११ वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी दिनांक २१ मेपासून सुरू झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वेळेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर करावा. कोणतीही अडचण टाळण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

भामरागडमध्ये शेततळे योजनांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची चौकशीची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तहसीलमध्ये DBT व कृषी योजनांतर्गत सुरू असलेल्या शेततळे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. या प्रकरणात शासन निधीचा अपहार होत असून कास्तकारांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, कास्तकारांच्या खात्यात जमा झालेली पूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून काढून घेतली जात असून त्यापैकी केवळ सुमारे 60 हजार रुपये मशीन धारकाला देण्यात येत आहेत. उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवून कास्तकारांना “पूर्ण पैसे दिले” अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती टाकून अधिक काम झाल्याचे दाखवले जात असल्याचीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्येक खात्यात जमा झालेली रक्कम, पैसे काढण्याची प्रक्रिया, मशीन धारकाला दिलेली रक्कम तसेच प्रत्यक्ष खोदकाम व मोजमाप पुस्तिकेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करून शासन निधीचा अपहार थांबवावा, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मुरखळा गावाजवळ भीषण अपघात! गडचिरोली-उमरखेड ST बस उलटली; 2 ठार, 30 प्रवासी जखमी

गडचिरोली: गडचिरोलीहून उमरखेडकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसला आज भीषण अपघात झाला. मुरखळा गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. अचानक बसचा वेग अनियंत्रित झाला आणि काही क्षणांतच बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसच्या काचा फुटल्या असून अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गडचिरोली-उमरखेड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेकडो कोटींचा महामार्ग की भ्रष्टाचाराचा मार्ग? गडचिरोली-धानोरा रस्त्यावर बांधकामाआधीच भेगा

गडचिरोली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari देशभरात दर्जेदार महामार्ग उभारल्याचे दावे करत असताना, गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी मात्र या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील सुरू असलेल्या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेकडो कोटी रुपये खर्चूनही रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे चित्र समोर आले आहे.

महामार्गाच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्णत्वास आले असले तरी काही महिन्यांतच अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा, खड्डे आणि उखडलेले थर दिसू लागले आहेत. दुसऱ्या बाजूचे बांधकाम अद्याप सुरू असताना पहिल्याच टप्प्यात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “काम पूर्ण होण्याआधीच रस्ता खचत असेल, तर पुढील काही वर्षांत परिस्थिती किती गंभीर होईल?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही पुलांना उद्घाटनापूर्वीच भेगा पडल्याचे प्रकार घडले होते, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे आरोप झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करत कामांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही.

नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महामार्गांना ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेसाठी मजबूत रस्ते अत्यावश्यक असताना प्रत्यक्षात सुरू असलेली भोंगळ कामे नागरिकांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेततळे योजनेत भ्रष्टाचार! फक्त ६० हजार देऊन उर्वरित रक्कम अधिकाऱ्यांनी खिशात घातल्याचे आरोप

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या एका गंभीर तक्रारीनुसार, भामरागड तालुक्यातील विविध गावांमध्ये DBT व कृषी विभागाच्या शेततळे योजनांत मोठ्या प्रमाणात अनियमितता व शासन निधीचा अपहार होत असल्याचे समोर आले आहे.

तक्रारीनुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली संपूर्ण मंजूर रक्कम संबंधित अधिकारी काढून घेत असून, त्यातील केवळ सुमारे ६० हजार रुपये मशीन धारकाला देत आणि उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचे आरोप आहेत. शेतकऱ्यांना “मशीनधारकास पूर्ण पैसे दिले” असे खोटे सांगून त्यांची फसवणूक केली जात असल्याचीही माहिती आहे.

याशिवाय, प्रत्यक्षात कमी खोदकाम करून चारही बाजूंनी माती चढवून जास्त काम दाखवण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शासन निधीचा मोठा अपहार होत असल्याचे दिसून येते.

तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी विनंती केली आहे की, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम, त्या रकमेचे काढणे, मशीनधारकाला दिलेली प्रत्यक्ष रक्कम, मोजमाप पुस्तिका (MB) यांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

जिद्द, कष्ट आणि सातत्याचा विजय! गडचिरोलीचा अमोल देशमुख यांची बोस्टन विद्यापीठात दुहेरी पदवी

गडचिरोली : जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश येथील अमोल प्रदीप देशमुख यांनी संपादन केले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून त्यांनी एकाचवेळी एमबीए आणि मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या दोन पदव्युत्तर पदव्या यशस्वीरीत्या प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.

गडचिरोलीतील रहिवासी असलेल्या अमोल देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण कार्मेल हायस्कूलमध्ये झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथील गुरु गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमधील एका बँकेत नोकरी सुरू केली.

मात्र, उच्च शिक्षण घेण्याची तीव्र जिद्द आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी कायम जपले. नोकरी सांभाळत त्यांनी एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी केली आणि उत्कृष्ट यश मिळवत अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी त्याचवेळी मास्टर ऑफ सायन्स इन फायनान्स या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेत दोन्ही पदव्या एकत्र पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

कष्ट, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर अमोल देशमुख यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच गडचिरोलीतील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अमोल यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याचा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.

चक्क अस्वलाने वाघाला पिटाळलं; ताडोबातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यजीवांच्या संघर्षाचा एक अत्यंत थरारक आणि दुर्मिळ प्रसंग समोर आला आहे. जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या वाघालाही एका आक्रमक अस्वलासमोर माघार घ्यावी लागल्याचे या घटनेत पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, वन्यजीव प्रेमींसह नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ताडोबाच्या घनदाट जंगलातील एका पानवठ्याजवळ ही घटना घडली. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात विविध वन्यप्राणी या भागात येत असतात. अशाच वेळी वाघ आणि अस्वल आमनेसामने आले आणि काही क्षणांतच वातावरण तणावपूर्ण बनले. सुरुवातीला वाघाने आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट प्रतिहल्ला चढवला.

