अहेरी नगरपंचायत पोटनिवडणुकीत रंगणार काट्याची टक्कर

अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी शक्तीप्रदर्शन करत अहेरी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

भाजपच्या वतीने सौ. मायाताई शंकर येल्लूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून संजना हनुमंत मडावी यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांना भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांचे नेतृत्व लाभत आहे. दोन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या निवडणुकीसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून प्रत्यक्ष मतदान २० जून २०२६ रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अहेरीत प्रचारसभा, भेटीगाठी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपच्या नगरसेविका सुनीता किशोर मंथनवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून अहेरीतील राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

“फिट इंडिया”चा संदेश घेऊन CRPF जवानांची दमदार सायकल रॅली

गडचिरोली : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी “Fit India Movement” अभियानाला बळ देण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ९व्या बटालियनतर्फे आलापल्ली–प्राणहिता परिसरात “संदेश ऑन सायकल”च्या ७५व्या आवृत्तीनिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जवानांसह नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि नियमित व्यायामाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला ९व्या बटालियनचे कमांडंट शंभू कुमार तसेच द्वितीय कमांडंट अधिकारी व्ही. वेंकट रेड्डी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी शरीर हे सशक्त राष्ट्राचे प्रतीक असल्याचे सांगत प्रत्येकाने नियमित व्यायाम, योग आणि क्रीडा उपक्रमांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य अतिथींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जवानांनी उत्साहपूर्ण वातावरणात सायकल चालवत “फिट इंडिया, हेल्दी इंडिया”चा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. रॅलीदरम्यान परिसरात देशभक्ती, शिस्त आणि फिटनेसचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. कॅम्प परिसरातून सुरू झालेली ही रॅली विविध मार्गांवरून पुन्हा कॅम्पमध्ये येऊन संपन्न झाली.

यावेळी अधिकाऱ्यांनी फिटनेस ही केवळ वैयक्तिक आरोग्यापुरती मर्यादित नसून राष्ट्रनिर्मितीसाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. निरोगी आणि शिस्तप्रिय नागरिक देश अधिक सक्षम बनवू शकतात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर जवान आणि अधिकाऱ्यांनी स्वतः फिट राहण्याबरोबरच समाजालाही निरोगी व जागरूक बनविण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला. सीआरपीएफ ९व्या बटालियनच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

अहेरी पोटनिवडणुकीत आचारसंहिता भंगाचा आरोप; दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

अहेरी : अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ०९ मध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गंभीर आरोप समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संजय पुरुषोत्तम पोहणेकर आणि संतोष शंकराव मददीवार यांनी भाजपा उमेदवार मायाताई येल्लुरकर यांच्या नामांकन अर्ज दाखल प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित दोन्ही कर्मचारी शासनाकडून वेतन घेणारे असून त्यांनी नामांकन रॅलीत नेतृत्व करत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

यासोबतच, या रॅलीतील छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकद्वारे प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नगरपंचायत कार्यालयातील CCTV फुटेजमध्ये संबंधित कर्मचारी दिसत असल्याचा उल्लेख करत तक्रारकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसीलदार अहेरी आणि पोलीस निरीक्षक अहेरी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. ही संयुक्त तक्रार रियाज मोहम्मद ताज मोहम्मद शेख, शैलेंद्र मोहनराव पटवर्धन, विलास बुधाजी सिडाम, महेश बाकेवार आणि विलास लक्ष्मण गलबले यांनी दाखल केली आहे.

उन्हाच्या तडाख्याने सिरोंचात ७०० वटवाघळांचा मृत्यू; पर्यावरणासमोर मोठे संकट

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे तब्बल ७०० वटवाघळांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेमागील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने वटवाघळांचे वास्तव्य आहे. दिवसभर झाडांच्या फांद्यांवर उलटे लटकून विश्रांती घेणारी ही वटवाघळे रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. मात्र, गेल्या काही दिवसांतील तीव्र उकाडा आणि वाढते तापमान सहन न झाल्याने शेकडो वटवाघळे मृत अवस्थेत झाडाखाली आढळून आली. काही वटवाघळांचे मृतदेह अजूनही झाडांवर लटकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत वटवाघळांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून परिसरात मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, तीव्र उष्णतेमुळे वटवाघळांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. उष्माघात आणि निर्जलीकरणामुळे त्यांची शारीरिक क्षमता कमी होऊन मृत्यू ओढवू शकतो. हजारोंच्या संख्येने एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या वटवाघळांवर उष्णतेच्या लाटेचा अधिक गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

वटवाघळे ही पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रजाती मानली जाते. फळे, मध, परागकण आणि किटकांवर उपजीविका करणारी वटवाघळे परागीभवन, बियांचा प्रसार आणि किटक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जंगल संवर्धन आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान असते. जगभरात वटवाघळांच्या सुमारे १,४०० हून अधिक प्रजाती आढळतात. उष्णतेच्या वाढत्या संकटामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून वनविभागाने उर्वरित वटवाघळांसाठी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

