गडचिरोलीसारख्या वाढत्या जिल्ह्यात महिंद्राच्या अधिकृत स्पेअर पार्ट्स सेंटरची गरज अधोरेखित केली. या नव्या केंद्रामुळे वाहनधारकांना दर्जेदार, अस्सल आणि विश्वासार्ह स्पेअर पार्ट्स एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सेवाही अधिक सुलभ होणार आहेत.

महिंद्रा कंपनीच्या अधिकृत नेटवर्कमधील हे सेंटर असल्याने ग्राहकांना कंपनीमान्य दर्जाचे स्पेअर पार्ट्स, गुणवत्तेची हमी आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोली व परिसरातील महिंद्रा वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, वाहनधारक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १९ वर्षीय उद्योजक शाहिद शेख यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी आणि तरुण उद्योजकतेचा गौरव करणाऱ्या वातावरणात पार पडला.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.