Tiger Attack

सामान्यतः इतर प्राणी वाघाच्या वाटेला जाणे टाळतात, पण या घटनेत अस्वलाने अजिबात भीती न दाखवता सतत हल्लेखोर भूमिका कायम ठेवली. अस्वलाच्या अचानक आणि तीव्र आक्रमणामुळे वाघाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. काही वेळ चाललेल्या या संघर्षात अस्वलाचा आक्रमकपणा इतका वाढला की वाघाला अखेर मागे हटण्याचा निर्णय घ्यावा लागला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघ सावधपणे मागे सरकत असल्याचे दिसते, तर दुसरीकडे अस्वल त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग करताना स्पष्टपणे दिसत आहे. वन्यजीवांच्या जगात प्रत्येक क्षणी अस्तित्वासाठी संघर्ष सुरू असतो, याचीच ही घटना जिवंत उदाहरण ठरत आहे. ताडोबातील हा रोमांचक प्रसंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, जंगलातील नैसर्गिक शक्ती-संतुलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

एकेकाळी बंदूक, आता हातात पेन; देवजीची नवी जीवनयात्रा चर्चेत

तेलंगणा : एकेकाळी हातात एके-४७ घेऊन जंगलात माओवादी चळवळीचे नेतृत्व करणारा देवजी उर्फ तिप्पिरी तिरुपती आज पुन्हा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण वेगळे आहे. केंद्रीय समितीचा सदस्य आणि माओवादी मिलिटरी कमांडचा प्रमुख राहिलेला हा माजी नेता आता परीक्षा हॉलमध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा देताना दिसला. समोर उत्तरपत्रिका, हातात पेन आणि नव्या आयुष्याची उमेद घेऊन बसलेला देवजी अनेकांसाठी आश्चर्य आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

माओवादी संघटनेत ‘रमेश अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा देवजी २००० पर्यंत गडचिरोली भागात अत्यंत सक्रिय होता. संघटनेत त्याची ओळख प्रभावशाली रणनीतीकार म्हणून होती. शेकडो माओवादी कॅडर तयार करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. अहेरीचे तत्कालीन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अपहरण प्रकरणातही त्याच्या सहभागाचा आरोप झाला होता. चार दशकं जंगलातील संघर्ष, चकमकी आणि भूमिगत जीवन जगल्यानंतर त्याने आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले.

देवजीने १९८४-८५ मध्ये इंटर सेकंड इयरची परीक्षा दिली होती; मात्र तेलगू विषयात अपयश आल्याने त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. त्याच काळात तो क्रांतिकारी विचारसरणीकडे वळला आणि पुढे ‘रॅडिकल स्टुडंट युनियन’मधून सक्रिय होत जंगलाची वाट धरली. पुस्तकाऐवजी हातात बंदूक आणि शिक्षणाऐवजी संघर्षाचे आयुष्य आले. मात्र आता आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेत इंटर बोर्डाच्या परवानगीने अॅडव्हान्स सप्लिमेंटरी परीक्षा दिली.

विशेष म्हणजे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन गरीब आणि वंचितांसाठी काम करण्याची इच्छा देवजीने व्यक्त केली आहे. “बंदुकीच्या मार्गाने नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत राहून समाजासाठी लढायचं,” अशी त्याची भूमिका असल्याचे सांगितले जाते. जंगलातील संघर्षातून परीक्षा हॉलपर्यंत पोहोचलेला देवजीचा हा प्रवास केवळ एका माजी माओवादी नेत्याची कहाणी नसून बदलत्या विचारांची, नव्या आशेची आणि शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.

वैद्यकीय- अभियांत्रिकी स्वप्नांना बळ; भामरागडच्या विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण

गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमाला यश मिळाले आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तब्बल २६ विद्यार्थ्यांची NEET आणि JEE च्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये NEET प्रशिक्षणासाठी ११ मुलगे आणि १४ मुलींचा समावेश असून JEE साठी एका विद्यार्थिनीची निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती आणि नागपूर विभागातून निवड झालेल्या एकूण १०० विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी हे केवळ भामरागड प्रकल्पातील आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. पुढील दोन वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार, नियमित आणि स्पर्धात्मक वातावरणात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील शासकीय आश्रमशाळेत, तर मुलींसाठी वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील शासकीय आश्रमशाळेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभाग आणि Physics Wallah यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या यशासाठी भामरागडचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत, सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नागपूर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त Ayushi Singh यांनी अभिनंदन केले आहे.

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू; नागभीड तालुक्यात खळबळ

चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाची आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

वनिता शंकर उईके (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवार (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास किटाळी मेंढा येथील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वनिता उईके या इतर चार-पाच महिलांसह वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ६९ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. रोजच्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असलेल्या या महिला नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक वनिता उईके या इतर महिलांच्या नजरेआड झाल्या.

काही वेळ उलटल्यानंतरही त्या दिसून न आल्याने सोबतच्या महिलांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्या कुठेच आढळून न आल्याने त्यांनी गावात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले असता, एका पट्टेदार वाघाने वनिता उईके यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे, तर वाघ मृतदेहाजवळ बसून त्यावर भक्ष्य करत असल्याचे भयावह दृश्य प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस विभाग तसेच वन विकास महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकाटे, वन विकास महामंडळाचे एस. टी. वाढीवा आणि वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दरवर्षी हजारो मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जात असतात. मात्र जंगल परिसरात वाढलेल्या वाघांच्या हालचाली आणि वारंवार घडणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनिता उईके यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जंगलाशी संघर्ष करत उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या असुरक्षित वास्तवाची ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.