४५ अंश तापमानात स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा; अहेरी आगारातील अव्यवस्थेवर संताप

अहेरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी शासनाने ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य केल्याने अहेरी बस आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसेच विद्यार्थी व दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींसाठी आता स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

स्मार्ट कार्ड प्रक्रियेसाठी आधार लिंकिंग आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत असल्याने प्रत्येक प्रवाशामागे १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत आहे. अहेरी आगारात केवळ दोनच काउंटर सुरू असल्याने गर्दी वाढली असून कडक उन्हात तासन्‌तास उभे राहावे लागत आहे. सावली, पिण्याचे पाणी आणि बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांना चक्कर येणे व मळमळ होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी बांधवांना ऑनलाइन प्रक्रिया करणेही कठीण जात आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून अतिरिक्त काउंटर सुरू करणे, टोकन पद्धत लागू करणे तसेच गावपातळीवर विशेष शिबिरे घेण्याची मागणी प्रवासी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आगारप्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केल्याचे सांगत लवकरच स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे.

एका मताची किंमत १० लाख? गडचिरोलीत ‘घोडेबाजार’ तेजीत

गडचिरोली / चंद्रपूर: वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच तिन्ही जिल्ह्यांत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यंदाची निवडणूक नेहमीप्रमाणेच आर्थिक ताकद, गटबाजी आणि अंकीय गणितांमुळे कमालीची चर्चेत आली आहे. दक्षिण गडचिरोलीत झालेल्या एका गुप्त बैठकीत शेजारील जिल्ह्यातील एका बड्या कंत्राटदार आमदाराने पहिल्या टप्प्यात नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोकड देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणूक जाहीर होताच ‘घोडेबाजार’ आणि ‘पैशांच्या राजकारणा’ने विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत स्थानिक गटबाजी आणि आर्थिक समीकरणे कमालीची महत्त्वाची ठरत आहेत. या मतदारसंघात जवळपास ९७७ मतदार मतदान करणार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांपेक्षा वैयक्तिक संपर्क आणि आर्थिक लाभ देण्याच्या तयारीवर जोर दिला जात आहे. सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संपर्क साधून त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची विधान परिषद निवडणूक पैशांच्या प्रभावावरूनच निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील कंत्राटदार किंवा श्रीमंत चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील काँग्रेसचे सुमारे ६० ते ७० नगरसेवक अचानक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेस नेत्यांची चिंता कमालीची वाढली आहे. या सर्व नगरसेवकांना ‘आगाऊ रक्कम’ (ॲडव्हान्स) देऊन अज्ञातस्थळी पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपचे स्थानिक नेते पूर्णपणे सक्रिय झाले असताना, काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचे वातावरण असून अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकूण ९७७ मतदारांपैकी सर्वाधिक ४४४ मतदार एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत, ज्यामुळे चंद्रपूर जिल्हा या निवडणुकीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे.

या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे २२१ तर भाजपचे १३६ नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसचा एवढा मोठा गट अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने पक्षात मोठी अस्वस्थता आणि पक्षांतराची भीती निर्माण झाली आहे. अज्ञातस्थळी गेलेल्या नगरसेवकांमध्ये चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली आणि इतर काही पालिकांमधील सदस्यांचा समावेश आहे. विरोधकांनी किंवा पक्षातीलच काही नाराज नेत्यांनी फूस लावून या नगरसेवकांना हलवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच आपल्या मतदारांची जुळवाजुळव करणे आणि त्यांना पुन्हा एकत्र आणणे हे आता काँग्रेस नेत्यांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

शंभर टक्के शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

गडचिरोली : प्रशासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये दि. २० ते ३० मे २०२६ या कालावधीत निवडक ग्रामपंचायतींमध्ये ‘विशेष सर्वेक्षण आणि सेवा संतृप्ती मोहीम’ राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा १०० टक्के लाभ पोहोचवणे, अपूर्ण नोंदी पूर्ण करणे आणि सेवा वितरण प्रक्रिया गतिमान करणे हा आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम संपूर्ण जिल्ह्यात युद्धपातळीवर राबवली जात आहे.

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे रविवारी (२४ मे) आपला ताफा घेऊन रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दुर्गम ‘ताटीगुडम’ पाड्यावर दाखल झाले. विशेष म्हणजे, या दौऱ्यात थेट मुख्य सचिव कार्यालयातील चमूचे प्रतीक बावी आणि ऋषिकेश शिर्के हे देखील उपस्थित होते. पहिल्यांदाच मुख्य सचिव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू थेट खेड्यापाड्यांत आणि दुर्गम पाड्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या विशेष मोहिमेत अहेरी विधानसभेतील मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली व तोडसा, अहेरी तालुक्यातील ताटीगुडम, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर आणि भामरागड तालुक्यातील टेकला या विशिष्ट गावांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव कार्यालयातील चमूने शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत या विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या मोहिमेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी थेट लाभार्थ्यांच्या दारात जाऊन माहिती संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि १०० टक्के तपासणी करत आहेत.

प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, “या मोहिमेत निवडक गावातील प्रत्येक कुटुंबाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या शासकीय योजनांशी जोडले जाणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून आपली माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा.” या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव, गटविकास अधिकारी गणेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गो-तस्करीच्या जाळ्यावर पोलिसांचा शिकंजा ; २९३ तस्कर पोलिसांच्या रडारवर

चंद्रपूर : जिल्ह्यात वाढत्या अवैध गो-तस्करी, बेकायदेशीर कत्तल आणि मुक्या जनावरांवरील क्रूरतेच्या घटनांवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे जिल्हाभरातील तब्बल २९३ सराईत गो-तस्करांना विशेष प्रतिबंधक कारवाई कॅम्पसाठी हजर करण्यात आले. भविष्यात अशा गुन्ह्यांत पुन्हा सहभागी आढळल्यास थेट मकोकासह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलिस प्रशासनाने दिला.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅम्पमध्ये अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी गौरव कायंदे पाटील, परिविक्षाधीन उपअधीक्षक सदानंद खत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक सराईत गुन्हेगाराची सविस्तर माहिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे, हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांच्या नोंदीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, मूल, राजुरा आणि गडचांदूर उपविभागातील गो-तस्कर पोलिसांच्या रडारवर असून, संघटित स्वरूपात गो-तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच या अवैध व्यवसायातून उभारलेली मालमत्ता शोधून ती जप्त करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गो-तस्करीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर सरकारजमा करण्यात येणार आहेत. या गुन्हेगारी साखळीला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील संघटित गो-तस्करीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात आहे.

माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना आणि विविध साहित्य गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, घटनास्थळी सापडलेले सर्व साहित्य जवानांच्या मदतीने जागीच नष्ट करण्यात आले.

माओवादी संघटना सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी जंगल परिसरात शस्त्रे, स्फोटके आणि अन्य साहित्य गुप्तपणे जमिनीत पुरून ठेवत असत. निवडणुका, नक्षल सप्ताह किंवा इतर संवेदनशील काळात या साहित्याचा वापर घातपातासाठी केला जात होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, पोलिस दल सातत्याने अशा लपवून ठेवलेल्या साठ्यांचा शोध घेत आहे.

१६ मे २०२६ रोजी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून पोमकें-बिनागुंडा परिसरातील जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार २१ मे रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली.

२२ मे रोजी पोमकें-बिनागुंडा जंगल परिसरात कसून तपासणीदरम्यान पोलिसांना एक लेथ मशीन, बीजीएल पाईप्स, १२ बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल आणि फुटबॉल पाईपसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली. या धाडसी मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.

लोढा डाऊनटाऊनमध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड; २१ नायजेरियन नागरिक ताब्यात

ठाणे : ठाण्याच्या डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक प्रकरण समोर आले आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे गुप्त कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले असून, त्यातील दोन आरोपी हे विविध राज्यांमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेले सराईत ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीजवळील पलावा सिटी परिसरातील अत्यंत आलिशान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘लोढा डाऊनटाऊन’ या सोसायटीत हे सर्व आरोपी बनावट नावांनी राहत होते. पोलिसांच्या तपासात अनेकजण बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अनेक राज्यांतील पोलीस या टोळीच्या शोधात होते. मात्र, पोलिसांची नजर चुकवत हे आरोपी ठाणे जिल्ह्यात लपून राहत असल्याचे समोर आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनंतर नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांनी शनिवारी पहाटे संयुक्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. संपूर्ण लोढा डाऊनटाऊन परिसराला पोलिसांनी वेढा घालत संशयित फ्लॅट्सवर एकाचवेळी छापे टाकले. पहाटेच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईत ताब्यात घेतलेल्या २१ जणांपैकी दोन आरोपी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोस्ट वॉन्टेड ड्रग तस्कर असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप आहेत. उर्वरित काही आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक वैध कागदपत्रे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ पुरवठ्यामागे याच टोळीचा हात असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व आरोपींना मानपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या टोळीचे मुंबई आणि डोंबिवली परिसरातील नेटवर्क किती मोठे आहे, त्यांनी कोणाला ड्रग्ज पुरवठा केला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या धडक कारवाईमुळे ठाणे आणि मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.